“शिवसेना फाटाफुटीला विनायक राऊत-संजय राऊत जबाबदार”; कायंदेंच्या पक्षप्रवेशावरून शिवसेनेने राऊतांना टार्गेट केले

| Updated on: Jun 18, 2023 | 5:38 PM

ठाकरे गटातील अनेक नेते पक्ष सोडून गेले आहेत, मात्र त्या गोष्टीचे त्यांना काहीही नाही. नेते पक्ष सोडून जाण्यास आणि संघटना खुंठण्यात संजय राऊताचं तोंड जबाबदार असल्याचा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

शिवसेना फाटाफुटीला विनायक राऊत-संजय राऊत जबाबदार; कायंदेंच्या पक्षप्रवेशावरून शिवसेनेने राऊतांना टार्गेट केले
Follow us on

मुंबई : ठाकरे गटाच्या ढाल समजल्या जाणाऱ्या आमदार मनीषा कायंदे शिवसेनेत जाणार असल्याने आता शिवसेनेच्या नेत्यानी ठाकरे गटावर सडकून टीका केली आहे. ठाकरे गटाचे नेते सोडून जाण्यास उद्धव ठाकरे यांच्या भोवतीची चांडाळचौकडी कारणीभूत असल्याची टीकाही जोरदारपण केली जात आहे. मनिषा कायंदे ठाकरे गटाच्या विरोधकांना सडेतोड उत्तर देत असताना त्या ठाकरे गटाच्या बाजूही भक्कमपणे मांडताना दिसत होत्या. ठाकरे गट सोडून त्या शिवसेनेत जाणार असल्यामुळेच या पक्ष प्रवेशाला आता दोन्ही राऊत जबाबदार असल्याची टीका आमदार संजय शिरसाठ यांनी केली आहे.

ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे शिवसेनेत प्रवेश करणार असल्यामुळेच आमदार संजय शिरसाठ यांनी टीका करताना म्हणाले की, उद्धव ठाकरेना चांडाळचौकटी मिसगाईड करत आहे.

ठाकरे गट सोडण्याचा निर्णय

त्यातच पक्षातील सत्य परिस्थितीत उद्धव ठाकरे यांना कोणीही कळू देत नाही. या अशा अंतर्गत कारणामुळेच मनिषा कायंदे यांनी ठाकरे गट सोडण्याचा निर्णय घेतला असणार अशी शक्यता संजय शिरसाठ यांनी व्यक्त केली आहे.

अनेक कारणं कारणीभूत

कोणताही नेता पक्ष सोडताना तो एका दिवसामध्ये तो निर्णय घेत नसतो, तर त्याला अनेक कारणं कारणीभूत असतात. त्याच प्रकारे मनिषा कायदेनीही संपर्क करण्याच प्रयत्न केला असेल पण उद्धव ठाकरे त्यांना भेटले नसतील अशी शक्यताही संजय शिरसाठ यांनी व्यक्त केली आहे.

ठाकरे गटात कुणीही राहिलेलं नाही

आमदार संजय शिरसाठ यांनी उद्धव ठाकरे गटाचे आणखी काही आमदार आमच्याकडे येतील अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. आता उद्धव ठाकरे गटात कुणीही राहिलेलं नाही त्यामुळे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना होय ला होय म्हणण्याशिवाय आता पर्याय राहिला नाही असा टोलाही त्यांनी ठाकरे गटाला लगावला आहे.

राऊताचं तोंड जबाबदार

ठाकरे गटातील अनेक नेते पक्ष सोडून गेले आहेत, मात्र त्या गोष्टीचे त्यांना काहीही नाही. नेते पक्ष सोडून जाण्यास आणि संघटना खुंठण्यात संजय राऊताचं तोंड जबाबदार असल्याचा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला आहे. यावेळी त्यांनी शिवसेना फाटाफुटीला विनायक राऊत आणि संजय राऊत जबाबदार असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला आहे. तर सुषमा अंधारे कधीही निघून जातील असा टोला त्यांनी अंधारे यांना लगावला आहे.