मोठी बातमी! सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद जाणार? पक्षातूनच विरोध, थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार
Sunil Tatkare : सुनील तटकरेंच्या प्रदेशाध्यक्ष पदाला पक्षातूनच विरोध होत असल्याचे समोर आले आहे. तटकरे यांचे पद घटनाबाह्य अशी तक्रार थेट निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.

राज्याच्या राजकारणात गेल्या काही काळापासून मोठ्या घडामोडी घडताना पहायला मिळत आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात सर्वकाही आलबेल नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर अनेक नेते नाराज असल्याचेही बोलले जात आहे. अशातच आता सुनील तटकरेंच्या प्रदेशाध्यक्ष पदाला पक्षातूनच विरोध होत असल्याचे समोर आले आहे. तटकरे यांचे पद घटनाबाह्य अशी तक्रार थेट निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
सुनील तटकरे यांच्या नियुक्तीविरोधात तक्रार
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या नियक्तीविरोधात निवडणूक आयोगात तक्रार करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातील मंठा-परतूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब गोरे यांनी ही तक्रार केली आहे. पक्षाच्या संविधानाला डावलून, अंतर्गत लोकशाहीचे नियम धाब्यावर बसवून तटकरेंची नियुक्ती केली गेली आहे. तटकरेंचा कार्यकाळ घटनाबाह्य असल्याचा आक्षेप घेत भाऊसाहेब गोरे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
तटकरे अद्याप पदावर कसे?
भाऊसाहेब गोरे यांनी या तक्रारीत तटकरे यांच्या नियुक्तीचा 3 वर्षांचा सामान्य कार्यकाळ जुलै 2026 मध्येच संपुष्टात आला असून कोणतीही संघटनात्मक निवडणूक न घेता तटकरे अद्याप पदावर कसे कार्यरत आहेत? असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच तकटरेंच्या जालना दौऱ्यात अजित पवारांच्या नावाच्या घोषणा दिल्याने तटकरेंनी जिल्ह्यातील अनेक पदाधिकार्यांना पदावरून हटवल्याचाही आरोप यावेळी भाऊसाहेब गोरे यांनी केला आहे. त्यामुळे जालन्यासह राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
तटकरेंनी प्रदेशाध्यक्ष पद सोडावे अशी मागणी
राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले होते की, ‘अजितदादा असताना पक्षात काही निर्णय झाले होते. त्याची अंमलबजावणी होणार होती. अचानक अजितदादांची ती दुर्दैवी घटना घडली. ही जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्यावर आली आहे. काल प्रशांत किशोर यांनी सांगितले की प्रांत अध्यक्ष बदलल्याशिवाय मी काम करणार नाही. रणनितीकार निवडणे हा पक्षाचा अधिकार आहे. प्रदेशाध्यक्ष बदलले पाहिजे. अजितदादांची तीच इच्छा होती. प्रदेशाध्यक्ष बदलणार हेच अजितदादांनी आम्हाला सांगितले होते. कदाचित माझ्यापेक्षा जे वरिष्ठ आहेत, मंत्री आहेत. त्यांना ही गोष्ट माहिती आहे. पण ते बोलणार नाहीत. पण का बोलायचं नाही. जर पक्ष संघटन मजबूत करायचं असेल तर बदल व्हायला हवा.’
