फडणवीसांना नेमकं दुःख कोणतं? सहनही होत नाही अन् सांगताही येत नाही? शिवसेनेचा नवा दावा काय?

| Updated on: Apr 25, 2023 | 11:08 AM

राज्यात मुख्यमंत्री पदावरून दररोज नवनवे दावे केले जात आहेत. म्हणजेच सध्याचे मुख्यमंत्री लवकरच विसर्जित होणार हे नक्की.फक्त आता पाटावर कोणता गुळाचा गणपती बसवतात ते पहायचे, असा टोला सामनातून लगावण्यात आलाय.

फडणवीसांना नेमकं दुःख कोणतं? सहनही होत नाही अन् सांगताही येत नाही? शिवसेनेचा नवा दावा काय?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरून महाराष्ट्राच्या राजकारणात(Maharashtra politics) पुन्हा खळखळ माजली असताना शिवसेनेने नवा दावा केलाय. देवेंद्र फडणवीसांनी संपूर्ण खेळ जुळवून आणला असतानाही अचानक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असल्याची घोषणा झाली. या धक्क्यातून देवेंद्र फडणवीस अजूनही सावरले नाहीत. त्यातच अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुख्यमंत्री पदाबद्दलच्या वक्तव्यानंतर फडणवीसांचं एक वाक्य सर्व काही सांगून जातं, असा दावा शिवसेनेचं मुखपत्र सामनातून करण्यात आलाय. मुख्यमंत्री पदाचं काय… कोणीही इच्छा बाळगू शकतो, पण योग्यता हवी ना… असं फडवणीस हसत हसत म्हणाले. पण प्रचंड वैफल्य आणि त्राग्यातून ही प्रतिक्रिया आली आहे. फडणवीसांचं दुःख हे सहनही होईना आणि सांगताही येईना असं झाल्याचा दावा शिवसेनेने केलाय.

‘भर मंडपात अचानक बोहल्यावर मिंधे’

भर मंडपात वरमाला, अक्षता तयार असताना अचानक बोहल्यावर मिंध्यांना चढवलं गेलं. त्या धक्क्यातून देवेंद्र फडणवीस अजूनही सावरले नाहीत. त्यातच कधी विखे पाटीलांचे तर कधी अजित पवारांचे नाव चर्चेत आणले जाते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस दुःखाने बेजार झाले आहे. ही अवस्था म्हणजे बेधुंद नशेचे शेवटचे टोक आहे, अशी खोचक टीका सामनातून करण्यात आली आहे.

पंतप्रधानांना धमकी ते खारघर घटना

केरळमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी आली. केरळमध्ये भाजपचं राज्य नाही. त्यामुळे ही धमकी कुणी दिली, यासाठी संपूर्ण राज्य पिंजून काढलं गेलं. पत्रलेखकाला अटक झाली. पण खारघरमध्ये फडणवीस यांच्या डोळ्यासमोर १६ जणांचा भुकेने तडफडून मृत्यू झाला. लोक चेंगरून मेले, तरीही सरकार पुरस्कृत या हत्येवर फडणवीस बोलायला तयार नाहीत, ही कोणती सत्तेची देशी नशा चढली आहे, असा सवाल सामनातून करण्यात आलाय. कूनो राष्ट्रीय उद्यानातील एका आफ्रिकन चित्त्याचा मृत्यू झाल्यावर पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केलं. मात्र श्री सदस्यांच्या मृत्यूवर दोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यावरून कुणीही बोलायला तयार नाही, अशी खंत सामनातून व्यक्त करण्यात आली आहे.

फडणवीसांचे पोलीस…

रत्नागिरी जिल्ह्यातील रिफायनरी विरोधातील आंदोलन चिरडून काढण्यासाठी फडणवीसांचे पोलीस आंदोलकांच्या दिशेने बंदुक रोखून उभे आहेत. आंदोलकांचे बळी गेले चालतील, असे अमानुष धोरण मिंधे-फडणवीस सरकारचे आहे, सत्तेची नवटाक दारू चढल्यामुळेच हे निर्घृण कृत्य सुरु आहे, असा घणाघात सामनातून करण्यात आलाय.

खुर्चीवर कोणता गुळाचा गणपती?

दरम्यान, राज्यात मुख्यमंत्री पदावरून दररोज नवनवे दावे केले जात आहेत. म्हणजेच सध्याचे मुख्यमंत्री लवकरच विसर्जित होणार हे नक्की.फक्त आता पाटावर कोणता गुळाचा गणपती बसवतात ते पहायचे, असा टोला सामनातून लगावण्यात आलाय.