ट्विटर मोदींच्या राजकीय प्रचाराचा आत्मा होता, त्याच बळावर निवडणुका जिंकल्या, मग आता भाजपचा विरोध का?: शिवसेना

| Updated on: Jun 07, 2021 | 7:31 AM

पाकिस्तान, कश्मीरच्या बाबतीत सर्जिकल स्ट्राईकचे युद्ध फिके पडेल असे मोठे युद्ध भाजपच्या सायबर फौजाच खेळत होत्या. | Shivsena Twitter Modi govt

ट्विटर मोदींच्या राजकीय प्रचाराचा आत्मा होता, त्याच बळावर निवडणुका जिंकल्या, मग आता भाजपचा विरोध का?: शिवसेना
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह
Follow us on

मुंबई: कालपर्यंत ट्विटर म्हणजे भाजप किंवा मोदी सरकारसाठी त्यांच्या राजकीय लढ्याचा किंवा प्रचाराचा आत्मा होता. याच सोशल मीडियाच्या बळावर 2014 साली भाजप सत्तेत आला. मात्र, आता ट्विटरचाच वापर करुन विरोधकांनी तोडीस तोड प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केल्यामुळे भाजपच्या (BJP) ट्विटर सेनेची दाणादाण उडाली आहे. त्यामुळे आता भाजपला ट्विटरचे ओझे झाले असून हे ओझे कायमचे फेकून द्यावे, या निर्णयाप्रत मोदी सरकार आल्याची टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे. (Shivsena slams Modi govt over social media policy)

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून यासंदर्भात भाष्य करण्यात आले आहे. फेसबुक, ट्विटर, व्हॉटस्ऍप या माध्यमांचा मनसोक्त वापर करण्याची रीत इतर राजकीय पक्षांना माहीत नव्हती तेव्हा या कार्यात (2014) भाजपने नैपुण्य प्राप्त केले होते. त्या काळातील प्रचारात भाजपच्या फौजा जमिनीवर कमी, पण सायबर क्षेत्रांतच जास्त खणखणाट करीत होत्या. ट्विटरसह सर्वच समाजमाध्यमांचे जणू आपणच मालक आहोत व सायबर फौजांच्या माध्यमांतून आपण कोणतेही युद्ध, निवडणूक जिंकू शकतो, विरोधकांना उद्ध्वस्त करू शकतो, असा एकंदरीत तोरा होता. पाकिस्तान, कश्मीरच्या बाबतीत सर्जिकल स्ट्राईकचे युद्ध फिके पडेल असे मोठे युद्ध भाजपच्या सायबर फौजाच खेळत होत्या. जणू अर्धे पाकिस्तान आता मोदी सरकारच्या ताब्यात आलेच आहे. आगामी काळात कराची, इस्लामाबादवर विजयी ध्वज फडकविण्याची तयारी सुरू असल्याचा माहोल भाजपच्या सायबर फौजांनी जगभरात निर्माण केला. हाच माहोल गरमागरम करून उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यांच्या निवडणुका जिंकल्या व ते करताना राजकीय विरोधकांची यथेच्छ बदनामी केल्याच्या मुद्द्याकडे शिवसेनेने बोट ठेवले आहे.

त्या काळात राहुल गांधी यांना ज्या शब्दांत ट्विटर किंवा फेसबुकवर शिवराळ शब्द वापरले गेले ते कोणत्या नियमात बसले? मनमोहन सिंगांसारख्या ज्येष्ठ नेत्यास काय काय विशेषणे लावली? उद्धव ठाकरे यांच्यापासून ममता बॅनर्जी, शरद पवार, प्रियांका गांधी, मुलायम सिंग यादव अशा राजकारण व समाजकारणात हयात घालविलेल्या नेत्यांच्या विरोधात या ‘ट्विटर’ वगैरेंचा वापर करून बदनामी मोहिमा राबविल्या गेल्या. जोपर्यंत हे हल्ले एकतर्फी पद्धतीने सुरू होते तोपर्यंत भाजपवाल्यांना गुदगुल्या होत होत्या, पण आता त्यांच्या सायबर फौजांसमोर विरोधकांचे त्याच ताकदीचे सैन्य उभे करून हल्ले सुरू झाले तेव्हा भाजपच्या तंबूत घबराट झाली, असे अग्रलेखात म्हटले आहे.

संबंधित बातम्या:

सरकारला ब्लू टिकचं पडलंय, लोकहो, तुम्हीच तुमच्या लसीची व्यवस्था करा; राहुल गांधींची खोचक टीका

(Shivsena slams Modi govt over social media policy)