रक्तदान करायचंय? ‘सिद्धिविनायक मंदिर न्यासा’ची व्हॅन घराखाली येणार

| Updated on: Mar 27, 2020 | 7:51 AM

कृपया गर्दी न करता रक्तदान करावे आणि रक्त संकलन करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी केलं (Siddhivinayak Temple Blood Donation)

रक्तदान करायचंय? सिद्धिविनायक मंदिर न्यासाची व्हॅन घराखाली येणार
Follow us on

मुंबई : राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या वतीने रक्तदान करण्याचं वारंवार आवाहन केलं जात आहे. राज्यात निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेता ‘श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासा’च्या वतीने मुंबईत रक्त संकलन करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. (Siddhivinayak Temple Blood Donation)

मुंबईमध्ये राहणाऱ्या ज्या नागरिकांना रक्तदान करण्याची इच्छा आहे, त्यांनी आपले नाव ‘श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरा’त दूरध्वनीद्वारे सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत नोंदवायचे आहे. त्यासाठी 022-24224438 आणि 022-24223206 हे संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत.

रक्तदात्याच्या राहत्या घराच्या जवळ, थेट सोसायटीच्या आवारात ‘श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासा’च्या वतीने महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाची रक्त संकलन व्हॅन पोहचेल. त्यामुळे रक्तदात्याना राहात्या ठिकाणी रक्तदान करता येईल.

कृपया गर्दी न करता रक्तदान करावे आणि रक्त संकलन करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी केलं आहे.

राज्यात काही दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे गर्दी टाळून, अंतर राखून रक्तदान करा, अशी कळकळीची विनंती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. याला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. (Siddhivinayak Temple Blood Donation)

‘रक्तदान करताना कोणताही संसर्ग होणार नाही, याची फक्त काळजी घ्यावी. अशा परिस्थितीत रक्त देऊ नये, असा कुठलाही नियम नाही. आम्ही याबाबत संपूर्ण अधिकृत माहिती घेतली आहे. तुम्हाला अशक्तपणा येऊन कोरोना होण्याची शक्यता नाही. रक्तदाते आणि ब्लड बँकने हे लक्षात घ्यावं आणि कमी झालेला साठा भरुन काढावा’ असंही राजेश टोपे म्हणाले होते.

लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या देवदूतांच्या मदतीला ‘सिद्धिविनायक’ आधीच धावून आला होता. श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून पोलिसांना जेवण, पाणी यांची सुविधा उपलब्ध करुन दिली जात आहे. न्यासातर्फे लॉकडाऊनच्या काळात दादर, नायगाव, वरळी भागात कर्तव्यावर तैनात असलेल्या पोलिस आणि वाहतूक पोलिसांना जेवण, पाणी सुविधा उपलब्ध करुन दिली जात आहे.

‘कोरोना’शी दोन हात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या काळात केवळ जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठीच सर्वसामान्य नागरिकांना घराबाहेर पडण्यास मुभा आहे. 14 एप्रिलपर्यंत देशभरात लॉकडाऊनचा कालावधी असेल.