नवी मुंबई : राजधानी मुंबईला लागून असलेल्या रायगड जिल्ह्यातील उरणमधील पुलावर दहशतवादी मजकूर लिहिल्याने खळबळ उडाली होती. हा मजकूर लिहिणाऱ्या तरुणाचा शोधही लागला. पण या तरुणाने मजकूर लिहिल्यानंतर स्वतःकडील तीन मोबाईल फोन आणि सिम कार्डची विल्हेवाट लावली होती. तुटलेल्या अवस्थेतील एक फोन आणि मार्कर पोलिसांच्या हाती लागला आहे. आमिर असं या तरुणाचं नाव असून फोन फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. उर्वरित दोन्ही फोन मिळवण्यासाठी या तरुणाची कोठडी वाढवून देण्याची मागणी कोर्टाकडे केली जाईल.
उरणमधील खोपटा पुलावर वादग्रस्त मजकूर लिहिल्याने खळबळ उडाली होती. अखेर पोलिसांनी हा मजकूर लिहिणाऱ्या आमिर उल्लाहशेख नावाच्या तरुणाचा शोध लावला. हा आरोपी मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. गेल्या 10 वर्षांपासून तो खोपटा येथे भाडे तत्वावर राहतो आणि एका खाजगी वाहतूक कंपनीत चालक म्हणून कामाला होता. अटक केल्यानंतर हा तरुण मनोरुग्ण असल्याचं सांगण्यात आलं. पण तीन मोबाईल आणि तेही फोडलेल्या अवस्थेत आढळल्याने संशय आणखी वाढला आहे.
तपासात सहकार्य नाही
सूत्रांच्या माहितीनुसार, आमिरकडून तपासामध्ये पोलिसांना कोणतंही सहकार्य केलं जात नाही. त्याच्याकडे एकूण तीन मोबाईल होते, ज्याची त्याने विल्हेवाट लावली. खोपटा पुलावर लिहिण्यापूर्वीच त्याने मोबाईल फेकून दिले होते. पण तिसरा मोबाईल मजकूर लिहिल्यानंतर फोडला आणि बातमी वेगाने सगळीकडे पसरल्यानंतर हा मोबाईल फेकून दिला. हा मोबाईल कशासाठी वापरला याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.
पोलिसांकडून जेव्हा या मोबाईलविषयी विचारणा केली जाते, तेव्हा मनोरुग्ण असल्याचं सांगून तो दिशाभूल करतो, अशी माहिती आहे. मी माझे तीनही मोबाईल नंबर विसरलो असल्याचं हा तरुण सांगतो. त्यामुळे फेकलेले तीनही मोबाईल शोधणं आणि त्याचा वापर कशासाठी झाला होता, त्याची माहिती घेण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.
काय आहे प्रकरण?
उरणच्या खोपटा पुलावर लिहिण्यात आलेले संदेश हे काळ्या शाईच्या मार्करने लिहिले होते. यामध्ये दहशतवादी बगदादी, हाफिज सईद आयसिस अशी नावं होती. विशेष म्हणजे अनेक चित्रांमध्ये जेएनपीटी जहाज, विमानतळ, पेट्रोल पंपही दाखवण्यात आले होते. लिहिलेला संदेश देवनागरी आणि इंग्रजीत होता. यानंतर पोलिसांनी यंत्रणा कामाला लावली आणि आरोपीचा शोध घेतला. या आरोपीवर दोन वर्षांपासून उपचार सुरु असल्याचं सांगण्यात येतंय. पण त्याच्याकडे तीन मोबाईल कशासाठी होते, या प्रश्नाचं उत्तर आता पोलीस शोधत आहेत.
VIDEO :