पक्षात काही लोकं असे आहते, त्यांच्यामुळे पक्षाची हानी होतेय – गोपाळ शेट्टी

भाजपचे नेते आणि माजी खासदार गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज आहेत. आधी लोकसभा आणि नंतर विधानसभेत देखील त्यांचं तिकीट कापल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सकाळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर ते उमेदवारी मागे घेतील अशी शक्यता होती. पण तसे संकेत अजून मिळालेले नाहीत.

पक्षात काही लोकं असे आहते, त्यांच्यामुळे पक्षाची हानी होतेय - गोपाळ शेट्टी
shailesh musale | Updated on: Nov 02, 2024 | 7:30 PM

भाजपचे नेते गोपाळ शेट्टी हे नाराज आहेत. बोरिवली मतदारसंघातून त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढवलीये. बोरिवली विधानसभेतून भाजपने संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिलीये. त्यामुळे आधी लोकसभा आणि नंतर विधानसभेत उमेदवारी न दिल्याने शेट्टी नाराज आहेत. आज गोपाळ शेट्टी यांनी सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो. भाजपचा प्रत्येक नेता म्हणेल की आम्ही पटवून देऊ. चुका होतात, त्या सुधारून पुढे जायला हवे. देवेंद्र फडणवीसजी उपमुख्यमंत्री आहेत पण माझ्यासाठी ते मुख्यमंत्री आहेत. ते माझ्या घरी आले तर हे मला आवडले नाही म्हणून मी त्यांच्या घरी गेलो.

ED कारवाईवर काय म्हणाले

गोपाळ शेट्टी म्हणाले की, मी यापूर्वीच सर्व बड्या नेत्यांना पत्र लिहून माझ्या सर्व मालमत्तेची चौकशी करून कारवाई करावी, अशी विनंती केली आहे. मी देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र लिहिले आहे, चौकशी करा, माझी सर्व मालमत्ता जप्त करा आणि मग कारवाई करा.

पुढे ते म्हणाले की, पीयूषजी यांनी या जागेवर निवडणूक लढवली ही उत्तर मुंबईसाठी अभिमानाची बाब आहे. 9 तारखेला अमित शहा येत आहेत. त्यांचे स्वागत करण्याचे आवाहन मी सर्वांना करेन. अमित शाह बोरिवलीत येत आहेत ही बोरिवलीकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.

अमित शाहांचे स्वागत करणार

काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर ते येत आहेत, मी सर्व कार्यकर्त्यांना आणि लोकांना त्यांचे स्वागत करण्याचे आवाहन करतो. कुणाला शिव्या देऊन मी महान होत नाही, काम करून महान बनतो. आज नवीन वर्ष आहे, मी आज सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ शकणार नाही. माझ्या हृदयातून आणि मनातून कमळ काढू शकत नाही. काही नेत्यांविरुद्ध मात्र लढत आहे. असं ही ते म्हणाले

गोपाळ शेट्टी म्हणाले की, पक्षाने काढलं, तरी मी पक्ष सोडणार नाही. मी आजही ठाम आहे. मी जे काम करतोय ते पक्षहितासाठी आहे. अन्य पक्षात जाणार नाही. पक्षात काही लोकं असे आहते, त्यांच्यामुळे पक्षाची हानी होतेय. माझी लढाई त्यांच्याविरोधात आहे. पक्ष हितासाठी जे करायचं ते करणार. माझं पाऊल पुढे पडलं, तर ते पक्ष हितासाठी असेल.”

Follow Us