
मुंबई म्हटलं की लोकांच्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे गर्दी आणि धावपळीचे जीवन. सकाळी उठायचं लोकल पकडायची आणि ऑफिसला जायचं आजूबाजूला त्याच बेरंगी इमारती, ब्रिज हे चित्र मुंबईकरांच्या आयुष्यात आता रोजच झाले आहे. मुंबईकरांच्या या बेरंगी जीवनात रंग भरण्याचं काम आता मुंबईतील तृतीयपंथी बांधव करत आहेत.

या तृतीयपंथी बांधवांनी मुंबईतील भिंती रंगवायला सुरुवात केली असून या भिंतींवर त्यांनी सुबक चित्रे रेखाटली आहेत या चित्रांमध्ये मुंबई पोलीस डॉक्टर नर्स यांच्या सुबक रेखाकृती साकारल्या आहेत.

यासंदर्भात टीव्ही 9 मराठीशी बोलताना 21 वर्षाच्या तृतीयपंथी काजल म्हणाल्या की, "मला पहिल्यापासून चित्रकलेची आवड होती. त्यानंतर मला हरमानी आर्ट प्रोजेक्ट बद्दल माहिती मिळाली. मला त्यांचं सुरुवातीला काम आवडायचं मग मी या संस्थेसोबत काम सुरू केलं. जिथे कुठे पेंटिंगची काम असतील त्यानुसार आम्हाला ऑर्डर येतात आम्ही तिथे जाऊन त्याच्या ऑर्डर पूर्ण करत असतो."

काजल म्हणाल्या की, "आमचं इंस्टाग्राम पेज आहे. त्यावर आम्ही काढलेले चित्र पोस्ट करत असतो. लोक आमची पेंटिंग बघतात ज्यांना आवडते ती लोक ऑर्डर देतात. आत्तापर्यंत आम्ही राजस्थान दिल्ली यांसारख्या ठिकाणी जाऊन देखील भिंतींवर सुरेख चित्र काढण्याची कामे केली आहेत. महाराष्ट्रात मुंबई सोबतच नाशिक मध्ये आम्ही पेंटिंगची कामे केली आहेत."

काजल सांगतात "आम्ही तृतीयपंथी असल्याने सहसा आम्हाला कोण काम देत नाही. त्यामुळे आमच्या समाजाची बरीचशी लोक कोणी भीक मागून तर कोणी शरीर विक्री करून आपलं पोट भरत असतात. आमच्यातली फार कमी लोक आहेत ज्यांनी काही तरी व्यवसाय केला आहे अथवा दुसरी अन्य कामे केली आहेत. आमची चित्रकला चांगली आहे. त्यामुळे आम्हाला काम मिळालं आणि आमची कलाच आमच्या रोजगाराचं साधन बनली."

मुंबईतील भींती रंगवून या तृतीयपंथी बांधवाच्या आयुष्यातची प्रेरणेचे नवे रंग भरले गेले आहेत.

मुंबईचं सौंदर्य आणखी खुलवण्याऱ्या या भिंती मुंबईकरांचं मन प्रसन्न करण्यासाठी आणि इतरांनाही आकर्षित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजवतो आहे.

फक्त मुंबईच नव्हे तर राजस्थान दिल्लीतही या तृतीयपंथीयानं आपली कला भिंतींवर रेखाटली आहे.

एक मानाचं काम मिळाल्यानं या तृतीयपंथीयांच्या मनातील उत्साहाचे रंग मुंबईतील भिंतीवर उतरल्याचं दिसून आलंय.

मुंबईतील फ्लायओव्हरचे खांब आणि भिंतींवर दिसणाऱ्या या चित्रांनी सगळ्यांचं लक्ष सध्या वेधून घेतलं आहे.

वॉल पेन्टिंगच्या कामानं तृतीयपंथी बांधवांना आपली अशी एक वेगळी आणि सन्मानाची ओळखही मिळवून दिली आहे.