जेव्हा मुख्यमंत्री ठाकरे फडणवीस सरकारची स्तुती करतात

| Updated on: Jan 29, 2021 | 6:18 PM

"पूर्वीच्या सरकारने जे काम केलं ते नाकारण्याचा नतभ्रष्टपणा मी करणार नाही. पण पूर्वीच्या सरकारपेक्षा अधिक गतीने मी ते काम पूर्ण करतोय", असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लगावला (Uddhav Thackeray appreciate work Devendra of Fadnavis government).

जेव्हा मुख्यमंत्री ठाकरे फडणवीस सरकारची स्तुती करतात
Follow us on

मुंबई : मुंबई मेट्रोच्या मेड इन इंडिया कोचचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. हा कार्यक्रम चारकोप येथील डेपोमध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे यांच्यासह पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, महापौर किशोरी पेडणेकर उपस्थित होते. यावेळी भाषण करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रविण दरेकर यांचं नाव घेत फडणवीस सरकारच्या कामांची स्तुती केली (Uddhav Thackeray appreciate work Devendra of Fadnavis government).

“शिवसेनाप्रमुख म्हणायचे, लोकांना पाहिजे ते द्या. बरोबर आहे. जनतेला जे आवश्यक आहे, जनतेला ते कळले पाहिजे, अरे हेच तर मला पाहिजे होतं. तसं जनतेला जे आवश्यक आहे ते महाराष्ट्र सरकार देत आहे. प्रविण दरेकर, तुम्हीपण बसला आहात. यापूर्वीच्या सरकारनेही चांगलं काम केलं. असं नाही की, यापूर्वीच्या सरकारने चांगलं काम केलं नाही, असं म्हणणारा मी नतभ्रष्ट नक्कीच नाही. पूर्वीच्या सरकारने जे काम केलं ते नाकारण्याचा नतभ्रष्टपणा मी करणार नाही. पण पूर्वीच्या सरकारपेक्षा अधिक गतीने मी ते काम पूर्ण करतोय”, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लगावला (Uddhav Thackeray appreciate work Devendra of Fadnavis government).

“काही वेळापूर्वी मी बीएसटीच्या आधुनिक केंद्राचा उल्लेख केला. त्यामध्ये एमएमआर रिझनमध्ये जे प्रवासी लोक येतात त्यांना पुढचा बस स्टॉप कुठे याची माहिती देणारी यंत्रणा असणार आहे. अशी लोकाभिमूख कामं सुरु आहेत. लोकाभिमूख म्हणजे काय? लोकांचं मुख एका बाजूला आणि सरकारचं मुख एका बाजूला, असं नाही. याला लोकाभिमूख नाही म्हणत. लोकांवर अन्याय, अत्याचार होतंय. ते काहितरी मागत आहेत. पण सरकार ढिम्म हालायला तयार नाही हे लोकाभिमूख सरकार असूच शकत नाही. तशी माझी लोकाभिमुखची व्याख्याची नाही”, असंदेखील मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

“मधल्या काळात थोडीफार टीका झाली. तुम्ही विकास कामांना स्थगिती देतात, अशी टीका झाली. स्थगिती कुठेही दिलेली नाही. जर स्थगिती दिली असती तर कामच झाली नसती. पण एकेक कामं पुढे जात आहेत. मध्ये मी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं काम बघून आलं. मे महिन्यापासून तो महामार्ग सुरु होतोय. नागपूर ते शिर्डी अशा टप्प्यात तो सुरु होणार आहे. एकेक मोठी कामं पुढे जात आहेत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“विकास कामं कोव्हिड काळात जरुर मंदावली. कारण तो काळ भीषण होता. त्या काळात सुद्धा काम सुरुच राहिलं. मेट्रोचं रुपडं फार आकर्षक आहे. आताच्या घडीला जे जे आवश्यक आहे ते सगळं सरकार करत आहे”, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

“मेड इन इंडिया कोच या गाडीचं वैशिष्ट्य म्हणजे या गाडीला ड्रायव्हरच नाही. अत्यंत देखणं असं रुप आहे. जे परदेशात किंवा टीव्हीत पाहायला मिळतं अगदी तशी गाडी आहे. आतमध्ये व्हिलचेअरची व्यवस्था आहे. सायकल ठेवायचीदेखील व्यवस्था आहे. सगळं या गाडीत आहे. मुंबईत जेवढी कामं सुरु आहेत, तेवढी मेट्रोची कामे जगाच्या पाठीवर कुठे चाललेली नसतील. हा सुद्धा एक अभिमानाचा विषय आहे. महाराष्ट्र कधी थांबला नाही. महाराष्ट्र कधी थांबणार नाही, हे फार महत्त्वाचं आहे”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा : मुंबईत मेट्रोची भरपूर कामे, महाराष्ट्र थांबला नाही, कधी थांबणारही नाही : मुख्यमंत्री