शेताच्या बांधावरुन पिकांची नोंदणी होणार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ई-पीक ॲपविषयी महत्त्वाची बैठक

| Updated on: Sep 21, 2020 | 7:39 PM

ई पीक ॲपमुळे शेतकऱ्यांचे कष्ट कमी होण्याबरोबरच त्यांच्या मालाला योग्य भाव आणि चांगली बाजारपेठ मिळण्यास मदत होणार आहे (Uddhav Thackeray comment on E Crop Survey).

शेताच्या बांधावरुन पिकांची नोंदणी होणार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ई-पीक ॲपविषयी महत्त्वाची बैठक
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ई-पिक पाहणी मोबाईल ॲपबाबत महत्त्वाची बैठक झाली. या ॲपमुळे शेतकऱ्यांचे कष्ट कमी होण्याबरोबरच त्यांच्या मालाला योग्य भाव आणि चांगली बाजारपेठ मिळण्यास मदत होणार आहे (Uddhav Thackeray comment on E Crop Survey). त्यामुळे हे ॲप शेतकऱ्यांसाठी ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ ठरेल. यासाठी येणाऱ्या काळात राज्यातील पिकांचा नकाशा तयार करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले , “आज कृषी विभागाने विकेल ते पिकेल ही योजना आणली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना चांगली बाजारपेठ, मालाला योग्य भाव मिळवून देणे यावर भर देण्यात येत आहे. याचनुसार या मोबाईल ॲपमुळे शेतकरी वर्ग संघटित होणे आवश्यक आहे. ई-पिक पाहणी मोबाईल ॲपमध्ये केवळ शेतकऱ्यांची माहिती गोळा करणे हे लक्ष्य नाही. शेतकऱ्यांनी कोणतं पीक घेणे आवश्यक आहे, कोणते पीक कोणत्या विभागात घेतले जाणे आवश्यक आहे, कोणत्या पीकाला चांगली बाजारपेठ उपलब्ध आहे, पिकाला योग्य भाव कसा मिळेल याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे.”

“ई- पिक पाहणी संदर्भात मोबाईल ॲप विकसित करताना यामध्ये कोणत्याही उणीवा राहू नये यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. या मोबाईल ॲपचा उपयोग शेतकऱ्यांनाच होणार असल्याने त्यांच्यासाठी हे किती महत्वाचे आहे हे त्यांना समजावून सांगणे महत्वाचे आहे. वस्तुस्थिती दर्शक, सद्यस्थिती दर्शक संकलित करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. या ॲपमध्ये शेतकऱ्यांना ऑनलाईनबरोबरच ऑफलाईन पध्दतीने माहिती, इमेजेस अपलोड करण्याची सोय देण्यात आली ही अत्यंत चांगली बाब आहे,” असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, “टाटा ट्रस्टमार्फत शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात येणारे ई- पिक पाहणी संदर्भातील मोबाईल ॲप हे अत्यंत उत्कृष्ट ॲप असणार आहे. सध्या 9 तालुक्यांतील शेतकऱ्यांच्याकडून माहिती संकलित करण्याचे काम सुरु आहे. या नव्या ॲपमुळे शेतकऱ्यांच्या आणि तलाठी यांच्या वेळेची बचत होण्याबरोबरच शेतकऱ्यांना आपल्या पिकांची माहिती देणे अधिक सोपे होणार आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीमुळे या कामात पारदर्शकता, गतिमानता आणि अचूकता येण्यास मदत होणार आहे. एकाच वेळी 240 हून अधिक पिकांची माहिती मिळणे, पिकांची वर्गवारी करणे सोपे होणार आहे. परंतु हे करीत असताना शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन अधिकाधिक शेतकऱ्यांना या प्रक्रियेत सामावून घेणे आवश्यक आहे.”

कृषीमंत्री दादासाहेब भुसे म्हणाले, “या ॲपची अंमलबजावणी करीत असताना याचे सूक्ष्म नियोजन करणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ सरसकट सर्व शेतकरी वर्गाला मिळणे गरजेचे आहे. मिश्र पिक घेत असल्याची नोंद असणे, दुबार पेरणी करीत असल्यास त्याचे नेमके नियोजन, ग्रामसेवक आणि तलाठी यांच्यामार्फत रँडम चेंकिग याबाबतही नियोजन करणे आवश्यक आहे.”

“या ॲपमुळे अतिवृष्टी किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास त्यांना नुकसान भरपाई नेमकी कशी द्यायची याची माहिती मिळण्यास मदत होईल,” अशी माहिती महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.

या बैठकीला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, कृषी मंत्री दादाजी भुसे, कृषी राज्यमंत्री अब्दुल सत्तार, मुख्य सचिव संजय कुमार, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव विकास रस्तोगी, निवृत्त मुख्य सचिव जयंत बांठिया, टाटा ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनाथ नरसिंहन, प्रकल्प सल्लागार सर्वश्री नरेंद्र कवडे, संभाजी कडू- पाटील, तंत्रज्ञ प्रमुख निलेश खानोलकर यांच्यासह टाटा ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा :

विदर्भातील पुराचा गडचिरोली, चंद्रपुराला मोठा फटका, अनेकांचे संसार उघड्यावर, गोरगरिबांचंही प्रचंड नुकसान

राज्यातील ओल्या दुष्काळाच्या पाहणीसाठी केंद्रीय पथकाचा तीन दिवसीय दौरा

ज्वारीच्या कणसांना कोंब, सोयाबीन मातीमोल, गंगाखेडच्या शेतकऱ्यांची सरसकट भरपाईची मागणी

Uddhav Thackeray comment on E Crop Survey