मला जायचं असेल तर…; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं मविआच्या पत्रकार परिषदेत भाष्य
Uddhav Thackeray on BJP and NDA : विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर महिविकास आघाडीची प्राथमिक बैठक झाली. यानंतर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली. यात उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत जाण्यावर भाष्य केलंय. उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...
2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी महायुतीतून बाहेर पडत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यासोबत येण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राज्यातली राजकीय गणितं बदलली. पण आता पाच वर्षे झाल्यानंतर लोकसभा निवडणुकी दरम्यान आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरे पुन्हा महायुतीत जातील का? अशी चर्चा होत आहे. यावर स्वत: उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलंय. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक पार पडली आणि त्यानंतर पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत मविआच्या नेत्यांसमोर उद्धव ठाकरे यांनी यावर भाष्य केलं. उद्धव ठाकरे कधीना कधी एनडीएत येतील?, असा प्रश्न पत्रकाराने विचारताच मला समजा एनडीएत जायचं असेल तर यांच्यात बसून हो सांगू?, अशी मिश्किल टिपण्णी उद्धव ठाकरेंनी केली. त्यानंतर एकच हशा पिकला.
गााण्याचं उदाहरण देत म्हणाले…
सोडून गेलेल्यांना घेणार का?, असा प्रश्न प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला. तेव्हा अजिबात परत घेणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. एक जुनं गाणं आहे. पारिजात माझ्या दारी फुले का पडती शेजारी. माणिक वर्माचं गाणं आहे. तुम्हाला माहीत नसेल, शरद पवार यांना माहीत आहे. तरीही आम्ही पारिजातकाला पाणी घालायचं सोडणार नाही. तुम्हाला आठवतं काही महिन्यांपूर्वी अमित शाह म्हणाले नीतीश कुमार यांच्यासाठी दरवाजे बंद है, चंद्राबाबूंसाठी बंद आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
मी 22 जानेवारीला काळाराम मंदिरात गेलो. 23 जानेवारी रोजी नाशिकमध्ये म्हटलं भाजप मुक्त राम पाहिजे. अयोध्येत आणि नाशिकमध्ये भाजपमुक्त राम झाला आहे. जिथे जिथे राम आहे. तिथे भाजपचा पराभव झालाय. भाजपमुक्त राम झाला आहे, असं विधानही उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
नरेेंद्र मोदींवर निशाणा
नरेंद्र मोदी यांना समजायला पाहिजे होतं. संपूर्ण देशाने त्यांना पंतप्रधानपद दिलं होतं. कसंबसं त्यांचं पंतप्रधानपद वाचलं. किती दिवस सरकार राहील सांगता येत नाही. गुजरातबाबत चालुगिरी करायला लागले, तर त्यांच्या मूळ राज्यातच त्यांना सुरुंग लागेल. नरेटिव्ह म्हणता, ते एका बाजूला आहे. पण यांच्यात खरेपणा नाही. यांचा फोलपणा समोर आला आहे. देशातील जनता जागी झाली. मोदींवर लोकांचा विश्वास होता. तो उडाला आहे. आता पुढील निवडणुकीत देशाचं चित्र अधिक चांगलं राहील, असं मविआच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.