उद्धवजी, पुलवामाबद्दलचे तुमचे प्रश्न बरोबर, आता पूल दुर्घनेबद्दल बोला!
मुंबई: मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झाला आहे का, हा प्रश्न विचारुन विचारुन आता इतका पुळचट झाला आहे की त्यापुढे शिवसेनेचा टुकार कारभारही फिका पडू लागला आहे. मुंबईवर 25 वर्षांपासून राज्य करणाऱ्या शिवसेनेच्या कारकिर्दीत तेच तेच प्रश्न आणि तीच ती प्रेतं हे एक समीकरण बनलं आहे. मुंबईकरांचे कैवारी म्हणणाऱ्या शिवसेनेच्या भोंगळ कारभाराच्या चिंधड्या हे मुंबईतील प्रश्नांपेक्षा […]
मुंबई: मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झाला आहे का, हा प्रश्न विचारुन विचारुन आता इतका पुळचट झाला आहे की त्यापुढे शिवसेनेचा टुकार कारभारही फिका पडू लागला आहे. मुंबईवर 25 वर्षांपासून राज्य करणाऱ्या शिवसेनेच्या कारकिर्दीत तेच तेच प्रश्न आणि तीच ती प्रेतं हे एक समीकरण बनलं आहे. मुंबईकरांचे कैवारी म्हणणाऱ्या शिवसेनेच्या भोंगळ कारभाराच्या चिंधड्या हे मुंबईतील प्रश्नांपेक्षा अधिक आहेत. मुंबईत प्रत्येत 4-6 महिन्याला काही ना काही दुर्घटना होते आणि मुंबई महापालिकेच्या थुकरट कारभाराची चिटुरं उघडी पडतात. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाबाहेरचा पादचारी पूल गुरुवारी रात्री कोसळला. या अपघातात 6 जणांचा बळी गेला आणि देशाच्या आर्थिक राजधानीवर सत्ता असलेल्या शिवसेनेच्या कारभाराने चव्हाटीगिरीचं शिखर गाठलं.
गेल्या महिन्यात 14 फेब्रुवारीला जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा हल्ला झाला. त्यानंतर दुर्दैवी योगायोग म्हणजे 14 मार्चला मुंबईत पूल दुर्घटना घडली. पुलवामा आणि पूल दुर्घटनेचा तसा काही संबंध नाही. मात्र यातल्या शिवसेनेच्या राजकारणाचं पिल्लू उघडं पाडायलाच हवं.
14 फेब्रुवारीला पुलवामा हल्ला झाला, त्यानंतर देशभरात संतापाची लाट होती. साहजिकच देशप्रेम टिच्चून भरलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आपल्या फैरी झाडल्या.
हा आपल्या गुप्तचर यंत्रणेच्या चिंधड्या उडवणारा हल्ला आहे. एवढा मोठा हल्ला होणार याची माहिती नसेल, तर या यंत्रणांचा प्रमुख नेमका करतो काय, असा सवाल करत त्यांनी अप्रत्यक्षपणे अजित डोवालांवर निशाणा साधला होता. त्याचवेळी त्यांनी पाकिस्तानचा सोक्षमोक्ष लावण्याची मागणी केली होती.
आता उद्धव ठाकरेंच्या त्या प्रतिक्रियेचा आणि मुंबईतील पूल दुर्घटनेचा संबंध काय असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो.
उद्धव ठाकरे ज्या त्वेषाने गुप्तचर यंत्रणांवर बोट ठेवत होते, त्याच त्वेषाने त्यांनी मुंबईतील प्रशासन, अधिकारी आणि पादचारी पुलांच्या जर्जतेकडे लक्ष घातलं असतं, तर आज अनेकांच्या मृत्यूचं पाथक त्यांच्या माथी आलं नसतं.
उद्धव ठाकरे यांनी पुलवामा हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. मात्र त्यांच्या हद्दीतील मुंबई महापालिका क्षेत्रातील पूल दुर्घटना झाल्यानंतर अनेक तास उलटूनही उद्धव ठाकरे दिसले नाहीत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोनवेळा घटनास्थळी गेले. मात्र सर्वात मोठी महापालिका सांभाळणाऱ्या उद्धव ठाकरेंना किंवा त्यांचे चिरजींव आदित्य ठाकरे यांना अद्याप घटनास्थळी जाण्यासाठी वेळ मिळाला नाही. तुम्ही पुलवामाबद्दल जरुर प्रश्न विचारा, मात्र पूल दुर्घटनांबद्दलही तुम्ही उत्तरं द्यायला हवीत.
उद्धव ठाकरेंचा संबंध काय?
आशिया खंडातील सर्वात मोठी महापालिका उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या ताब्यात आहे. याच मुंबई महापालिकेच्या अखत्यारित मुंबईतील पायाभूत सुविधा ठिकठाक असणं आवश्यक आहे. मागील काही पूल दुर्घटना झाल्यानंतर या पुलांचं ऑडिट करण्याचं निश्चित झालं. ऑडिट रिपोर्टही सादर झाले. सीएसएमटीजवळ जो पूल पडला, त्याचाही ऑडिट रिपोर्ट आला ज्यामध्ये हा पूल फिट असल्याचं नमूद आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
जर पूल ठिक असूनही तो कोसळला असेल, तर उद्धव ठाकरे अजून गप्प का? जर गुप्तचर यंत्रणांच्या अहवालाबाबत उद्धव ठाकरे पुलवामा हल्ल्यावरुन सरकारला घेरत असतील, तर ऑडिट रिपोर्ट आणि जर्जर पुलांची जबाबदारी उद्धव ठाकरेंची नाही का?
गेल्या वर्षी फेब्रुवारीतील आकडेवारीनुसार मुंबई महापालिकेच्या जवळपास 69 हजार कोटीच्या मुदत ठेवी विविध बँकांमध्ये पडून आहेत. मात्र या ठेवी नेमकी कोणासाठी आहेत? त्या ठेवी मुंबईकरांच्या सुविधांसाठी बाहेर काढायच्या असतील, तर अजून किती मुंबईकरांचे बळी द्यावे लागतील? अ
जर बेस्ट बसचे तिकीट चेकर ठराविक ठिकाणी उभं राहून तिकीट चेक करतो, त्याप्रमाणे या पुलांची जबाबदारी, धोकादायक इमारती, अग्निशमन यांची जबाबदारी देता येऊ शकते का, याबाबत विचार करायला हवा.
मुंबईत पाऊस पडून मृत्यू होतो, रस्त्यावर चालताना झाड कोसळून मृत्यू होतो, मॅनहोलमध्ये पडून मृत्यू होतो. मुंबईकरांच्या मृत्यूसाठी आता नवं कोणतंच कारण शिल्लक राहिलं नाही, आता मुंबईत राहणं हेच एक मृत्यूचं कारण ठरत आहे.!