Uddhav Thackeray : भाऊसाहेब वाकचौरे यांनी पक्षप्रवेश करताच उद्धव ठाकरे म्हणाले, या पापी, गद्दारांना…

मी घरवापसी केली आहे. आता मी कायम उद्धव ठाकरे यांच्या पाठीशीच उभा राहणार आहे, असं माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर ते मीडियाशी संवाद साधत होते.

Uddhav Thackeray : भाऊसाहेब वाकचौरे यांनी पक्षप्रवेश करताच उद्धव ठाकरे म्हणाले, या पापी, गद्दारांना...
uddhav thackeray
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 23, 2023 | 3:05 PM

निवृत्ती बाबर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 23 ऑगस्ट 2023 : शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. मातोश्री निवासस्थानी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हातात शिवबंधन बांधून वाकचौरे यांनी पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी करत संपूर्ण मातोश्री परिसर दणाणून सोडला. वाकचौरे यांच्या पक्षप्रवेशामुळे ठाकरे गटाची नगर जिल्ह्यातील ताकद वाढली आहे. वाकचौरे यांनी पक्षात प्रवेश करताच उद्धव ठाकरे यांनी थेट भाजप आणि शिंदे गटावर हल्ला चढवला. काही पापी लोक शिवसेना संपवायला निघाले आहेत. शिवसैनिक त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. वाकचौरे परत शिवसेनेत आलेत. शिवसेना सोडल्याबद्दल त्यांनी माफी मागितली आहे. चुकीला माफी आहे, परंतु पाप करणाऱ्यांना मात्र गाडायचे आहे. शिवसेना संपवण्याची भाषा करणाऱ्यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरावे, आमचे शिवसैनिक त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

त्यांनी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला नाही

शिर्डीची जागा आपलीच आहे, आपल्याला ती निवडून आणायची आहे. भाऊसाहेब यांनी शिवसेना सोडली. पण कधी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला नाही. हे पापी, गद्दार शिवसेना संपवायला निघालेत. त्याचा शिवसैनिक बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, असंही ते म्हणाले.

चूक केली, पण पाप नव्हते केले

भाऊसाहेबांनी चूक केली होती, पण पाप केले नव्हते. भाऊसाहेब माझी माफी मागितली नाही तरी चालेल पण शिवसैनिकांची माफी मागावी. पक्ष संपवणारा विरोधक पहिल्यांदा आपण पाहत आहोत. शिवसैनिक चुकीला माफी देतो. पण पापाला माफी देत नाही. राजकारणातून गद्दारांना संपवायचं आहे, असा टोला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता लगावला.

चमत्कार घडणार आहे

शिर्डीचा खासदार आता आपलाच पाहिजे. गद्दारांची मस्ती उतरावयीची आहे. या पापी गद्दारांना गाडण्यासाठी तुम्ही तयार आहातच, असं सांगतानाच श्रद्धा आणि सबूरी गरजेची. पण यांच्याकडे ना श्रद्धा न सबूरी आहे. मी लवकरच शिर्डीला येणार आहे. साईबाबांचे आशीर्वाद घेणार आहे. शिर्डीत लवकरच जाहीर सभा घेणार आहे, अशी घोषणाही त्यांनी केली. दिल्लीच्या तख्तावर निर्घूण राजकारणी बसले आहेत. महाराष्ट्रातही तेच चित्र आहे. महाराष्ट्रात चमत्कार घडणार आहे. देशातच पण चमत्कार घडणार आहे, असा दावाही त्यांनी केला.