Video : पळून पळून मारहाण… जत्रा जमली, पण कुणीही वाचवलं नाही; ‘त्या’ रिसॉर्टवर असं काही घडलं… सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

Arnala Beach Seven Sea Resort CCTV footage : अर्नाळा बीचवरील घटनेची राज्यभर चर्चा होताना दिसत आहे. ठाणे जिलह्याचे माजी शिवसेनाप्रमुख रघुनाथ मोरे यांचे सुपुत्र मिलिंद मोरे यांचा मृत्यू झाला. संध्याकाळी रिसॉर्टवर नेमकं काय घडलं? सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.

Video : पळून पळून मारहाण... जत्रा जमली, पण कुणीही वाचवलं नाही; त्या रिसॉर्टवर असं काही घडलं... सीसीटीव्ही फुटेज व्हायरल
| Updated on: Jul 29, 2024 | 6:49 PM

वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील नवापूर येखील अर्नाळा बीचजवळ असलेल्या रिसॉर्टमध्ये धक्कादायक घटना घडली. सेवन सी रिसॉर्ट मध्ये एका पर्यटनासाठी आलेल्या कुटूंबाला मारहाण झाली. यामध्ये एका पर्यटकाचा मृत्यू झाला, हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचं शवविच्छेदनाच्या अहवालामध्ये म्हटलं आहे. मिलिंद मोरे असं मृत पर्यटकाचं नाव आहे. शिवसेनेचे ठाणे माजी जिल्हा प्रमुख रघुनाथ मोरे यांचे ते सुपुत्र होते. या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली असून सेवन सी रिसॉर्टवर हातोडा फिरवण्यात आला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असून नेमकं काय घडलं जाणून घ्या.

पिकनिकसाठी मयत मिलिंद मोरे आपल्या कुटुंबातील 15 ते 20 जणांसोबत फिरायला गेले होते. संध्याकाळी पिकनिक झाल्यालवर घरी येत असताना रिसॉर्टच्या गेटमधून बाहेर पडताना एका रिक्षाचा त्यांना धक्का लागला. त्यावेळी तिथे त्यांची भांडणे झालीत आणि मिलिंद मोरे आणि त्यांच्यासोबतच्या इतर दोघांना मारहाण झाली.

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यावर लक्षात येईल की त्यावेळी तिथल्या जमावाने त्यांना गेटच्या बाहेर नेत मारहाण केली. त्यावेळी तिथे असलेल्या कोणीही मध्ये पडत वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. त्यानंतरच्या एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की बोलणं सुरू असताना गाडीजवळ उभे असलेल्या मिलिंद मोरे अचानक चक्कर येऊन खाली कोसळला. त्यावेळी सर्वांनी पळापळ करून मोरे यांना जवळच्या प्रकृती रूग्णलयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं.

 

या घटनेची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळताच त्यांनी परिमंडळ तीनच्या पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांना फोन करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. याबाबत नवीन कायद्याच्या कलमान्वय अर्नाळा पोलीस ठाण्यात 7 ते 8 महिला आणि 8 ते 10 अनोळखी पुरुष यांच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

या भागात अनधिकृतपणे सुरू करण्यात आलेल्या या रिसॉरर्ट्सच्या विरोधात स्थानिक नागरिकांनी अनेकदा पालिका प्रशासनाकडे तक्रार करून ती बंद करावीत अशी मागणी केली होती. मात्र आज अखेर मुख्यमंत्र्यांनी या रिसॉर्टसच्या विरोधात कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर या कारवाईला गती आली आहे. सकाळपासून पलिकेने या रिसॉर्टसह अनेक अनधिकृत रिसॉर्टसवर तोडक कारवाई केली असून ही कारवाई यापुढेही चालु राहणार आहे.