आभाळ फाटलं! अन् माणुसकी हरवली, कुणी लूट केली, तर कुणी… वसई-विरारमधील नागरिकांचे विदारक अनुभव

पालघर, वसई-विरारमध्ये अतिवृष्टीने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. रस्ते पाण्याखाली, वीज-नेटवर्क खंडित झाल्याने नागरिक हवालदिल आहेत. या आपत्कालीन परिस्थितीत काही वाहनचालकांनी प्रवाशांची लूट केली, तर प्रशासकीय मदतीचा अभाव नागरिकांना तीव्रतेने जाणवला. माणुसकी हरवल्याचे विदारक अनुभव अनेकांना आले, तर काही ठिकाणी मदतीचा हातही पुढे सरसावला.

आभाळ फाटलं! अन् माणुसकी हरवली, कुणी लूट केली, तर कुणी... वसई-विरारमधील नागरिकांचे विदारक अनुभव
वसई-विरार
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jul 08, 2026 | 6:43 PM

गेल्या पाच दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने पालघर, वसई आणि विरारमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांच्या घरात पाणी आलं आहे. अनेक सोसायट्यांसमोर तळं साचलं आहे. रस्ते पाण्याखाली गेले आहे. विजेचे पोल तुटले आहेत. वायफाय बंद आहे. फोन बंद आहेत. नेटवर्क नाहीये. बत्ती गुल झालीय. कुणाचाही कुणाशी संपर्क होत नाहीये. एखाद्या दुर्गम भागात असणाऱ्या नागरिकांसारखी या भागाची अवस्था झाली आहे. प्रशासनाकडून नागरिकांना दिलासा दिला जाईल असं काहीच घडताना दिसत नाहीये. काल तर लोकल ठप्प होती. त्यामुळे घराकडे जाताना नागरिकांचे प्रचंड हाल झाले. वसईवरून विरारला जाण्याऱ्यांची अनेकांनी लूट केली. रिक्षा, ट्रक आणि टॅक्सी चालकांनी लोकांची आपत्ती ही संधी असल्याचं मानून लूट केली. आपत्तीतही माणुसकी हरवली. तर काही रिक्षा, टॅक्सीचालकांनी मदतीचा हातही दिला. स्थानिक नागरिकांनी सांगितलेले कालचे अनुभव अत्यंत विदारक आणि हेलावून टाकणारे होते.

वसई विरारमध्ये चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमध्ये शहरातील सर्वच रस्ते पाण्याखाली गेले. त्यामुळे रिक्षा, बस, कार काहीच रस्त्यावर चालू शकत नव्हते. जी वाहन घराबाहेर पडली ती पाण्यात बंद पडत होती. मात्र या सर्व प्रवाशांना तारले ट्रॅक्टर प्रवाशी वाहतुकीने. पण अतिवृष्टीचा फायदा घेवून अवघ्या तीन ते चार किलोमीटरसाठी ट्रॅक्टर चालकांनी 50 ते 100 रुपयेही अडवून घेतले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

फक्त 10 रुपये एक्स्ट्रा घेतले

अतिवृष्टीत विरार बोलिंज रस्त्यावर गुडगा ते मांडी इतके पाणी साचले होते. हे तीन किलोमीटर चे अंतर आहे. या अंतरसाठी रिक्षाला 20 रुपये भाडे होते. पण अतिवृष्टीत ट्रॅकर प्रवाशी वाहतुकीत 10 रुपये अतिरिक्त म्हणजे प्रवाशाला 30 रुपये देवून नागरिक प्रवास करीत आहेत. आम्ही कोणतीही लूट करत नाहीत तर साचलेल्या पाण्यामुळे आम्ही 10 रुपये अतिरिक्त घेतो, असे ट्रॅकर चालक किरण धोत्रे आणि दीपक खांडेकर यांनी सांगितले.

अडवणूक केली

सर्वच जलमय झालेले असताना ट्रॅकर चालकांनी आम्हाला मोठा आधार दिला आहे. 30 रुपयामध्ये आम्ही सुखरूप तरी घरी पोहचलो, असे काही प्रवाशांचे म्हणणे आहे. तर ट्रक चालकांनी आमच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन जास्त पैसे उकळल्याचा आरोप नरेश म्हात्रे, सूरज काळे आणि प्रकाश मोहिते या प्रवाशांनी केला आहे.

ना आमदार फिरकला, ना खासदार

विरार पश्चिम एम बी इस्टेटमधील दत्त नगर, मस्जिद गल्ली आणि रश्मी नगर आजही पाण्याखाली आहे. आज पाचव्या दिवशीही रस्त्यावर गुडघा ते कंबरे इतके पाणी आहे. आजूबाजूच्या सोसायटीमध्येही पाणी साचले आहे. लोकांचे हाल सुरू असताना कोणीही आमदार, खासदार, नगरसेवक कोणीही फिरकलेही नाहीत, असा आरोप नागरिकांनी केला आहे.

Follow Us