आम्ही दिवा स्वप्न पाहात नाही, पण 2024ला आमचं स्वप्न पूर्ण करू; रावसाहेब दानवेंचा राऊतांना टोला

| Updated on: Jul 18, 2021 | 7:10 PM

महाराष्ट्रात राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप असं नवीन समीकरण उदयास येण्याची शक्यता शिवसेना नेते संजय राऊत यांनी फेटाळून लावली आहे. अशी स्वप्नं पडणं हा आजार आहे, अशी टीकाही राऊत यांनी केली होती. (raosaheb danve)

आम्ही दिवा स्वप्न पाहात नाही, पण 2024ला आमचं स्वप्न पूर्ण करू; रावसाहेब दानवेंचा राऊतांना टोला
raosaheb danve
Follow us on

मुंबई: महाराष्ट्रात राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप असं नवीन समीकरण उदयास येण्याची शक्यता शिवसेना नेते संजय राऊत यांनी फेटाळून लावली आहे. अशी स्वप्नं पडणं हा आजार आहे, अशी टीकाही राऊत यांनी केली होती. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या मुद्द्यावर राऊतांना फटकारले आहे. आम्ही दिवा स्वप्न पाहत नाही. आमचं स्वप्न 2024ला पूर्ण करू, असा टोला रावसाहेब दानवे यांनी राऊतांना लगावला आहे. (we will fulfill our dream in 2024 poll, says raosaheb danve)

रावसाहेब दानवे यांनी टीव्ही9 मराठीशी खास संवाद साधला. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. अशा प्रकारचा प्रश्न कुणाला पडला आणि कुणाला अशी स्वप्न पडतात ते आम्हाला माहीत नाही. पण कोणत्याही प्रकारचे दिवा स्वप्न पाहायचे नाही, हे भाजपने ठरवले आहे. इतरांनी अशी स्वप्ने अनेक वर्षे पाहिली आहेत, असा चिमटा काढतानाच आमचा पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आम्ही कार्यकर्त्यांच्या जोरावर जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीत त्यांना आमचं स्वप्न पूर्ण करून दाखवू. इतकेच काय 2024च्या निवडणुकीत आम्ही आमचं स्वप्न पूर्ण करू, असा टोला दानवे यांनी राऊत यांना लगावला.

आम्हाला आघाडी सरकारशी घेणंदेणं नाही

राज्य सरकार पाच वर्षे चालेल या राऊतांच्या विधानाचाही त्यांनी समाचार घेतला. चोराच्या मनात चांदणे आहे. हे सरकार पाच वर्षे कसं चालतंय याचं आम्हाला त्याचं काहीच घेणंदेणं नाही, असं ते म्हणाले. कोव्हिडच्या काळात केंद्र सरकारने तीन वेळा पॅकेज जाहीर केलं. राज्य सरकारने एकदाही पॅकेज दिलं नाही. त्यामुळे राज्यात कोव्हिडची काय परिस्थिती आहे हे मी सांगण्यापेक्षा आता लोकच सांगत आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

विरोधकांनी प्रश्न मांडावेत

उद्या सोमवारपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं.विरोधी पक्षाला संसदीय कार्यपद्धतीत अनेक प्रश्न उपस्थित करता येतात. पण विरोधकांनी प्रश्न उपस्थित करावेत हीच आमची विनंती आहे. सरकार चर्चेसाठी तयार आहे. कोणताही गोंधळ न घालता चर्चा केली तर त्यातून काही सकारात्मक गोष्टी बाहेर येतात. आमची इच्छा आहे की या सर्व प्रश्नावर गोंधळ न करता सरकारशी चर्चा करावी आणि सरकार सुद्धा चर्चेला माघार घेणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

परिस्थितीवर लक्ष ठेवून

पावसामुळे रेल्वेचा खोळंबा झाला आहे. त्यावर बोलताना दानवे म्हणाले की, या परिस्थितीवर मी नजर ठेवून आहे. आम्ही सर्व माहिती घेतली आहे. अतिवृष्टीमुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. स्थानिक प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या असून हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे.

सीएसटी ते कल्याण प्रवास करून पाहणी करणार

रेल्वे रुळावर पाणी साचल्यामुळे ट्रेन चालवणं धोक्याचं असतं. अशावेळी प्रवाशांची सुरक्षा महत्त्वाची असते. रुळावर पाणी भरल्याने थोड्यावेळासाठी रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती, असं ते म्हणाले. रेल्वेच्या जागेवर पाणी साचत असेल तर मी अधिकाऱ्यांसोबत सीएसटी ते कल्याणपर्यंत प्रवास करून पाहणी करेल. रेल्वेने पाणी भरणारे पॉईंट आयडेंटिफाय केले असतील तर केंद्र सरकार त्याची व्यवस्था करेल. पण महापालिकेच्या हद्दीतील पाणी रेल्वे रुळावर येत असेल तर त्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. त्याचा राज्य सरकारनेच बंदोबस्त केला पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. (we will fulfill our dream in 2024 poll, says raosaheb danve)

 

संबंधित बातम्या:

VIDEO: राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येणार?; नव्या समीकरणाच्या चर्चांवर संजय राऊत म्हणतात…

पंतप्रधानांशी तासभर भेट, सर्वपक्षीय बैठकीला जाताना राऊतांसोबत, येताना खरगेंसोबत; पवार नीतीचा अर्थ काय?

केवळ राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यांवरच पंतप्रधानांशी चर्चा झाली; शरद पवार यांचा खुलासा

(we will fulfill our dream in 2024 poll, says raosaheb danve)