CM Uddhav Thackeray: राज, राणेंना पाहणं सहन झालं नाही की…; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ‘धर्मवीर’चा शेवट का नाही पाहिला?

| Updated on: May 18, 2022 | 7:12 PM

CM Uddhav Thackeray: धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात अभिनेता प्रसाद ओक यांनी आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे.

CM Uddhav Thackeray: राज, राणेंना पाहणं सहन झालं नाही की...; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी धर्मवीरचा शेवट का नाही पाहिला?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: दिवंगत आनंद दिघे (anand dighe) यांच्या जीवनावर आधारीत ‘धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे’ हा सिनेमा पाहण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेले होते. मात्र, त्यांनी या सिनेमाचा शेवट पाहिला नाही. स्वत: उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनीच आपण या सिनेमाचा शेवट पाहिला नसल्याचं सांगितलं. मी चित्रपटाचा शेवट पाहू शकलो नाही. कारण आनंद दिघे यांच्या अपघातानंतर मी बाळासाहेबांना व्यथित झालेलं पाहिलंय. आनंद दिघे यांचा मृत्यू शिवसैनिकांवर एक आघात होता, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. मात्र, मुख्यमंत्र्यांनी धर्मवीरचा शेवट का पाहिला नाही यावर वेगळीच चर्चा होऊ लागली आहे. शेवटच्या सीनमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (narayan rane) असल्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी या सिनेमाचा शेवटचा सीन पाहिला नसल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

‘धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात अभिनेता प्रसाद ओक यांनी आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. खास करून औरंगाबाद, नाशिक, ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूर या भागात धर्मवीर पाहण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे. ठाणे जिल्ह्यात तर काही भागात शिवसेनेने धर्मवीरचे मोफत खेळ लावले आहेत. या सिनेमातील प्रसाद ओक यांच्या कामाचंही मोठं कौतुक झालं आहे.

हे सुद्धा वाचा

बाळासाहेबांना व्यथित झालेलं पाहिलं नाही

या सिनेमाचा गवगवा सुरू असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही वेळात वेळ काढून हा सिनेमा पाहिला. मात्र, सिनेमाचा शेवट सुरू होण्याआधीच ते थिएटरमधून बाहेर पडले. आनंद दिघे यांच्या मृत्यूचा सीन पाहणं कठिण झालं. त्यावेळी मी बाळासाहेबांनाही व्यथित झालेलं पाहिलं होतं, असं मुख्यमंत्री म्हणाले.

चर्चा काय?

सिनेमाचा शेवट का पाहिला नाही? याचं कारण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असलं तरी चर्चा मात्र काही वेगळीच होताना दिसत आहे. आनंद दिघे अपघातात जखमी झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी राज ठाकरे आणि नारायण राणे हे शिवसेनेतच होते. हे दोन्ही नेते दिघे यांना भेटायला रुग्णालयात गेले होते. हा सीन सिनेमाच्या शेवटच्या दृश्यात आहे. या दोन्ही नेत्यांना पाहता येऊ नये म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी शेवटचा सीन पाहणं टाळल्याची चर्चा आहे.

शेवटचा सीन काय आहे?

आनंद दिघे यांना अपघात झाल्यानंतर त्यांना ठाण्यातील सिंघानिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी मुंबईतून आनंद दिघे यांना पाहायला जाणारे राज ठाकरे हे एकमेव नेते होते. यावेळी राज यांनी दिघे यांच्याशी संवाद साधला होता. तुम्हाला हिंदुत्वासाठी जगावं लागेल, असं राज ठाकरे दिघेंना म्हणाले होते. दिघे यांच्या मृत्यू झाला. त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे रुग्णालयात जातात. दिघेंच्या मृत्यूनंतर हॉस्पिटलची जाळपोळ होते. हे सर्व या सिनेमात दाखवण्यात आलं आहे.