म्हणून मला मामी म्हणतात, पण… अमृता फडणवीस यांनी सांगितलं नेमकं कारण

वाहतूक कोंडीमुळे पती-पत्नींची भांडणं होतात या आपल्या विधानावर आपण ठाम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. वाहतूक कोंडीत अडकल्याने नवरा बायकोंची भांडणे होतात.

म्हणून मला मामी म्हणतात, पण... अमृता फडणवीस यांनी सांगितलं नेमकं कारण
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Dec 21, 2022 | 8:44 AM

नागपूर: सोशल मीडियावर ट्रोलर्सकडून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख मामू तर त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा उल्लेख मामी करून त्यांची अवहेलना केली जाते. अमृता फडणवीस यांनी पहिल्यांदाच आपल्याला मामी का म्हणतात? यावर भाष्य करतानाच ट्रोलर्सचा समाचारही घेतला आहे. नागपूर येथे पार पडलेल्या अभिरुप न्यायालयातील एका सवालाचा जवाब देताना त्यांनी हे उत्तर दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस हे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांना मामू म्हणतात. म्हणून मलाही मामी म्हणतात. पण कोणी काही म्हटलं तरी मला फरक पडत नाही, असं सांगतानाच लोक मला ट्रोल करत नाही. राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाच्या फेक ट्रोलर्सकडूनच मला ट्रोल केलं जातं, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.

लग्नानंतर देवेन्द्रजी यांचे राजकीय आणि सामाजिक काम पहिले. त्यांचे काम पाहून मला आनंद मिळाला. समोरच्यांची कामं झाली की आनंद मिळतो, असं त्यांनी सांगितलं.

यावेळी त्यांनी मंगळसूत्रं आणि भिडे गुरुजी यावरही भाष्य केलं. मला भिडे गुरुजींचा प्रचंड आदर आहे. आजच्या काळात खूप गोष्टी बदलल्या आहेत. मंगळसूत्र हातात घातले तर देवेन्द्रजी माझा हात पकडतात असे वाटते, असं त्या म्हणाल्या.

सक्रिय राजकारणात जाणार का? असा सवालही त्यांना करण्यात आला. त्यावर जेव्हा तुम्ही राजकारणात जाता तेव्हा लोकांचं आयुष्य बदलते. मी घर आणि मुलगी सांभाळते. राजकारणासाठी पूर्णवेळ नाही देऊ शकत असं म्हणत त्यांनी राजकारणात प्रवेश करण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला.

वाहतूक कोंडीमुळे पती-पत्नींची भांडणं होतात या आपल्या विधानावर आपण ठाम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. वाहतूक कोंडीत अडकल्याने नवरा बायकोंची भांडणे होतात. त्यामुळे त्यांना एकमेकांना वेळ देता येत नाही. स्मार्ट सिटीत असे प्रॉब्लेम होतात, असं एका सर्व्हेत आलं होतं म्हणून मी तो संदर्भ दिला होता, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

तुम्हाला सरकारी सुरक्षा हवीय का? असा सवाल केला असता त्यांनी नाही असं उत्तर दिलं. मी एक सामान्य नागरिक आहे. मला याची गरज नाही. मला सामान्य नागरिका सारखे जगायचे आहे, असं त्यांनी मनमोकळेपणाने सांगितलं.