Devednra Fadanvis : पंतप्रधान मोदींसोबत बैठक होताच फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, कोणत्या विषयावर चर्चा?; महत्त्वाची माहिती समोर!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेऊन राज्याच्या प्रशासन व प्रकल्पांवर सविस्तर चर्चा केली. त्यांनी केंद्र सरकारकडून अपेक्षित मदतीबाबत एक पत्र दिले. ही बैठक राज्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरली, ज्यात महामार्ग, रेल्वे, मेट्रो व नदीजोड प्रकल्पांचा समावेश होता. त्यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचीही भेट घेतल्याचे नमूद केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधानानंची भेट घेतली होती, तर आज मुख्यमंत्री फडणवीस हे मोदींच्या भेटीसाठी दिल्लीत पोहोचले, त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलं होत. मात्र पंतप्रधानांच्या भेटीनंतर आता मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली. पंतप्रधानांशी कोणकोणत्या विषयांवर चर्चा झाली, काय बोलणं झालं हे मुख्यमंत्र्यांनी सविस्तर सांगितलं. विविध प्रकल्पांबाबत त्यांना माहिती दिली, चर्चा केली असं त्यांनी सांगितलं. नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचीही भेट घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.
काय म्हणाले मुख्यमंत्री ?
राज्यामधील एकूण प्रशासन आणि प्रकल्प यासंदर्भातील माहिती मी पंतप्रधानांना दिली. केंद्र सरकारच्यासोबत काही प्रकल्पांची आमची चर्चा चाललेली आहे, काही प्रकल्प वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये आहेत, त्या संदर्भातील माहिती त्यांना दिली, असं फडणवीस म्हणाले. एकूणच केंद्र सरकारकडून काय मदत अपेक्षित आहे, त्या संदर्भात देखील मी त्यांना पत्र दिलं. अतिशय चांगली चर्चा झाली. केंद्र सरकारकडे आम्ही मदत मागतो, त्यात्या वेळी ती मदत मिळते. मग ती हायवेच्या संदर्भातील असेल किंवा रेल्वेच्या संदर्भातील असो किंवा आपला उत्तन- विरार कॉरिडॉर असेल, अशा विविध प्रकल्पांच्या संदर्भात, मेट्रोच्या संदर्भात,आपल्या नदीजोड प्रकल्प असेल, अशा विविध संदर्भात त्याची त्यांना माहिती, ते कसं एक्सपिडेट करता येईल यासंदर्भातील हा प्रयत्न होता, असं फडणवीस यांनी नमूद केलं.
केंद्रीय अर्थमंत्र्यांचीही घेतली भेट
पंतप्रधानांच्या भेटीनंतर मी निर्मला सीतारामन यांचीही भेट घेतली. मुंबई-वाढवण एक्सप्रेस-वे कनेक्टिव्हीटीबाबत चर्चा झाल्याचं ते म्हणाले. उत्तन-विरार सी-लिंक साठी जायकामार्फत आर्थिक सहाय्य देण्याची मागणी केली. केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून परवानगी मिळावी, अशी विनंती केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
अर्थमंत्र्यांच्या भेटीनंतर मी भूपेंद्र यादव यांची भेट घेतली असं मुख्यमंत्री म्हणाले. पर्यावरण आणि वन याच्या ज्या काही मंजुरी थांबल्या आहेत, वेगवेगळ्या स्टेजेसवर आहेत, त्याची माहिती दिली, फॉलोअप केला. त्यांनीदेखील अतिशय वेगाने मान्यता देण्यात येईल, असं सांगितल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. पियुष गोयल आणि निर्मला सीतारमण यांच्यासोबत उद्योगांसंदर्भातील बैठक आहे. देशभरातील मुख्यमंत्री, इंडस्ट्रियल मिनिस्टर त्याला उपस्थित असतील, औद्यौगिक वसाहती आपण केंद्र सरकारच्या मदतीने तयार करतोय, त्यातील प्रगती आणि अडचणी यावर या बैठकीत चर्रा होईल, असं त्यांनी नमूद केलं.
