शाळा सुरू होऊन तीन आठवडे झाले तरी २५ शाळांमध्ये शिक्षकचं नाहीत, येथील झेडपी शाळांची दुरावस्था

| Updated on: Jul 24, 2023 | 5:15 PM

दुर्गानगर येथील माध्यमिक शाळेमध्ये स्वच्छतागृह अतिशय खराब आहेत. येथे दोन शिपाई आहेत. पण, हे दोन्ही शिपाई कामचुकार आहेत. त्यामुळे स्वच्छतागृहाची सफाई केली जात नाही. विद्यार्थी नाक मुरडत टॉयलेटला जातात.

शाळा सुरू होऊन तीन आठवडे झाले तरी २५ शाळांमध्ये शिक्षकचं नाहीत, येथील झेडपी शाळांची दुरावस्था
Follow us on

नागपूर : शाळा सुरू होऊन तीन आठवडे झाले तरी नागपूर जिल्हा परिषदेच्या तब्बल २५ शाळांमध्ये शिक्षकच नाहीत. त्यामुळे शिक्षक नसलेल्या शाळेतील काही विद्यार्थी थेट जिल्हा परिषद मुख्यालयात पोहचले. काटोल जिल्ह्याच्या मलकापूर गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत 15 विद्यार्थी आहेत. दररोज हे विद्यार्थी तयारी करून शाळेत जातात. मात्र शिक्षक नसल्याने त्यांना परत यावं लागतं. त्यामुळं त्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतंय. त्यामुळं शिक्षक मिळाले यासाठी हे विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या मुख्यलयात पोहचुन शिक्षक द्या, अशी मागणी केली. नागपूर जिल्हा परिषदेत आलेल्या या विद्यार्थ्यांना अखेर शिक्षक मिळाले. जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांनी शिक्षकाची त्वरित नेमणूक केलीय.

अशीच काहीसी अवस्था नागपूर मनपा शाळांची आहे. नागपूर मनपाच्या माध्यमिक विभागाच्या ३० शाळा आहेत. बरेच शिक्षक सेवानिवृत्त झालेत. त्यामुळे मनपाच्या शिक्षण विभागाने ६३ जागांसाठी गेल्या आठ दिवसांपूर्वीपासून मुलाखती घेतल्या. शाळा सुरू होऊन २१ दिवस झाले, तरी अद्याप बऱ्याच शाळांमध्ये बऱ्याच विषयांचे शिक्षक नाहीत. दुर्गानगर हायस्कूल येथे गणित शिकवणारे शिक्षक नाहीत. मराठीच्या शिक्षिका पाच दिवसांनंतर सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांच्या भरतीसाठी फिरणाऱ्यांनी मनपा शिक्षकांची भरती आणि स्वच्छतागृहांची स्वच्छता राखल्यास विद्यार्थी आपोआप मिळतील. एकीकडे दिल्लीतील सरकारी शाळांनी कात टाकली असताना नागपूर जिल्ह्यात सरकारी शाळांची परिस्थिती अतिशय खराब आहे. त्यामुळे या शाळांना विद्यार्थी मिळत नाहीत.

दुर्गानगर शाळेतील स्वच्छतागृहाची ऐसीतैसी

दुर्गानगर येथील माध्यमिक शाळेमध्ये स्वच्छतागृह अतिशय खराब आहेत. येथे दोन शिपाई आहेत. पण, हे दोन्ही शिपाई कामचुकार आहेत. त्यामुळे स्वच्छतागृहाची सफाई केली जात नाही. विद्यार्थी नाक मुरडत टॉयलेटला जातात. काही विद्यार्थी घरी जाईपर्यंत लघवी रोखून धरतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हे शिपाई अनफीट असल्याचं सांगतात. पण, पगार मात्र बिनकामाचा पूर्ण घेतात. अशा पालकांच्या तक्रारी आहेत. अशा शिपायांची मनपाला गरज काय, असा प्रश्न निर्माण होतो. मनपा शिक्षणाधिकाऱ्यांना यासंदर्भात विचारले असता आज फालोअप घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

सुपर ७५ च्या उद्घाटनाला मुहूर्त सापडेना

मनपा शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आठवीत एक स्पर्धा परीक्षा होते. त्यातून ७५ हुशार विद्यार्थी निवडले जातात. त्यांना नियमानुसार, आठवीची परीक्षा संपल्यानंतर गणित आणि विज्ञानाचे बेसीक क्लीअर केले जाते. पण, उन्हाळा संपला तरी अद्याप आठवीच्या विद्यार्थ्यांचे क्लास सुरू झाले नाही. मनपातील शिक्षण विभागात चौकशी केल्यास मनपातील सुपर ७५ चे प्रभारी टेंभुर्णे हे येत्या शनिवार, रविवारी क्लासेस सुरू होतील, असे महिन्याभरापासून सांगत आहेत. पण, अद्याप त्यांना उद्घाटनासाठी पाहुणे न मिळाल्याने सुपर ७५ च्या विद्यार्थ्यांचे क्लासेस सुरू झाले नाहीत. शिक्षणाधिकारी राजेंद्र पुसेकर यांना विचारणा केली असता येत्या शनिवार, रविवारपासून क्लासेस सुरू होतील, असे सांगितले. खरचं कोणता शनिवार, रविवार उद्घाटनासाठी उपलब्ध होतो, हे पाहावं लागेल.