राज्यातील सर्व पक्ष फडणवीसच चालवतात, बड्या नेत्यांचं मोठं वक्तव्य, राज्यात खळबळ
राज्यात सत्तेमध्ये येऊन महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे, या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना बड्या नेत्यानं केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. फडणवीस हेच बाकी पक्ष देखील चालवत असल्याचं विधान करण्यात आलं आहे.

राज्यात लोकसभा निवडणुकीमध्ये बसलेल्या दणक्यानंतर महायुतीला विधानसभा निवडणुकीमध्ये मोठं यश मिळालं होतं, विधानसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात स्पष्ट बहुमत मिळालं, तर दुसरीकडे महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवरच समाधान मानावं लागलं, दरम्यान आता सत्तेत येऊन महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे, यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांनी मोठं विधान केलं आहे. भाजप देवाभाऊमय आहेच, पण राज्यातील इतर पक्षही देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यानेच चालतात, असं वक्तव्य लोढा यांनी केलं आहे, लोढा यांच्या या विधानामुळे आता राज्यात चर्चेला उधाण आलं आहे. त्यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे.
नेमकं काय म्हणाले लोढा?
देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यावेळी मुख्यमंत्री झाले आहेत, तिसऱ्यावेळी मुख्यमंत्री झाल्यानंतर आज महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे. महाराष्ट्रामधील सर्वात कमी वयाचा महापौर, तीन वेळा मुख्यमंत्री तेही भाजप मजबूत स्थितीत नसताना देवेंद्र फडणवीस झाले आहेत. भाजप तर देवाभाऊचीच मात्र त्याच बरोबर महाराष्ट्रामधील कोणता पक्ष कसा चालणार हे देखील तेच ठरवतात. ते राज्यातील आमचे गुरू आहेत, त्यांची विविध रूपे आम्ही बघत आहोत, असं लोढा यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, भाजप कार्यकर्त्यांना तिकीट द्या किंवा नका देऊ, मात्र ते काम करण्यासाठी आनंदित असतात. त्यामुळेच भाजप दोन वरून 275 पर्यंत पोहोचलेली आहे. आपलं घर यावेळी मुंबई आहे. मुंबईत निवडणूक जिंकायची असेल तर ती एकटी अमित साटम राहुल नार्वेकर यांची जबाबदारी होऊ शकत नाही, आपल्या सर्वांना ही जबाबदारी उचलायची आहे, असं यावेळी लोढा यांनी म्हटलं आहे. शेजारचा मुलगा कितीही सुंदर असला तरी आपण त्याला कमरेवर उचलत नाही, कमरेवर आपलाच मुलगा उचलतो. त्यामुळे मुंबईत महापौर भाजपचा बनेल असं म्हणत त्यांनी आता थेट अप्रत्यक्षपणे महायुतीमधील घटकपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटला इशारा दिल्याचं बोललं जात आहे.
