Bageshwar Baba: चार मुलं पैदा करा आणि एक… RSS चा उल्लेख करत हिंदू धर्मीयांना धीरेंद्र शास्त्री यांचे मोठे आवाहन काय?
Bageshwar Baba Big Appeal to Hindu Community: नागपूरमधून काल बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी दोन वादग्रस्त वक्तव्य केले. त्यातून व्हायचा तो अपेक्षित परिणाम दिसून आला. त्यांच्या वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटल्या. काही मुद्दे सातत्याने बिंबवण्याचा प्रयत्न होत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे.

Bageshwar Baba Dhirendra Krushna Shastri Statements: नागपूरमध्ये काल बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी वक्तव्य केले. त्यातून वाद झाला आहे. चार मुलं जन्माला घाला आणि त्यातील एक RSS ला द्या , असे आवाहन त्यांनी हिंदू समुदायाला केले. तर छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करून थकले होते आणि त्यांनी रामदास स्वामी यांची भेट घेऊन विश्रांती घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या प्रबोधनामुळेच ते पुन्हा राज्यकारभार पाहू लागले असे वक्तव्य करून धीरेंद्र शास्त्री यांनी वाद ओढावून घेतला. अनेक प्रमुख राजकीय पक्षांनी या वक्तव्यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. नागपूर येथे भारतदुर्गा शक्तिस्थळाचा शिलान्यास कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
भारत शस्त्र आणि शास्त्राने चालतो
आपला भारत हा पुन्हा देवीशक्तीकडे वाटचाल करत आहे. लोक जेव्हा नागपूरमध्ये कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या मैदानात दुर्गामाता मंदिराचे दर्शन घेतील, ज्यांच्या भुजांमध्ये अस्त्र-शस्त्र आहे हे पाहतील. तेव्हा भारत हा शस्त्र आणि शास्त्राने चालतो याची त्यांना जाणीव होईल. आमच्या भाषेत याला माला आणि भाला असे म्हणतात त्यामुळे केवळ बासरी वाजल्याने, पावा वाजवल्याने काम धकलं असतं तर महाभारत का झालं असतं? असा सवाल त्यांनी केला. भारत माता आणि दुर्गामातेच्या मंदिर निर्माणाच्या संकल्पनेने आनंदीत झाल्याचे ते म्हणाले. भारत भगवामय आणि सनातनमय व्हावा आणि अखंड भारताच्या दिशेने आपण जावे अशी प्रार्थना बागेश्वर बाबांनी यावेळी केली.
स्वयंसेवक मदतीला धावतो
देशात जेव्हा पण संकटं येतात, तेव्हा लोक जीव मुठीत घेऊन पळ काढतात. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक हा पळ काढत नाही, तर अनेकांचे प्राण वाचवतो. तो मदतीला धावतो. अडीअडचणीत, संकाटावेळी स्वयंसेवक जातपात धर्म न बघता मदतीला येतो. तेव्हा चार मुलं जन्माला घाला आणि त्यातील एक संघाला द्या , त्यामुळे तो स्वयंसेवक इतरांचे प्राण वाचवायला कामी येईल, असे वक्तव्य बागेश्वर बाबांनी केले.