माझ्या अटकेमागील अदृश्य हात कुणाचे? हे हळूहळू बघणार; अनिल देशमुख यांचा नागपुरात येताच इशारा

कापसाला भाव मिळत नाही. त्यांच्या कापसाचे भाव वाढले पाहिजे. त्यासाठी धोरण ठरवलं पाहिजे यासाठी मी सरकारला पत्र लिहिलं आहे. राज्य आणि केंद्र सरकारने प्रयत्न केले पाहिजे अशी मागणी केली आहे.

माझ्या अटकेमागील अदृश्य हात कुणाचे? हे हळूहळू बघणार; अनिल देशमुख यांचा नागपुरात येताच इशारा
anil deshmukh
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Feb 12, 2023 | 7:15 AM

नागपूर: तब्बल 21 महिन्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख नागपुरात आले. काल नागपुरात आल्यानंतर त्यांच्या अटकेमागील सूत्रधारांना इशाराच दिला. दहशतवादी कसाबला ठेवलं त्याच तुरुंगात मलाही टाकण्यात आलं होतं. माझ्या कुटुंबीयांचाही छळ करण्यात आला. माझ्या अटकेमागील अदृश्य हात कुणाचे आहेत हे मी हळूहळू बघणार आहे, असा इशाराच अनिल देशमुख यांनी दिला. ते नागपुरात आल्यावर कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते.

21 महिन्या नंतर मी नागपूरला आलो. सगळे सहकारी आज भेटले. त्यांना मला पाहता आलं. त्याचा मला आनंद झाला. मला खोट्या आरोपाखाली अटक करण्यात आली. न्याय देवतेवर मला विश्वास होता. त्यांनी न्याय दिला आणि मी बाहेर येऊ शकलो, असं राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी सांगितलं.

आरोप तथ्यहीन

माझ्यावरील आरोप तथ्यहीन असल्याचं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं आहे. माझ्यावर 100 कोटी वसुली केल्याचा आरोप झाला. पण एक लाखाच्या आरोपाचाही ते पुरावा देऊ शकले नाहीत. ज्यांनी माझ्यावर आरोप केले, तेच चांदीवाल आयोगासमोर आले नाही. ते पाच महिने फरार होते. केवळ ऐकिव माहितीच्या आधारे आरोप केल्याचं परमबीर सिंग यांनी सांगितलं, असं देशमुख म्हणाले.

मी माहिती घेतोय

सचिन वाझेंचे आरोपही खोटे आहेत. तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे, असं त्याच्याबद्दल निरीक्षण नोंदवताना कोर्टानं म्हटलं. ज्याच्यावर दोन खुनाचे आरोप आहे. ज्याला 16 वर्ष निलंबित केलं होतं अशा व्यक्तीच्या साक्षीवर विश्वास ठेवता येणार नाही, असं कोर्टाने म्हटलं. दोघांनी जे आरोप केले किंवा त्यांना आरोप करायला लावलेत याची माहिती मी घेत आहे, असंही त्यांनी सांगितलं.

माझा छळ झाला

14 महिने मला खोट्या आरोपात जेलमध्ये डांबून ठेवलं. ज्या जेलमध्ये मला ठेवण्यात आलं होतं त्या ठिकाणी आतंकवादी कसाबला ठेवलं होतं. तिथंच मलाही ठेवलं. माझा झळ झाला. माझ्या 230 सहकाऱ्यांच्या साक्षी घेण्यात आल्या.

माझ्या घर आणि कार्यालयावर 130 वेळा धाडी टाकल्या. मात्र त्यांना काहीही मिळालं नाही. माझ्या कुटुंबाला मोठा त्रास सहन करावा लागला. यामागे कोणाचा अदृश्य हात आहे ते मी हळूहळू बघणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

पहिल्या दिवसांपासून पवार पाठिशी

मला अटक झाली. तेव्हा पहिल्या दिवसांपासून शरद पवार आणि राष्ट्रवादीचे नेते माझ्या पाठीशी होते. सर्वांनी मला मदत केली. माझ्या कुटुंबाला दिलासा देत होते. शरद पवार नागपुरात आले होते तेव्हा त्यांनी ते माज्या पाठीशी असल्याचं स्पष्ट केलं होतं, असंही ते म्हणाले.

शेतकऱ्यांना मदत करा

माझ्या मतदारसंघातील लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवला. मी येऊ शकत नव्हतो तेव्हा माझ्या मुलाने सलीलने मतदार संघात काम केलं. मी आता अजून जोमाने आणि गतीने काम करणार आहे. पक्षाचं काम करणार आहे. आमचा शेतकरी अडचणीत आहे.

कापसाला भाव मिळत नाही. त्यांच्या कापसाचे भाव वाढले पाहिजे. त्यासाठी धोरण ठरवलं पाहिजे यासाठी मी सरकारला पत्र लिहिलं आहे. राज्य आणि केंद्र सरकारने प्रयत्न केले पाहिजे अशी मागणी केली आहे, असंही त्यांनी सांगितलं.

आर्थिक अडचणीत असल्याने जे शेतकरी कर्ज फेडू शकले नाहीत त्यांची शेती लिलावात काढण्यासाठी त्यांच्या नावाची लिस्ट असलेले फलक लावण्यात आले आहेत. हे अयोग्य आहे. त्यासाठी मी उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. संत्रा उत्पादक शेतकऱ्याचं नुकसान झालंय. त्यांना मदत मिळाली नाही. ती सरकारने द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

Follow Us