विदर्भात ढगफुटी आणि महापुरामुळे मोठं नुकसान; यवतमाळ, वाशिम, बुलडाणा, अकोल्या जिल्ह्यांना बसला फटका

| Updated on: Jul 23, 2023 | 5:09 PM

यवतमाळ, वाशिम, बुलडाणा अणि अकोल्या जिल्ह्यात हे सर्वाधिक नुकसान आहे. शेती खरडून गेल्याने पुन्हा पेरणी कशी करायची हा प्रश्न? शेतकऱ्यांना पडलाय.

विदर्भात ढगफुटी आणि महापुरामुळे मोठं नुकसान; यवतमाळ, वाशिम, बुलडाणा, अकोल्या जिल्ह्यांना बसला फटका
Follow us on

नागपूर : पुरात शेतीच वाहून गेलीय. त्यामुळे पेरायचं काय आणि जगायचं कसं? हा प्रश्न पडलाय यवतमाळ जिल्ह्यातील महागाव परिसरातील योगेश जाधव या तरुण शेतकऱ्याला. उसणवारी करुन त्यांनी यंदा १० एकरात कपाशीची लागवड केलीय. दोन-तीन लाखांचा खर्च केला. पिकंही चांगलं होतं. पण एका दिवसाच्या पावसाने होत्याचं नव्हतं केलं. पुरात संपूर्ण शेती खरडून गेल्याने त्याच्यावर मोठं संकट ओढवलंय.

अशाच प्रकारे विदर्भात गेल्या दोन दिवसात ८ ते १० हजार हेक्टर शेती खरडून गेलीय. विदर्भात ढगफुटी आणि महापुरामुळे शेतीचं सर्वाधिक नुकसान झालंय. यवतमाळ, वाशिम, बुलडाणा अणि अकोल्या जिल्ह्यात हे सर्वाधिक नुकसान आहे. शेती खरडून गेल्याने पुन्हा पेरणी कशी करायची हा प्रश्न? शेतकऱ्यांना पडलाय.

या गावांना सतर्कतेचा इशारा

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात पुराचा हाहाकार बघायला मिळतो आहे. पैनगंगा-वर्धा-झरपट नद्यांना पूर आलाय. चंद्रपूर जिल्ह्यात मात्र 24 तासापासून पाऊस बंद झालाय. मात्र यवतमाळ-नांदेड जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी पुराचे कारण ठरली आहे. वनसडी -अंतरगाव , भोयगाव -धानोरा मार्ग बंद झाला आहे. परसोडा, रायपूर, अकोला, पारडी, कोडशी, जेवरा, पिपरी, वनोजा, सांगोडा, अंतरगाव इरई, कारवा, भोयगाव भारोसा आदी गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. अंतरगाव येथे घरांत पुराचे पाणी शिरले.

हजारो घरांना पुराचा विळखा

वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे चंद्रपूर शहरालगतची इरई नदी ऊर्ध्व दिशेने वाटचाल करत आहे. शहरातील सखल आणि नदीकाठच्या भागांमध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. चंद्रपूर शहरातल्या रहमतनगर, सिस्टर कॉलनी, तिमांडे ले-आउट मधल्या हजारो घरांना पुराच्या पाण्याचा विळखा पडलाय. चंद्रपूर शहर हे इरई आणि झरपट नद्यांच्या किनाऱ्यावर आहे. या नद्यांचं पाणी हे वर्धा नदीला जाऊन मिळतं. मात्र वर्धा नदीचं पात्र फुगल्याने इरई आणि झरपट नद्यांचं पाणी वर्धा नदीत जात नाही. ते चंद्रपूर शहरात शिरायला सुरुवात झाली आहे. पुराचं हे पाणी वाढण्याच्या भीतीने अनेक लोकांनी आपलं सामान स्थानांतरित केली.