
आज राज्यातील 264 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान सुरु झाले आहे. एकूण 12 हजार 316 मतदान केंद्रांसाठी 62 हजार 108 निवडणूक अधिकारी/ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मतदान केंद्रांवर पोलिसांमार्फत पुरेशा बंदोबस्त लावण्यात आला आहे.नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या (Nagar Parishad Election) 264 अध्यक्षपदांच्या आणि 6 हजार 42 सदस्यपदांच्या जागांसाठी मतदान होत असले तरी नगरपालिका आणि नगरपंचायतींची निवडणूक न्यायालयीन कचाट्यात अडकल्याचे दिसते. जिल्हा न्यायालयात या निवडणुकीला आव्हान देण्यात आले होते. 24 अध्यक्ष आणि 154 सदस्य पदाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. राज्य निवडणूक आयोगाने सुधारीत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात (Mumbai High Court, Nagpur Bench) याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यावर थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे.
काय आहे घटनाक्रम?
राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या (एकूण 288) सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्याविरोधात अनेक उमेदवारांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील असलेल्या प्रकरणांचा निर्णय 23 नोव्हेंबर 2025 रोजी किंवा त्यानंतर आल्याने 24 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाच्या आणि सदस्यपदांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. आज या ठिकाणी मतदान होणार नाही.
दरम्यान सुधारित कार्यक्रमानुसार 20 डिसेंबर 2025 रोजी 24 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाच्या आणि सदस्यपदांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे आता उर्वरित 264 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी आज मतदान होईल.
त्यातील 76 नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील न्यायालयीन प्रकरणांमुळे बाधित 154 जागांसाठीदेखील मतदान होणार नाही. तिथेही सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार संबंधित बाधित जागांसाठी 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान होईल.
पण राज्य निवडणूक आयोगाने जो सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याविरोधात अनेक उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. तर नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार नागपूर खंडपीठ, छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) खंडपीठ आणि मुंबईतही याचिका दाखल झाल्या आहेत. त्यांनी या सुधारीत निवडणूक कार्यक्रमाला आव्हान दिले आहे.
राज्य निवडणूक आयोग हाजीर हो
सुधारित निवडणूक कार्यक्रमाला नागपूर खंडपीठात उमेदवारांनी आव्हान दिलं आहे. आयोगाच्या निर्णयाविरोधात नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. नागपूर खंडपीठात सकाळी 10:30 वाजता सुनावणी होणार आहे. या सुनावणीला हजर राहण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाला देण्यात आले आहे. यासंदर्भात उमेदवारांचे जे आक्षेप आहे, त्यासाठी आवश्यक स्पष्टीकरणासह आयोगानं कोर्टात हजर राहण्याचे निर्देश नागपूर खंडपीठाने दिले आहे. त्यामुळे आता सुधारीत निवडणूक कार्यक्रमानुसार मतदान प्रक्रिया होईल की नाही हे याचिकेच्या निकालावर अवलंबून असेल. थोड्याच वेळात याविषयीचा निकाल समोर येणार आहे.