मनुस्मृतीचं दहन… जोरदार घोषणाबाजी… युवक काँग्रेसची संघ कार्यालयावर धडक; नागपूरचं वातावरण तापलं
नागपुरात युवक काँग्रेसने मनुस्मृतीचा तीव्र निषेध करत संविधान सन्मान यात्रा काढली आहे. संघ कार्यालयाकडे निघालेला हा मोर्चा पोलिसांनी मध्येच अडवला. त्यामुळे वातावरण चांगलंच तापलं आहे. पोलीस या मोर्चेकऱ्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

गजानन उमाटे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नागपूर : मनुस्मृतीच्या निषेधार्थ नागपुरात युवक काँग्रेसची ‘संविधान सन्मान यात्रा’ सुरू झाली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाच्या दिशेने मोर्चा निघाल्याने वातावरण चांगलंच तापलं आहे. आंदोलक जोरदार घोषणाबाजी करत आहेत. संघ आणि सरकार विरोधी घोषणांनी आंदोलकांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला आहे. यावेळी आदोलकांनी मनुस्मृतीचं दहन करून भाजप आणि संघाचा निषेध नोंदवला. पोलिसांनी हा मोर्चा मध्येच अडवल्याने आणखीनच गोंधळ उडाला असून आंदोलकांना आवरताना पोलिसांची त्रेधातिरपीट उडाली आहे.
मनुस्मृतीचा निषेध आणि संविधानाचा सन्मान म्हणून युवक काँग्रेसचा थेट नागपूरच्या रेशीम बागेतील संघाच्या कार्यालावरच मोर्चा निघाला. एनआयटी कर्मचारी सांस्कृतिक भवन येथून या मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. मोर्चेकरी जोरदार घोषणाबाजी करत असल्याने संपूर्ण परिसर दणाणून गेला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी आंदोलन स्थळी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. मोर्चा रेशीम बागेकडे येत असतानाच सुरेश भट सभागृहाजवळ हा मोर्चा थांबवण्यात आला. पोलिसांनी या परिसरात मोठ्या प्रमाणावर बॅरिकेटिंग लावून मोर्चा अडवला. त्यामुळे आंदोलक आणखीनच आक्रमक झाले आहेत.
तरुणींचा मोठा सहभाग
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे आणि प्रदेश सहप्रभारी नवज्योत सिंग संधू यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला आहे. या मोर्चात तरुणांसह तरुणींनीही मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या आहेत. मनुस्मृतीच्या निषेधासोबतच संविधानाच्या सन्मानाचा संदेश देण्यासाठी ही यात्रा असल्याचा युवक काँग्रेसनं म्हटलंय.
बॅरिकेटिंगवर चढले
मोर्चेकऱ्यांना मध्येच अडवण्यात आल्याने आंदोलकांनी बॅरिकेटिंगवर चढून जोरदार घोषणाबाजी केली. नही चलेगी, नही चलेगी दादागिरी नही चलेगी… माफी मांगो माफी मांगो… भाजपवाले माफी मांगो… अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मलिल्कार्जुन खरगे यांची माफी मागावी अशी मागणीही यावेळी करण्यात येत आहे.
मनुस्मृतीचं दहन
यावेळी आक्रमक आंदोलकांनी मनुस्मृतीचं दहन करून निषेध नोंदवला. तसेच संविधान हातात घेऊन उंचावले. अनेक तरुणांच्या हातात संवि्धान होतं. आम्ही संविधानाच्या सन्मानासाठी मैदानात उतरलो आहोत. भाजपने आमच्या नेत्याची माफी मागितली पाहिजे. हा देश संविधानावरच चालेल. मनुस्मृतीवर नाही, असा इशाराच या आंदोलकांनी दिला आहे.