Corona | आम्हाला 50 हजारांची मदत कधी मिळणार?; नागपुरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबीयांचा प्रश्न

नागपुरातील कोरोनाग्रस्त अनेक परिवार सरकारी मदतीपासून वंचित आहेत. अर्ज केला, पण मदतीचा पत्ता नाही. आमच्या मदतीच्या अर्जाचं काय झालं?, असा सवाल विचारू लागले आहेत. सरकारी कार्यालयातून उडवाउडवीची उत्तरं दिली जातात. कोरोनामुळे मृत्यूचं प्रमाणपत्र नसल्याने अनेक अर्ज बाद झाले आहेत.

Corona | आम्हाला 50 हजारांची मदत कधी मिळणार?; नागपुरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबीयांचा प्रश्न
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Jan 30, 2022 | 10:24 AM

नागपूर : जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला. स्मशानातंही दिवसभराची वेटिंग, अशी नागपूरची अवस्था होती. उपचारासाठी लाखो रुपये खर्च करुन लोक हवालदिल झाले. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत 10 हजार 189 कोरोना मृत्यूची (Corona death) नोंद झालीय. या परिवाराला सरकारी 50 हजारांच्या मदतीची अपेक्षा होती. पण जिल्ह्यातील तब्बल तीन हजारांपेक्षा जास्त अर्ज रिजेक्ट (Application rejected) झालेत. त्यापैकीच एक आहे नागपुरातील सौरभ ठुसे परिवार. नागपुरात दिघोरी परिसरात राहणारे तुळशीराम ठुसे यांना दुसऱ्या लाटेत कोरोनाने गाठलं. दोन-तीन दिवस घरी उपचार केले. रुग्णालयात बेड मिळत नव्हता. कसाबसा बेड मिळाला. उपचारावर तीन लाख खर्च केले. पण जीव वाचला नाही. आता त्यांच्या पेन्शनवर (Pension) घर चालतंय. सरकारने 50 हजार रुपये मदतीची घोषणा केली, त्यांच्याही आशा पल्लवीत झाल्या. तीन डिसेंबर 2021 ला त्यांच्या कुटुंबीयांनी मदतीसाठी अर्ज केला. पण अद्याप मदत मिळाली नाही, अशी माहिती सुनीता तुळशीराम ठुसे यांनी दिली.

तीन हजारांपेक्षा जास्त अर्ज रिजेक्ट

तुळशीराम ठुसे यांचा मुलगा 27 वर्षांचा आहे. कोरोनात त्याचीही नोकरी गेली. आधार होईल म्हणून त्यांनी 50 हजार रुपयांच्या मदतीसाठी ॲानलाई अर्ज केला. इतरांना 10-15 दिवसांत मदत मिळाली. पण दोन महिने लोटत आले तरिही सौरभ यांचा अर्ज पुढे सरकला नाही. सरकारी कार्यालयात जावं तर नीट उत्तरंही त्यांना मिळत नाही, अशी माहिती सौरभ ठुसे यांनी दिली. नागपूर जिल्ह्यात सरकारी आकड्यानुसार 10 हजार 189 कोरोना मृत्यूची नोंद आहे. पण जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे मदतीसाठी 15 हजारांपेक्षा जास्त अर्ज आलेत. यापैकी 10 हजारांपेक्षा जास्त जणांना मदत मिळाल्याचं अधिकारी सांगतात. तीन हजार पेक्षा जास्त अर्ज रिजेक्ट झालेत.

अर्ज रिजेक्ट होण्याची कारणे

नागपूर जिल्ह्यात तीन हजारांपेक्षा जास्त अर्ज रिजेक्ट झालेत. रुग्णालयाकडून कोविड मृत्यूचं प्रमाणपत्र मिळत नाही. कोविड मृत्यूचं प्रमाणपत्र नसल्याने 80 टक्के अर्ज रद्द झालेत. अर्जासोबत आधारकार्ड नसणे, बॅंक खात्याची नीट माहिती न देणे, परराज्य किंवा इतर जिल्ह्यातील रहिवासी अशी कारण यामागे आहेत, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे यांनी दिली. नागपूर जिल्ह्यात सरकारी माहितीनुसार आतापर्यंत 10 हजार 189 कोवीड मृत्यूची नोंद आहे. पण 50 हजार रुपयांच्या मदतीसाठी आलेले 15 हजारांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे सरकारी आकडेवारीपेक्षा कोरोनाने कितीतरीपट जास्त मृत्यू झाले, हे वास्तव नाकारता येण्यासारखं नक्कीच नाही.

‘Why I Killed Gandhi’ चित्रपटात अमोल कोल्हेंनी साकारली नथुराम गोडसेची भूमिका, आता आळंदीत आत्मक्लेश!

सावधान! लग्न होऊन कितीही वर्षे झाली तरी, होऊ शकतो घटस्फोट, का ते वाचा

नथुराम गोडसेची भूमिका साकारणाऱ्या खासदार अमोल कोल्हेंचा आळंदीत आत्मक्लेश!

Follow Us