मग अहमदाबादच्या क्रिकेट स्टेडियमलाही खेळाडूंचेच नाव द्या; नाना पटोले संतापले

| Updated on: Aug 06, 2021 | 3:32 PM

या तिरस्काराच्या मानसिकतेतूनच त्यांच्या नावाने असलेल्या योजना, प्रकल्पाची नावे बदलण्याचे काम मोदी सरकार करत आहे, असं टीकास्त्रही त्यांनी सोडलं.

मग अहमदाबादच्या क्रिकेट स्टेडियमलाही खेळाडूंचेच नाव द्या; नाना पटोले संतापले
nana patole
Follow us on

मुंबई: केंद्र सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदललं आहे. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संतप्त प्रतिक्रिया दिलीय. भाजप आणि संघाने नेहमीच नेहरू-गांधी घराण्याचा तिरस्कार केला आहे, असा नाना पटोलेंनी घणाघात केलाय. या तिरस्काराच्या मानसिकतेतूनच त्यांच्या नावाने असलेल्या योजना, प्रकल्पाची नावे बदलण्याचे काम मोदी सरकार करत आहे, असं टीकास्त्रही त्यांनी सोडलं.

‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्काराचे नाव बदलण्याची कृती द्वेषातून

देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असलेल्या ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्काराचे नाव बदलण्याची कृतीसुद्धा त्याच गांधी नावाच्या द्वेषातूनच आलेली आहे. मोदी सरकारच्या या कोत्या मनोवृत्तीचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले.

मेजर ध्यानचंद यांचे हॉकीतील योगदान मोठे

यासंदर्भात बोलताना पटोले पुढे म्हणाले की, हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांचे हॉकीतील योगदान मोठे आहे. त्यांच्या सन्मानार्थ दुसरा पुरस्कार देता आला असता किंवा त्यांच्या नावाने क्रीडा क्षेत्रासाठी मोठी योजना राबवता आली असती, त्यातून मेजर ध्यानचंद यांचा सन्मानच झाला असता, त्यांच्या नावाला विरोध असण्याचे कारण नाही. त्यांचे नाव दिल्याचा आम्हाला आनंदच आहे, परंतु केवळ गांधी द्वेषातून नाव बदलणे हे हीन पातळीच्या राजकारणाचे दर्शन घडवते. स्व. राजीव गांधी यांनी आधुनिक भारतासाठी मोठे योगदान दिले. त्यांच्या नावाने विविध क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा या पुरस्काराच्या माध्यमातून यथोचित सन्मान केला जात असे. राजीव गांधी यांचे देशाच्या विकासातील योगदान आणि करोडो लोकांच्या मनातील स्थान मोठे असून, अशा पद्धतीने ते स्थान तसूभरही कमी होणार नाही, असंही त्यांनी सांगितले.

मोदी यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान तरी काय?

राजीव गांधी यांच्या नावालाच विरोध असेल, तर मग नरेंद्र मोदी यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान तरी काय? अहमदाबादमधील मोटेरा क्रिकेट स्टेडियमलासुद्धा एखाद्या महान क्रिकेटपटूचे नाव देता आले असते, परंतु त्याचे सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम हे नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम केलेच, त्यामुळे राजीव गांधी यांचे नाव बदलल्याने आश्चर्य वाटत नाही, ही कृती भाजपा आणि संघाच्या द्वेषमूलक वृत्तीतून आलेली आहे. क्रीडा क्षेत्रासाठी असलेली आर्थिक तरतूद कमी करायची आणि दुसरीकडे आपले सरकार क्रीडा क्षेत्र आणि खेळाडूंचे किती हित जपते हे दाखवण्यासाठी असे केविलवाणे काम करायचे, यातून क्रीडा क्षेत्राचा अथवा खेळाडूंचा कोणताच फायदा होणार नाही, असेही नाना पटोले म्हणाले.

संबंधित बातम्या

‘राजीव गांधी हे देशाचे सुपुत्र आणि हिरो, मोदींनी कितीही प्रयत्न केला तरी त्यांचे स्थान हलणार नाही’, काँग्रेसला हल्लाबोल

राज ठाकरेंच्या दारातून चंद्रकांत पाटलांचं संजय राऊतांना खुलं आव्हान!

nana patole criticism on narendra modi govt over dhyan chand award