नांदेडः लग्न सोहळा (Marriage) म्हटलं की चकाचक गाड्या, वधु वराची भरपूर फुलांनी सजवलेली कार, बँड आणि डीजेच्या आवाजात निघालेली वरात, वऱ्हाडी मंडळींचा डान्स, धिंगाणा, असं काही चित्र आजकाल पहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, ही सजावट आणि थाट-माट करण्याची स्पर्धाच जणू आयोजकांमध्ये लागलेली दिसते. मात्र नांदेडमधील (Nanded Marriage) एका गावात या सगळ्या आधुनिक चढा-ओढीला फाटा देत अस्सल पारंपरिक पद्धतीनं विवाह सोहळा संपन्न झाला. या लग्नासाठी नवरदेव आणि नवरीबाईला थेट बैलगाडीतूनच आणले गेले. तसेच लग्नात आलेली सगळी वऱ्हाडी मंडळीही सुंदर सजवलेल्या बैलगाडीतून (Bullock cart in Wedding) आले. त्यानंतर अस्सल पारंपरिक पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला. नांदेडच काय अवघ्या मराठवाड्यात सध्या या हटके विवाह सोहळ्याची जोरदार चर्चा आहे.
नांदेड जिल्ह्यातील बारसदाव येथील सुशील बोरसे आणि शिवकन्या भालेराव या दोघांचा विवाह सोहळा अशा पारंपरिक बाजात करण्यात आला. यावेळी लग्नाला येताना नवरा-नवरी फुलं, पानं, फुग्यांनी सजवलेल्या बैलगाडीत आले. लग्न झाल्यावर याच बैलगाडीतून सुनबाईंना घरी नेण्यात आलं.
जुन्या परंपरेनुसार, वऱ्हाडी मंडळी येथे बैलगाडीनं आली. तसेच आधुनिक पद्धतीनुसार, मिरवणुकीत डीजे ऐवजी सनई चौघड्यांच्या मंजुळ स्वरांचा आवाज होता.
आधुनिक पद्धतीत खर्च जास्त करून विवाह करण्यापेक्षा जुन्या पद्धतीने लग्न सोहळे आयोजित करावेत. बैलगाडी ही शेतकऱ्यांची आहे, त्याच्याच मदतीने विवाह करावेत. जेणेकरून खर्च कमी होतील व खर्चाचा बोजा वधू-वर पित्यावर पडणार नाही, यासाठी सर्वांनी या गोष्टीला चालना द्यावी, असे मत नवरदेवाचे काका शिवाजीराव बारसे यांनी व्यक्त केले.
इतर बातम्या