नंदूरबारमध्ये बर्ड फ्ल्यूची धास्ती… चिकन, अंड्याच्या विक्रीवर बंदी, पोल्ट्री व्यवसाय संकटात; प्रशासन सतर्क
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात बर्ड फ्ल्यूने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. यामुळे पोल्ट्री व्यवसाय मोठ्या संकटात सापडला असून, चिकन आणि अंड्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. प्रशासनाने युद्धपातळीवर कारवाई करत लाखो कोंबड्या व अंडी नष्ट केली आहेत. या साथीमुळे हॉटेल व्यवसाय व संपूर्ण फूड चेनला मोठा आर्थिक फटका बसला आहे, तर प्रशासन पुढील संसर्ग रोखण्यासाठी सतर्क आहे.

नंदूरबार जिल्ह्याला पुन्हा एकदा बर्ड फ्ल्यूचा विळखा पडला आहे. जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात बर्ड फ्ल्यूमुळे पोल्ट्री व्यवसायच संकटात आला आहे. राज्याच्या इतर भागात बर्ड फ्ल्यूची लागण होऊ नये म्हणून प्रशासनाने युद्धपातळीवर काम सुरू केलं आहे. गेल्या दोन दिवसात पावणे दोन लाख कोंबड्या ठार मारून नष्ट करण्यात आल्या आहेत. तसेच 8 लाख अंडेही नष्ट करण्यात आले आहेत. या शिवाय नवापूर तालुक्यात चिकन आणि अंडीच्या विक्रीवर तात्काळ बंदी घालण्यात आली आहे.
नवापूर तालुक्यात एकूण 38 पोल्ट्री फार्म आहेत. त्यापैकी 27 पोल्ट्री फार्म चालू आहेत. यात लाखो पक्षी आहेत. ज्या पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्ल्यू पसरला आहे, त्याच्या एक किलोमीटरच्या परिघातील पक्ष्यांना मारण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. दिवसाच नव्हे तर रात्री उशिरापर्यंत कोंबड्या मारण्याचे आणि अंडी नष्ट करण्याचे काम सुरू आहेत. एकट्या शनिवारीच 33 हजार कोंबड्या ठार करण्यात आल्या होत्या. नियमानुसार, पोल्ट्री फार्माशी संबंधित पक्षी, अंडी, पक्ष्यांच्या खाद्याचा स्टॉक, त्यांचे पंख आदी गोष्टी नष्ट केल्या जात आहेत. बर्ड फ्ल्यूचा संसर्ग रोखण्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने कोंबड्या नष्ट केल्या जात आहेत.
100 हून अधिक कर्मचारी नियुक्त
पशुपालन विभागाने ही मोहीम राबवण्यासाठी 100 हून अधिक अधिकारी, कर्मचारी, पशु चिकित्सक आणि सहायक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. नाशिकवरूनही विशेषज्ञांची एक टीम नवापूरला आली आहे. तसेच नवापूरमधील संपूर्ण प्रभावित परिसर सील करण्यात आला आहे.
डिसइन्फेक्शन, निरीक्षण, सर्वेक्षण, रहादरी आणि देवाणघेवाण या सर्वांवर कठोर निर्बंध आणले गेले आहेत. प्रभावित परिसरातील एक किलोमीटरच्या आतील कोंबड्या मारण्याचे काम सुरू आहे. तर 10 किलोमीटर परिसरात सर्वेक्षणाचं काम सुरू करण्यात आलं आहे.
आधी धसका, मग निर्णय
नवापूर नगर परिषद प्रशासनाने तालुक्यातील अंडी, चिकन आणि बिर्याणीवर प्रतिबंध घातला आहे. त्याचा थेट परिणाम हॉटेल, चिकन सेंटर आणि अंडी विक्रेते तसेच किरकोळ विक्रेत्यांवर झाला आहे. बर्ड फ्ल्यूमुळे पोल्ट्रीच्यासोबतच फूड चेनलाही आर्थिक फटका बसला आहे.
19 वर्षातील तिसरा झटका
उत्तर महाराष्ट्रातील नवापूर तालुका हा पोल्ट्रीचा मोठा बेल्ट मानला जातो. गेल्या 19 वर्षात नवापूरमध्ये तिसऱ्यांदा बर्ड फ्ल्यूची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे पोल्ट्री उद्योगाला मोठा झटका बसला आहे. पहिल्यांदा 2006मध्ये तर दुसऱ्यांदा 2021 आणि आता 2026मध्ये बर्ड फ्ल्यू आल्याने पोल्ट्री व्यवसाय कोलमडण्याची शक्यता आहे.