Nashik | उड्डाणपुलाविरोधातील खटल्याचे जनहित याचिकेत रूपांतर; उच्च न्यायालयाच्या निर्णयाने महापालिकेला धक्का
नाशिकमध्ये महापालिकेच्या वतीने मायको सर्कल आणि उंटवाडी येथे उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. मात्र, याविरोधात सत्ताधारी भाजपचे नगरसेवक मुकशे शहाणे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
![Nashik | उड्डाणपुलाविरोधातील खटल्याचे जनहित याचिकेत रूपांतर; उच्च न्यायालयाच्या निर्णयाने महापालिकेला धक्का Nashik | उड्डाणपुलाविरोधातील खटल्याचे जनहित याचिकेत रूपांतर; उच्च न्यायालयाच्या निर्णयाने महापालिकेला धक्का](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/12/23151755/court-compressed-4.jpg?w=1280)
नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) ऐन महापालिका ( Municipal Corporation) निवडणुकीच्या तोंडावर गाजणाऱ्या मायको सर्कल आणि उंटवाडी उड्डाणपुलाच्या विरोधातल्या खटल्याचे आता उच्च न्यायालयाने जनहित याचिकेत रूपांतर केले आहे. या निर्णयामुळे महापालिकेला जोरदार धक्का बसला असून, आता या याचिकेत इतर अनेक संबंधित पक्षही सहभागी होणार आहेत. शिवाय आता हा खटलाही चालविण्यासाठी मुख्य न्यायमूर्तींकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे उड्डाणपुलाचे कामही येणाऱ्या काळात रखडणार हे निश्चित आहे.
काय आहे आक्षेप?
नाशिकमध्ये महापालिकेच्या वतीने मायको सर्कल आणि उंटवाडी येथे उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. मात्र, याविरोधात सत्ताधारी भाजपचे नगरसेवक मुकशे शहाणे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांनी याचिकेत पुलासाठी सिमेंट ग्रेड एम 40 ऐवजी एम 60 केल्याचा आक्षेप घेतला आहे. त्यामुळे या पुलाचे डिझाईन बदलावे लागेल. नवी निविदा मागवावी लागेल. मात्र, त्याच कंत्राटदाराला काम देत रक्कम वाढवून देण्याचा घाट घातला जात असल्याचा त्यांचा आशेप आहे. या याचिकेवर मंगळवारी न्यायमूर्ती गौतम एस. पटेल आणि माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. तेव्हा या याचिकेत कुठलेही वैयक्तिक स्वारस्य नाही. त्यामुळे ही याचिका जनहित याचिका म्हणून परावर्तित करावी. योग्य त्या खंडपीठासमोर सादर करावी, असे आदेश न्यायमूर्तींनी दिले.
मनसेसह इतर मैदानात
उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्र नवनिर्माणसह इतर पक्ष आणि संघटनाही या उड्डाणपुलाविरोधात न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी याप्रकरणात सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे, तर दुसरीकडे या उड्डाणपुलामुळे जवळपास पाचशे झाडे तोडली जाणार आहेत. त्यामुळे पर्यावरणप्रेमी आक्रमक झाले आहेत. परिसरातील एकही झाड तोडू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. अजिंक्य गीते, चंद्रकांत पाटील, प्रशांत लोणारी अशा सामाजिक कार्यकर्त्यांसह ब्रह्मगिरी बचाव समिती, म्हसोबा देवस्थान समिती आक्रमक झाली आहे. याबद्दल महापालिकेकडे हरकती नोंदवाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे. शिवाय ते सुद्धा या प्रकरणात सहभागी होऊ इच्छितात. त्यामुळे येणाऱ्या काळात उड्डाणपुलाचे काम रखडणार आहेच. शिवाय या उड्डाणपुलाचे घोडे पुढे दामटणारे महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांचीही कोंडी होणार आहे.
इतर बातम्याः
Nashik MHADA | म्हाडा भूखंडात कोट्यवधींचा घोटाळा; मंत्री आव्हाडांचा सलग 2 ट्वीटमधून बॉम्बगोळा!
Nashik | ऑनलाईन शिक्षणाने मारले, 11 वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; 2 महिन्यांतली तिसरी घटना