नाशिक विधानपरिषदेतून गणेश गीतेंनी माघार का घेतली? स्वत: दिले स्पष्टीकरण, म्हणाले माझा भाऊ…

नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीनंतर भाजपचे बंडखोर गणेश गीते यांनी माघार घेण्याची तयारी दर्शवली असून, त्यांनी आपली भूमिका 'जशीच्या तशी' मांडली आहे.

नाशिक विधानपरिषदेतून गणेश गीतेंनी माघार का घेतली? स्वत: दिले स्पष्टीकरण, म्हणाले माझा भाऊ...
Ganesh gite
| Updated on: Jun 04, 2026 | 11:22 AM

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत सध्या राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. या विधानपरिषदेच्या रिंगणात निर्माण झालेला महायुतीचा तिढा अखेर सुटण्याच्या मार्गावर आहे. भाजपचे संकटमोचक आणि राज्याचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर भाजपचे बंडखोर उमेदवार गणेश गीते यांनी निवडणुकीतून माघार घेण्याची तयारी दर्शवली आहे. मी कोणतंही आश्वासन मागितलं नाही तसेच घेतलेलेही नाही. राज्यात १७ जागांवर युती आहे. त्यामुळे थांबावं लागेल, असे मला सांगितलं, त्यामुळे मी थांबण्याचा निर्णय घेतला, अशी प्रतिक्रिया गणेश गीते यांनी दिली.

गेल्या २४ तासांपासून मुंबईत सुरू असलेल्या मॅरेथॉन बैठका आणि चर्चेनंतर गणेश गीते यांनी उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. मात्र अद्याप गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते हे अजूनही निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. आता याबद्दल गणेश गीते यांनी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भावाच्या बंडखोरीसोबत निवडणुकीतून माघार घेण्याबद्दल स्पष्ट भूमिका मांडली.

वरुन आदेश येताच माघार घेणार : गणेश गीते

मी दोन दिवस मुंबईत होतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रविंद्र चव्हाण, गिरीश महाजन यांच्याशी आमची चर्चा झाली. या चर्चेनंतर मी असा निर्णय घेतला आहे की घरी जाऊन वरुन आदेश येताच मी निवडणुकीतून माघार घेणार आहे. मी काल एकनाथ शिंदेंकडेही गेलो होतो. त्यांनीही मला शब्द दिलाय की आम्ही तुझं पुनर्वसन करु. गिरीश महाजनांनीही हेच सांगितलं. त्यामुळे चर्चा करण्याचा काही विषयच येत नाही. उदय सामंत यांच्याशी माझी काहीही चर्चा झाली नाही, असे गणेश गीते म्हणाले.

बंधू गोकुळ गीते यांच्या भूमिकेवर स्पष्टीकरण

माझे बंधू गोकुळ गिते माझ्याही संपर्कात नाहीत. मी आता घरी गेल्यानंतर तो कुठे गेलाय याची तिथूनच माहिती मिळेल. त्यानंतर मी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेन. गोकुळ जर मला ३ वाजण्याच्या आधी भेटला तर निश्चितपणे मी त्याचे आणि गिरीश महाजन, देवेंद्र फडणवीस यांचेही बोलणं करुन देईन, असेही गणेश गीते यांनी म्हटले.

निवडणूक लढलो तर ४५० पेक्षा कमी मतांनी निवडून येणार नाही

मी कोणतंही आश्वासन मागितलं नाही, तसेच घेतलेलेही नाही. राज्यात १७ जागांवर युती आहे. त्यामुळे थांबावं लागेल, असे मला या सर्वांनी सांगितले. मला आता काही मागण्याची इच्छाही नाही. माझ्या दोन्ही नेत्यांच्या आदेशापुढे विधानसभा आणि विधानपरिषद फार लहान आहे. त्यामुळे मी त्यांना नंतर काय देणार हे देखील विचारलेलं नाही. मी विधानपरिषद निवडणुकीसाठी गेले वर्षभर मेहनत करत आहे. यासाठी मी सर्व नगरपालिका, जिल्ह्यात काम करत होतो. मला यामुळे अनेकांचा रोष ओढवून घ्यावा लागला. मला माझ्या पक्षातील काही लोक त्रास देतात. पण तरीही मी लढत होतो. आता पक्षाने सांगितलंय थांबायचं, त्यामुळे जर त्यांना काही द्यायचे असेल तर देतील, पण मला काही मागायला जायचं नाही, असे स्पष्टीकरण गणेश गीतेंनी दिले.

मी निवडणुकीत उभा राहिलो तर ४५० पेक्षा कमी मतांनी निवडून येणार नाही. मी अजूनही माघार घेतली नाही तर गणेश गितेच जिंकून येईल, यात कोणतीही शंका नाही. कुणाल दराडेचे ते रेकॉर्डिंग माझ्यापर्यंत आलं आहे. याबद्दल मी मुख्यमंत्र्‍यांशी बोलणार आहे. जर अशी मुघलाई होणार असेल, निवडणुका अजून लांब आहेत. अशीच जर दादागिरी होणार असेल तर हे चुकीचं आहे, असेही गणेश गीते म्हणाले.

Follow Us