11.30 वाजता फायनल निर्णय होणार? गीते यांनी सस्पेन्स वाढवला, नाशिकमध्ये मोठ्या घडामोडींना वेग
Nashik MLC Election : नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांच्या उमेदवारीमुळे महायुतीची चिंता वाढली आहे. याबाबत मोठी माहिती आता समोर आली आहे.

विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांच्या उमेदवारीमुळे महायुतीची चिंता वाढली आहे. ही बंडखोरी शमवण्यासाठी आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना विजयी करण्यासाठी नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेकडून मंत्री उदय सामंत आणि भाजपकडून गिरीष महाजन ही बंडखोरी शमवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अशातच आता मंत्री उदय सामंत यांनी या बंडखोरीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
काय म्हणाले सामंत?
उदय सामंत यांनी म्हटले की, महायुती मध्ये ही शिवसेनेला जागा सुटल्यानंतर दोन फॉर्म शिल्लक राहिले होते. गोकुळ गीते, प्रसाद हिरे दोघांसोबत चर्चा झाली. दोन्ही उमेदवारांना आम्ही काय सांगायचे ते सांगितले आहे. आम्हाला रात्रीची वेळ मागितली आहे, उद्या गिरीश महाजन त्यांच्यासोबत बोलणार आहेत, चर्चा सकारात्मक आहे. चर्चा करून त्यांचा लोकांशी बोलावे लागेल, मी शिवसैनिक म्हणून विनंती केली.’
पुढे बोलताना सामंत म्हणाले की, ‘शिंदे साहेबांसोबत देखील गिरीश भाऊंची चर्चा झाली आहे. मी फार आशावादी आहे आणि सकारात्मक आहे. गणेश गीते किंवा गोकुळ गीते यांना आम्ही कोणतेही आश्वासन दिले नाही आणि त्याच्या आधारे कार्याचे कोणतेही आश्वासन नको म्हणून सांगितले. ते गिरीश भाऊच नेतृत्व मानतात. ज्या पद्धतीने डिलिंग चाली असे काही नाही. राजकीय भविष्याबाबत चर्चा झाली नाही. गिरीश भाऊ यांना संकट मोचक म्हणतात, उद्या नक्की चांगले दिसेल. आम्ही पुन्हा एकदा साडेअकरा वाजता इथे येऊ. गणेश गीते यांच्याशी चर्चा केली ते सांगतील.’
या कारणामुळे गीते उमेदवारीवर ठाम
दरम्यान, गोकुळ गीते यांनी माघार न घेण्यामागे महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचे सुपुत्र कुणाल दराडे यांनी केलेली कथित शिवीगाळ आणि धमकी कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. जर कोणी सन्मानाने विनंती केली असती तर आपण माघार घेतली असती, परंतु आमच्या कुटुंबाला उद्देशून केलेल्या आक्षेपार्ह विधानांमुळे स्वाभिमानासाठी आपण निवडणूक लढवण्यावर ठाम आहोत, अशी भूमिका गोकुळ गीते यांनी घेतली आहे.