4 तास बैठक, नीटबाबत 4 मोठ्या अॅक्शन, वांगचुक यांच्या पत्नीला फोन, नंतरच्या 88 मिनिटात नेमकं काय घडलं? वाचा इन्साइड स्टोरी
सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी 26 दिवसांचे उपोषण सोडले. केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत ही समाप्ती झाली. उपोषण सोडण्यापूर्वी सरकारची उच्चस्तरीय बैठक, वांगचुक यांच्या पत्नीला फोन आणि शेवटच्या 88 मिनिटांत NEET पेपर लीक प्रकरणी केंद्र सरकारने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची इन्साइड स्टोरी वाचा...

अखेर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं आहे. मध्यरात्री वांगचुक यांनी उपोषण सोडलं. केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांनी उपोषण सोडलं. त्यामुळे सीजेपी आंदोलन मागे घेणार की नाही? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, वांगचुक यांनी रात्री अचानक उपोषण सोडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मध्यरात्री असं काय घडलं? पडद्यामागे सरकारच्या काय हालचाली सुरू होत्या? वांगचुक उपोषण मागे घेणार हे आंदोलकांना माहीत होतं का? मध्यरात्री शेवटच्या 88 मिनिटात नेमकं काय घडलं? काय आहे या मागची इन्साइड स्टोरी? याचाच घेतलेला हा आढावा.
सोनम वांगचुक यांनी तब्बल 26 दिवस उपोषण केलं. वांगचुक यांचं जंतरमंतरवरचं आंदोलन मोडीत काढल्यानंतर त्यांना आधी सफदरजंग आणि नंतर गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मेंदातामध्ये वांगचुक यांनी पुन्हा उपोषण सुरू केलं. मात्र रात्री केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत वांगचुक यांनी उपोषण सोडलं. तशी पोस्टच त्यांनी सोशल मीडियावर केली. त्यांनी आधी ट्विटरवरून माहिती दिली. त्यानंतर त्यांनी सकाळी युट्यूबवर 11 मिनिट 30 सेकंदाचा व्हिडिओ टाकून उपोषण सोडण्याची संपूर्ण कहाणी सांगितली.
दीपकेंकडून स्वागत, आंदोलकांचा जल्लोष
सोनम वांगचुक यांनी उपोषण समाप्त करण्याची घोषणा केली. त्याचं जंतरमंतरवर बसलेल्या आंदोलकांनी स्वागत गेलं आहे. वांगचुक यांनी उपोषण सोडल्यानंतर आंदोलकांनी नाचत गात जल्लोष केला. तसे व्हिडिओही समोर आले आहेत. आंदोलनाचे प्रमुख अभिजीत दीपके यांनीही वांगचुक यांनी उपोषण सोडल्याने त्याचं स्वागत गेलं आहे. आम्ही वांगचुक यांचे आभारी आहोत. पण जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहील. आम्ही जंतरमंतर सोडणार नाही, असं दीपके यांनी म्हटलं आहे.
अमित शाह, नड्डा आणि सिंह यांची चार तास बैठक
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा आणि पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्यात रात्री एक उच्चस्तरीय बैठक झाली. ही बैठक तब्बल चार तास चालली. यावेळी वांगचुक यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करण्याचा निरअमय घेण्यात आला. पण वांगचुक यांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
गीतांजली यांना फोन
अमित शाह यांच्या सूचनेनंतर डॉ. जितेंद्र सिंह यांनी सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांना फोन केला. वांगचुक यांनी जे मुद्दे उचलले आहेत. त्याचा आम्ही गंभीरपणे विचार करत आहोत, असा विश्वास त्यांनी गीतांजली यांना दिला. तसेच वांगचुक यांनी आता उपोषण सोडावं, असा आग्रहीही धरला.
88 मिनिटात काय घडलं?
रात्री 11 वाजून 04 मिनट : केंद्र सरकारने शिक्षण मंत्रालयाचे शिक्षण सचिव विनीत जोशींची बदली केली. त्यांच्या जागी नरेश पाल गंगवार यांना शिक्षण विभागाचे नवे सचिव म्हणून नियुक्त केलं. विनीत जोशींना पंचायती राज मंत्रालयाचे सचिव बनवले आहे. त्यांच्यासोबत 10 आणखी सीनिअर आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.
11 वाजून 10 मिनट : पेपर लीक प्रकरणात ट्रायलसाठी फास्ट ट्रॅक कोर्टला नोटिफाई करण्यात आले. दिल्लीचे राऊज एव्हेन्यू कोर्ट फास्ट ट्रॅक कोर्ट बनवलं आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या तीस हजारी कोर्टाच्या मीडिएशन सेंटरच्या इंचार्ज जस्टिस अनु ग्रोवर बालिगा यांची बदली राऊज एव्हेन्यू कोर्टात स्पेशल जज म्हणून करण्यात आली आहे. त्यांच्याच कोर्टात आता पेपर लीक प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
11 वाजून 52 मिनट : पीएम नरेंद्र मोदींनी विद्यार्थ्यांच्या नावे एक व्हिडिओ जारी केला आहे. पेपर लीक प्रकरणांमध्ये कठोर कारवाई करण्याचा विश्वास मोदींनी दिला आहे. तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडलं जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं मोदींनी म्हटलंय. शुक्रवारी (आज) होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत पेपर लीक प्रकरणावर कठोर निर्णय घेतला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
12 वाजून 32 मिनट : सोनम वांगचुक यांनी उपोषण संपवल्याची बातमी आली. केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा आणि केंद्रीय राज्य मंत्री जितेंद्र सिंह यांनी गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात जाऊन वांगचुक यांचं उपोषण संपवलं. वांगचुक 26 दिवसांपासून उपोषण करत होते. अटींवर झालेली दीर्घ चर्चा आणि देशात होऊ पाहणारी संभाव्य हिंसा पाहता उपोषण सोडत असल्याचं वांगचुक यांनी सांगितलं.
चर्चेचं स्थळ ठरलं
त्यानंतर जेपी नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह हे मेदांचा रुग्णालयात गेले. त्यांनी सोनम वांगचुक यांना लिखित आश्वासन दिलं. त्यानंतर वांगचुक यांनी उपोषण सोडलं. सीजेपी आंदोलकांशी आमचा संवाद सुरुच राहणार आहे. त्यांच्या प्रतिनिधीशी आम्ही चर्चा करणार आहोत. त्यासाठी एक निष्पक्ष जागाही ठरवली जाईल, असंही सरकारने सांगितलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी 12.30 वाजता दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशनल क्लबमध्ये सरकार आणि सीजेपीच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा होणार आहे.
