नाशिकमध्ये आज दिवसभर अग्नितांडव, आगीच्या चार घटनांनी नाशिक हादरलं

| Updated on: Oct 08, 2022 | 7:17 PM

एकाच दिवसात नाशिक जिल्ह्यात चार वाहनांना आग लागल्याने मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.

नाशिकमध्ये आज दिवसभर अग्नितांडव, आगीच्या चार घटनांनी नाशिक हादरलं
Image Credit source: TV9 Network
Follow us on

नाशिक : नाशिक शहरासह जिल्ह्यात (Nashik) आज वाहनांनी पेट घेतल्याच्या चार घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे आज दिवसभर शहरात आगीच्या घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. त्यातच शहरात घडलेल्या बसच्या अग्नितांडवात 12 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. इतर तिन्ही आगीच्या (Fire) घटनांमध्ये सुदैवाने जीवित हानी झालेली नसून वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एकाच दिवसात नाशिक जिल्ह्यात चार वाहनांना आग लागल्याने मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. पहिली आगीची घटना पहाटे शहरात घडली. दुसरी आगीची घटना ही वणी गडावर सूर्योदय होताच घडली. याशिवाय दुपारच्या वेळी मालेगाव – मनमाड रस्त्यावर कानडगाव शिवारात घडली. यानंतर सायंकाळच्या वेळी पिंपळगाव टोल नाक्याजवळ ट्रकला आग लागल्याची घटना घडली आहे.

  • पहिली आगीची घटना-
    पहाटे पावणे सहा वाजेच्या दरम्यान नाशिक शहरातील औरंगाबाद रोडवरील मिर्ची हॉटेल चौफुलीवर टँकर आणि खाजगी बसमध्ये अपघात झाला. त्यात बसने पेट घेतल्याने बस जळून खाक झालीय. यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला असून 31 जण जखमी आहे. जखमी प्रवाशांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. मुख्यमंत्री यांनी या अपघातस्थळी पाहणी करत जखमी प्रवाशांची भेट घेतली आहे. सरकारकडून मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना पाच हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर केंद्राने देखील 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
  • दुसरी आगीची घटना-
    नाशिकहून सप्तशृंगी गडावर कोजागिरी पौर्णिमेसाठी जाणाऱ्या राज्य शासनाच्या बसने पेट घेतला होता. सकाळच्या सत्रातच ही घटना घडली होती. आगीचा भडका होताच प्रवाशांनी बसमधून उड्या घेतल्या आणि आगी विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. आगीवर नियंत्रण मिळवले असून सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवित हानी झाली नसून बस पूर्णतः जळून खाक झाली आहे.
  • तिसरी आगीची घटना-
    बसला आग लागल्याच्या घटना ताज्या असतांना मालेगाव-मनमाड रस्त्यावर असलेल्या कानडगाव शिवारात ऑक्सिजन सिलेंडर घेऊन जाणाऱ्या वाहनाने पेट घेतला होता. वाहनाने पेट घेताच नागरिकांनी अग्निशमन दलाला पाचारण केले होते. मात्र, आगीने रुद्र रूप धारण करताच सिलेंडरने स्फोट घेतला. वाहनातील सिलेंडरने स्फोट घेतल्याने अनेक सिलेंडर जवळपास 20 टे 25 फुट हवेत उडाले होते. या घटनेत सुदैवाने जीवित हानी झाली नसून काही काळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. या अग्नितांडवात वाहन पूर्णतः जळून खाक झाले आहे.
  • चौथी आगीची घटना-
    नाशिक शहरासह जिल्ह्यात तीन आगीच्या घटनांनी शहर हदारलेले असताना जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने पेट घेतला होता. पेट घेतल्याचे लक्षात येताच नागरिकांनी अग्निशमन दलाला माहिती दिली होती. ही घटना पिंपळगाव टोल नाक्यापासून हाकेच्या अंतरावर असल्याने लागलीच अग्निशमन दलाचे बंब दाखल झाला आणि आगीवर नियंत्रण मिळवले. हा मालवाहतूक ट्रक असल्याने मोठे नुकसान झाले आहे. या घटनेतही सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नसून बघ्यांची मात्र मोठी गर्दी झाली होती.