नाशिक : भाजप नेत्यांच्या दिल्ली वारी वाढल्या आहेत. सर्वच नेते दिल्ली दरबारी जात असल्यानं राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. आता नाशिकचे महापौर, सर्व आमदार, स्थायी समिती सभापती आणि सर्व पदाधिकारी दिल्लीत दाखल झालेत. त्यामुळे भाजपच्या दिल्ली वारीत नेमकं दडलंय काय? याचीच चर्चा होतेय.
नाशिकच्या सर्व पदाधिकाऱ्यांची जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्या दालनात या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत नाशिकला नमामी गंगा प्रकल्पासाठी निधीची मागणी करण्यात येणार आहे.
दरम्यान, 9 ऑगस्टला सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. शहा यांची भेट घेतल्यानंतर फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर आरक्षणाच्या मुद्द्यावरून हल्ला चढवला. ते म्हणाले, “ठाकरे सरकारला आरक्षणच द्यायचं नाहीये. त्यामुळे त्यांनी 50 टक्के मर्यादेचं नवं कारण शोधलं आहे. इंदिरा सहानी केसमध्ये अतिशय क्लिअरपणे यावर भाष्य केलं आहे. सध्या मुद्दा आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा नाहीये. तर मुद्दा मागास घोषित करण्याचा आहे.”
“एखाद्या समाजाला मागास घोषित केल्यानंतर किती टक्के आरक्षण द्यायचं हा नंतरचा भाग आहे. अजून मागासच घोषित केलं नाही, मग आरक्षणाच्या मर्यादेचा प्रश्न येतो कुठे? असा सवाल करतानाच आतापर्यंत जातींना मागास ठरवण्याचा अधिकार राज्याला नाही म्हणून केंद्राकडे बोट दाखवलं जात होत. आता राज्यांना अधिकार मिळतोय. त्यामुळे सरकारने कारवाई करावी, असं ते म्हणाले. नवनवीन मुद्दे काढून सरकार वेळकाढूपणा करत आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.
चंद्रकांत पाटील शनिवारपासून (7 ऑगस्टपासून) दिल्लीत होते. त्यांनी उद्योगमंत्री नारायण राणे यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी भाजपचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या चर्चेला उत्तर देत आमच्या पक्षात तशी चर्चा नाही. प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा विचारही नाही, असं सांगितलं.
“खरं तर भाजप काय आहे हे तुम्हाला कळलं नाही. सर्वसामान्य माणसांनाही भाजप समजली पाहिजे, असं सांगतानाच दर तीन वर्षाने आमच्या पक्षात फेरबदल होतो. अगदी ग्रासरुटच्या पदापासून ते राष्ट्रीय अध्यक्षपदापर्यंत हा बदल होत असतो, असं पाटील म्हणाले. काँग्रेसला वर्षभरापासून पक्षाध्यक्ष मिळत नाही. भाजपमध्ये तसं नाही. त्यामुळे भाजपचा प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याच्या या निव्वळ चर्चा असून त्यात काही तथ्य नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं.