भीतीचे काहूर; उत्तर महाराष्ट्रात आज जबर पावसाची शक्यता

| Updated on: Oct 10, 2021 | 2:23 PM

उत्तर महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यात आज रविवारी जबर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा धुमाकूळ सुरू असून, त्यामुळे पिकांवर अक्षरशः नांगर फिरल्यागत जमा आहे.

भीतीचे काहूर; उत्तर महाराष्ट्रात आज जबर पावसाची शक्यता
Follow us on

नाशिकः उत्तर महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यात आज रविवारी जबर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा धुमाकूळ सुरू असून, त्यामुळे पिकांवर अक्षरशः नांगर फिरल्यागत जमा आहे.

गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरू आहे. त्यामुळे द्राक्षबागा, कांदा, सोयाबीनचा चिखल झाला आहे. त्यातच सध्या वायव्य भारतात मान्सूनच्या परतीसाठी अनुकूल परिस्थिती आहे. कुलाबा वेधशाळेच्या अंदाजानुसार 10 ऑक्टोबर रोजी उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे शाहीन वादळाचा रविवारी (10 ऑक्टोबर) उत्तर महाराष्ट्राला जबर तडाखा बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. महाराष्ट्रात परतीच्या पावसाचे 16 ते 18 ऑक्टोबर आणि राजस्थानमध्ये 13 ते 14 ऑक्टोबर दरम्यान आगमन होण्याची शक्यता आहे. मात्र, मध्य व दक्षिण भारतात मान्सून आणखी काही दिवस सक्रिय राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात पुन्हा 19 आणि 20 ऑक्टोबर रोजी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जवळपास 25 ऑक्टोबर नंतर पावसाळी वातावरण हटण्याचा अंदाज आहे. नाशिक जिल्ह्याकडे यंदा सुरुवातीच्या काळात पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे धरणे तळाला गेली. शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहिले. मात्र, सप्टेंबर महिन्यात लावलेल्या जोरदार हजेरीने त्याने सारी कसर भरून काढली. मनमाड, नांदगाव परिसरात दोन दोनदा ढगफुटी सदृश अतिवृष्टी झाली. यंदा नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर आला. या पावसाने जिल्ह्यातील गंगापूर धरण समूह भरला आहे.

वीजेचे तांडव सुरू

जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून वीजेचे तांडव सुरू आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार वादळी पाऊस होत आहे. शनिवारी दुपारीही शिरवाडे वणी परिसरात वादळी पावसाला सुरुवात झाली. त्यात विभा गुरव या शेतात काम करत होत्या. यावेळी अचानक वीज कोसळल्याने विभा यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी त्र्यंबक तालुक्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडली. त्यात पहिल्या घटनेत चंद्राची मेट येथे रामू रामचंद्र चंद्रे हे तरुण शेतकरी (वय 38) रानात गुरे चारत होते. दुपारी त्यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत तालुक्यातील सामुंडी येथे एका झाडावर वीज कोसळली. या झाडाजवळच्या घरातील रंजना वसंत लोमटे (वय 45) व त्यांच्या तीन मुली व मुलगा यांना वीजेचा जबर झटका बसला. त्यात रंजना थोडावेळ बेशुद्ध पडल्या. तर त्यांची नऊ वर्षांची मुलगी छायाला रुग्णालयात दाखल करावे लागले. तिची एक बाजू पूर्णतः बधीर झाली आहे, तर इतर दोन मुली अपेक्षा (वय 14) आणि अक्षरा (वय 11) यांच्या हाताला झटका पडून बेशुद्ध पडले. मात्र, त्यांची प्रकृती ठीक आहे. तिसऱ्या घटनेत अंबई माळरानावर वीज पडली. या घटनेत येथे चरणाऱ्या दहा शेळ्या जागीच ठार झाल्या. सुनील भुतांबरे यांच्या या शेळ्या होत्या.

धरणे ओसंडली

नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण भरले आहे. गंगापूर धरण समूहात गंगापूर (मोठे), काश्यपी (मध्यम), गौतमी गौदावरी (मध्यम) आणि आळंदी (मध्यम) ही चार धरणे आहेत. यातील सारीच धरणे भरली आहेत. त्यामुळे यंदा नाशिककरांची पाणी चिंता मिटली आहे. दुसरीकडे मुंबईला पाणीपुरवठा करणारे इगतपुरी तालुक्यातील सर्वात महत्त्वाचे अप्पर वैतरणा धरण भरले आहे. त्यामुळे तूर्तास मुंबईकरांचाही पाणीप्रश्न मिटला आहे. वैतरणा धरण गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये भरले होते. यावर्षी त्याला भरण्यासाठी एक महिन्याचा उशीर लागला.

इतर बातम्याः

15 बाजार समित्यांचे जंगी इलेक्शन, 22 जानेवारीला मतदान; नाशिकमध्ये महाविकास आघाडीची मोट बांधणार का?

सांग कुठं ठेवू माथा, कळनाच काही: मंदिर प्रवेशावरून वादाचे मोहोळ; त्र्यंबकेश्वरच्या गर्भगृहात भाविकांना बंदी

लचकंतोड्या पावसाने झोडपले, ढगफुटीसारखी हजेरी; नाशिक जिल्ह्यात द्राक्षबागांसह पिकांचे क्षणात होत्याचे नव्हते!