आमचा राम राम घ्यावा, मान्सून परतीच्या प्रवासावर; उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता

| Updated on: Oct 06, 2021 | 4:56 PM

सध्या वायव्य भारतात मान्सूनच्या परतीसाठी अनुकूल परिस्थिती आहे. त्यामुळे 6 ऑक्टोबरपासून पाऊस राम राम घेण्याच्या तयारीत आहे. या काळात नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आमचा राम राम घ्यावा, मान्सून परतीच्या प्रवासावर; उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

नाशिकः सध्या वायव्य भारतात मान्सूनच्या परतीसाठी अनुकूल परिस्थिती आहे. त्यामुळे 6 ऑक्टोबरपासून पाऊस राम राम घेण्याच्या तयारीत आहे. या काळात नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कुलाबा वेधशाळेनुसार 6 ते 9 ऑक्टोबरच्या काळात उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे शाहीन वादळाचा शनिवारी (9 ऑक्टोबर) आणि रविवारी (10 ऑक्टोबर) उत्तर महाराष्ट्राला जबर तडाखा बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. महाराष्ट्रात परतीच्या पावसाचे 16 ते 18 ऑक्टोबर आणि राजस्थानमध्ये 13 ते 14 ऑक्टोबर दरम्यान आगमन होण्याची शक्यता आहे. मात्र, मध्य व दक्षिण भारतात मान्सून आणखी काही दिवस सक्रिय राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात पुन्हा 19 आणि 20 ऑक्टोबर रोजी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जवळपास 25 ऑक्टोबर नंतर पावसाळी वातावरण हटण्याचा अंदाज आहे. नाशिक जिल्ह्याकडे यंदा सुरुवातीच्या काळात पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे धरणे तळाला गेली. शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहिले. मात्र, सप्टेंबर महिन्यात लावलेल्या जोरदार हजेरीने त्याने सारी कसर भरून काढली. मनमाड, नांदगाव परिसरात दोन दोनदा ढगफुटी सदृश अतिवृष्टी झाली. यंदा नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर आला. दुसऱ्या पुलावेळी तर रामसेतू पुलाजवळ पाणी पोहचले. या पावसाने जिल्ह्यातील गंगापूर धरण समूह भरला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारे इगतपुरी जवळील अप्पर वैतरणा ओसंडले आहे. जिल्ह्यातील इतर छोट्यामोठ्या धरणांची पाणी पातळी वाढली आहे.

पाणीदार जिल्हा

नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण भरले आहे. गंगापूर धरण समूहात गंगापूर (मोठे), काश्यपी (मध्यम), गौतमी गौदावरी (मध्यम) आणि आळंदी (मध्यम) ही चार धरणे आहेत. यातील सारीच धरणे भरली आहेत. त्यामुळे यंदा नाशिककरांची पाणी चिंता मिटली आहे. दुसरीकडे मुंबईला पाणीपुरवठा करणारे इगतपुरी तालुक्यातील सर्वात महत्त्वाचे अप्पर वैतरणा धरण भरले आहे. त्यामुळे तूर्तास मुंबईकरांचाही पाणीप्रश्न मिटला आहे. वैतरणा धरण गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये भरले होते. यावर्षी त्याला भरण्यासाठी एक महिन्याचा उशीर लागला.

धरणांवर फौजफाटा

नाशिक जिल्ह्यातील गंगापूर समूह आणि दारणासह मुकणे, भावली, वालदेवी, कडवा, नांदूरमधमेश्वर, भोजापूर ही प्रमुख धरणे ही भरत आली आहेत. त्यामुळे धरण परिसरात 10 नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. या परिसरात पाचपेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहेत.

इतर बातम्याः

दसऱ्याच्या तोंडावर सोनं स्वस्त; जाणून घ्या नाशिक सराफातील भाव!

व्यापाऱ्यांची शेतकऱ्यांना अमानुष मारहाण; कृषिमंत्री दादा भुसे यांच्या मालेगावातली संतापजनक घटना

भूमाफिया रम्मीला बेड्या; नाशिकमधल्या आनंदवली खून प्रकरणी कारवाई, 30 लाख रुपये अन् 10 गुंठे जमिनीची होती सुपारी