अजितदादा यांना मोठ्या आवाजात बोललो… छगन भुजबळ यांची कबुली; कशावरून पडली वादाची ठिणगी?

| Updated on: Sep 30, 2023 | 12:34 PM

लोकसभेत प्राबल्य असावं, विधानसभेत सरकार आलं पाहिजे यासाठी जे जे उपयुक्त ठरतील, ज्यांना ज्यांना निवडून येण्याची शक्यता वाटतेय, त्यांना निवडणूक भाजप रिंगणात उतरवेल, असं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले.

अजितदादा यांना मोठ्या आवाजात बोललो... छगन भुजबळ यांची कबुली; कशावरून पडली वादाची ठिणगी?
chhagan bhujbal
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

चंदन पुजाधिकारी, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नाशिक | 30 सप्टेंबर 2023 : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यात वादाची ठिणगी पडल्याची जोरदार चर्चा आहे. अजितदादांशी मी मोठ्या आवाजात बोललो अशी कबुलीही छगन भुजबळ यांनी दिली आहे. मात्र, हा वाद नाही. संघर्ष नाही. तर दोन भावांमध्ये जशी चर्चा होते, तशीच ही चर्चा होती, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे. भुजबळ यांच्या या विधानावरून आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. भुजबळ मीडियाशी संवाद साधत होते.

मी बैठकीत दिलेली आकडेवारी गायकवाड आयोगाची होती. सरकारमध्ये नोकरीत घेतांना आरक्षणाचा अनुशेष बाकी आहे, याकडे मी लक्ष वेधलं. नोकरीत अनुशेष दिसतोय, हे मी सांगत असतांना अजितदादांनी सेक्रेटरींना याबाबत विचारलंय सचिवांनी अशी काही माहिती नसल्याचं सांगितलं. माझ्या बोलण्यानंतर अजितदादा म्हणाले, अशी काही माहिती नाही आणि ती सत्य नाही. त्यामुळे मी उत्स्फूर्तपणे बोललो, की तुमच्याकडे माहिती नाही, असं होऊ शकत नाही. त्याच्यावरून थोडीशी बोलचाल झाली. मात्र त्याचा पराचा कावळा करण्यात आला, उगाचच राई का पहाड केला गेला, असं छगन भुजबळ म्हणाले.

खिंडार, अंतर्गत लढाई नाही

आमच्यात मतभेद नाही. मी माझा मुद्दा थोड्या मोठ्या आवाजात मांडला एवढंच. तो मुद्दा तिथे संपलेला आहे. एका घरात दोन भावांच्या अशा चर्चा होत असतात. त्यात खिंडार, अंतर्गत लढाई असं काही नाही, असंभुजबळ यांनी स्पष्ट केलं.

आमची खात्री आहे की…

निवडणूक चिन्ह आणि पक्ष यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. एक-दोन आमदार आणि 44 आमदार यात फरक आहे. 80 टक्के असतील तर त्यात फरक आहे. घड्याळ चिन्हं गोठवल जाणार याची माहिती नाही. जयंत पाटील देखील म्हणाले, की आमचा पक्ष फुटलेला नाही. फक्त पक्षांतर्गत अध्यक्ष आणि इतर निवडणुका असतात. आमची खात्री आहे पक्षाचं चिन्हं आणि सर्व गोष्टी आमच्याकडे राहतील, असंही त्यांनी सांगितलं.

वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही

अजितदादा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरच्या गणपतीला गेलेच नाही. त्यावरून राजकीय वर्तुळातून तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अजितदादांना त्या दिवशी खूप बिझी होते. त्यांना कार्यक्रमांना खूप उशीर झाला. मुख्यमंत्र्यांनी संध्याकाळी 6.30 वाजेचं निमंत्रण दिलं होतं. त्यांना उशीर झाला असेल म्हणून गेले नसतील. त्यातून काही वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही, असंही ते म्हणाले.

तो प्रकार तातडीने थांबवा

पैसे देवून ओबीसींमध्ये नोंदी केल्या जात असल्याचा दावा केला गेला आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. अशा प्रकारावर सरकारी अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. अशा नोंदी घेतल्यामुळे पुण्यात काही नगरसेवक निवडून आले आहेत. त्यांना कोर्टात जावं लागलं. चुकीचे प्रमाणपत्र दिलं जात असेल, तर ते तातडीनं थांबवण्याची गरज आहे, अशी मागणी त्यांनी केली.

ब्लॅकमेल शब्दाचा अर्थ माहीत नसावा

माजी आमदार रमेश कदम यांनी छगन भुजबळ यांच्यावर मोठा आरोप केला होता. भुजबळ यांनी तुरुंगात असताना शरद पवार यांना ब्लॅकमेल केले होते, असा दावा रमेश कदम यांनी केला होता. भुजबळ यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. मला सांगा कसं ब्लॅकमेल केलं? ब्लॅकमेल केलं असेल तर पवार साहेबांनी सांगावं, असं आव्हानच त्यांनी दिलं. मी आजारी होतो. हॉस्पिटलमध्ये जावून कागदपत्रं तपासा ना. आपण घरच्यांना सांगतो, साहेबांना जावून सांगा. मदत मागतोचं ना आपण? रमेश कदम यांना ब्लॅकमेल शब्दाचा अर्थ माहित नसावा, असा चिमटाही त्यांनी काढला.