Onion Crisis : पुन्हा हिमालयासाठी सह्याद्री धावला… महाराष्ट्र देणार दिल्लीला 840 टन कांदा; थेट कांदा एक्सप्रेस…

दिल्लीतील कांदा टंचाई आणि वाढत्या दरांवर मात करण्यासाठी महाराष्ट्राने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. लासलगावहून 'कांदा एक्सप्रेस' द्वारे 840 टन कांदा दिल्लीला पाठवला जात आहे. यामुळे दिल्लीकरांना 25-30 रुपये किलो दराने कांदा उपलब्ध होईल, ज्यामुळे वाढत्या भावापासून दिलासा मिळेल.

Onion Crisis : पुन्हा हिमालयासाठी सह्याद्री धावला... महाराष्ट्र देणार दिल्लीला 840 टन कांदा; थेट कांदा एक्सप्रेस...
Maharashtra onion
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 25, 2026 | 10:53 AM

देशावर कोणतंही मोठं संकट आलं की महाराष्ट्र पहिल्यांदा धावून जातो. राजधानीवर दिल्लीला आलेल्या प्रत्येक संकटात तर महाराष्ट्र कणा बनून नेहमीच उभा राहिला आहे. त्यामुळेच हिमालयासाठी सह्याद्री धावतो असं म्हटलं जातं. आता दिल्लीत कांद्याचं मोठं संकट उभं ठाकलं आहे. हिमालयाच्या या संकटात पुन्हा एकदा सह्याद्री धावून गेला आहे. महाराष्ट्रातून आज दिल्लीला 840 टन कांदा पाठवला जाणार आहे. लासलगावहून एक्सप्रेसने हा कांदा जाणार आहे. त्यामुळे दिल्लीतील कांदा टंचाई दूर होण्यसा मदत होणार आहे.

वाढलेल्या कांद्याच्या दारापासून दिल्लीकरांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्राने मोठं पाऊल उचललं आहे. लासलगाव रेल्वे स्थानकातून आज 840 टन कांदा दिल्लीसाठी होणार रवाना करण्यात येणार आहे. 21 व्हेगन असलेली रेल्वे मालगाडी लासलगाव रेल्वे स्थानकात दाखल झाली आहे. आज दुपारी 12 वाजेच्या दरम्यान ट्रकमधून आलेला कांदा रेल्वे मालगाडीत लोडिंगसाठी सुरुवात होईल. रात्री उशिरापर्यंत कांदा लोडिंग झाल्यानंतर मालगाडी दिल्लीच्या दिशेने रवाना होणार आहे.

कितीला देणार कांदा?

दिल्लीला सध्या हा कांदा 25 ते 30 रुपयांच्या दरम्यान उपलब्ध करून दिला जाणार आहे. मात्र या कांद्याच्या माध्यमातून दिल्लीकरांना दिलासा मिळणार आहे. पण राज्यातील शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याच्या दरावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दिल्लीत कांद्याचे भाव काय?

दिल्लीत गेल्या दोन आठवड्यापासून कांदा बाजारात कांदा 15 ते 20 रुपये किलो विकला जात होता. आता हा भाव 50 रुपये किलो झाला आहे. म्हणजे कांद्याच्या दरात 70 टक्के वाढ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कांद्याचा पुरवठा वेळेवर झाला नाही तर कांद्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. एका कांदा विक्रेत्याच्या मते, कांदा 20 ते 25 रुपये किलो विकत होतो. आता 30 रुपये किलो विकत आहोत. आता मंडईतच 50 रुपये किलोने कांदा मिळत आहे. त्यामुळे आम्ही 60 ते 62 रुपये किलोने कांदा विकत आहोत.

कांद्याची किंमत का वाढली?

दिल्लीच्या आजदपूर मंडईत रोज कांद्याचे 100 ट्रक येत होते. आता केवळ 40 ट्रक येत आहेत. मंडईतील पुरवठा हळूहळू कमी होत आहे. त्यामुळे हळूहळू स्टॉकही कमी होत आहे. त्यामुळे कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. व्यापाऱ्यांच्या मते, पावसामुळे कांद्याच्या शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांकडे विकण्यासाठी कांदा नाहीये. शेतीच बरबाद झाल्याने मंडईपर्यंत कांदाच येत नाहीये. त्यामुळे जुना स्टॉक वापरला जात आहे. त्यामुळे दिल्लीतील कांद्याचे भाव नियंत्रणात राहावे म्हणून कांदा एक्सप्रेस धावणार आहे. आज या कांदा एक्सप्रेसची पहिली खेप दिल्लीत येणार आहे.

Follow Us