हल्ली पुढारी नमस्कार सुद्धा करत नाहीत, यांच्या बापाचे काय जाते कळत नाही; अजितदादांचे जोरदार आसूड

| Updated on: Nov 28, 2021 | 2:54 PM

पूर्वीच्या राजकारण्यांमध्ये नम्रता होती. सर्वजण एकमेकांचा आदर करायचे. अलिकडे पुढारी नमस्कारही करत नाहीत. यांच्या बापाचे काय जाते तेच कळत नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हल्लीच्या राजकीय संस्कृतीवर आसूड ओढले.

हल्ली पुढारी नमस्कार सुद्धा करत नाहीत, यांच्या बापाचे काय जाते कळत नाही; अजितदादांचे जोरदार आसूड
deputy chief minister ajit pawar
Follow us on

नाशिक: पूर्वीच्या राजकारण्यांमध्ये नम्रता होती. सर्वजण एकमेकांचा आदर करायचे. अलिकडे पुढारी नमस्कारही करत नाहीत. यांच्या बापाचे काय जाते तेच कळत नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हल्लीच्या राजकीय संस्कृतीवर आसूड ओढले.

कळवण येथे कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. कोण काय काय बोलतो ही काय महाराष्ट्रची संस्कृती आहे का? कोणी बस फोडतोय… असे करू नका असं सांगतानाच पूर्वी राजकारण्यांमध्ये नम्रता होती. अलीकडे पुढारी नमस्कार सुद्धा करत नाही, काय त्यांच्या बापाचे जाते कळत नाही. कोणीही तांब्रपत्र घेऊन येत नाही. सत्ता येते आणि सत्ता जाते. आपण जमिनीवर राहिले पाहिजे, असं पवार म्हणाले.

तोपर्यंत सरकारला धोका नाही

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सरकार कोसळणार असल्याचं भाष्य केलं आहे. त्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. सरकार पडणार हे आठवले कितीदा म्हणाले? ते अनेक वेळा हेच सांगत असतात. आपण विकासावर बोलू ना. आम्ही मंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून हीच विधानं चालू आहेत. बोलणाऱ्यांना बोलू द्या. आम्हाला आमचं काम करू द्या. 145 ची मॅजिक फिगर ज्या व्यक्तीकडे असते, तो आकडा पाठिशी असेपर्यंत त्या सरकारला काहीही अडचण नसते एवढंच मला माहीत आहे, असंही ते म्हणाले.

आफ्रिकेतून विमान येवू नये

नवीन विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणात होतोय. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेतून विमान येऊ नये यासाठी सरकारने खबरदारी घ्यावी. यावर लस अजून उपलब्ध नाही. हा वेगाने पसरणारा विषाणू आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात काल बैठक घेतली आहे. मुख्यमंत्रीही या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे नागरिकांनीही खबरदारी घ्यावी, असं ते म्हणाले.

नवं संकट येणार नाही याची खबरदारी घ्या

मी काल पुण्यात कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. आज मुख्यमंत्री आढावा घेत आहेत. राजेश टोपेही आढावा घेत आहेत. साडेसात हजार कोटी रुपये आरोग्य खात्याला दिले आहेत. ऑक्सिजन, रुग्णवाहिका आणल्या आहेत. नवीन संकट येऊ नये म्हणून खबरदारी घेण्यासाठी केंद्राला विनंती करण्यात येणार आहे, असं सांगतानाच दुबईतून एक दाम्पत्य पुण्यात आलं होतं. त्यातून चालकाला कोरोना झाला आणि सर्वत्र कोरोना पसरला असंही त्यांनी सांगितलं.

तुटेपर्यंत ताणू नका

कोरोनामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. त्यानंतर नैसर्गिक आपत्ती आली. अवकाळी पाऊस आणि चक्रिवादळामुळे प्रचंड नुकसान झालं. हे संकट असतानाच एसटीचा संप सुरू झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब व मी असे एकत्रं बसलो. पवार साहेबांनी अनुभवानुसार योग्य पर्याय काढला. संपकऱ्यांनी आता तुटेपर्यंत ताणू नये. ही गोरगरिबांची एसटी आहे. येत्या 1 डिसेंबरपासून मुलांच्या शाळा सुरू होत आहेत. त्याचाही विचार करावा. तुम्हीही महाराष्ट्रातील आहात, असं ते म्हणाले.

 

संबंधित बातम्या:

संभाजी ब्रिगेड पुढच्या महिन्यात राजकीय भूमिका जाहीर करणार; महापालिका निवडणुकांमध्ये पर्याय देणार?

राज्यात महाघोटाळा आघाडी, सोमय्यांचा घणाघात; 29 वा नंबर मालिकांचा असू शकतो, असा इशारा

केंद्र सरकारमुळेच ओबीसींचं आरक्षण रद्द झालं; भुजबळ म्हणाले, जनावरांची गणना होते, आम्हालाही मोजा