उद्धव ठाकरे नाशिकमध्ये दाखल, मालेगावात ऐतिहासिक सभा, आता उरले अवघे काही तास

उद्धव ठाकरे नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. याशिवाय त्यांचा ताफा मालेगावच्या दिशेला देखील रवाना झालाय. त्यानंतर लगेच त्यांच्या सभेची लगभग सुरु होईल. या सभेसाठी संजय राऊत गेल्या तीन दिवसांपासून मालेगावात ठाण मांडून आहेत. त्यामुळे ही सभा खूप महत्त्वाची आणि ऐतिहासिक ठरण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे नाशिकमध्ये दाखल, मालेगावात ऐतिहासिक सभा, आता उरले अवघे काही तास
| Edited By: | Updated on: Mar 26, 2023 | 5:03 PM

नाशिक : महाराष्ट्राच्या राजकारणासाठी (Maharashtra Politics) आज अतिशय मोठा आणि महत्त्वाचा दिवस आहे. कारण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मालेगावात (Malegaon) आज मोठी सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी उद्धव ठाकरे आता नाशिकला (Nashik) दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. संध्याकाळी सहा वाजता त्यांची सभा सुरु होण्याची शक्यता आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. मालेगावात मुस्लिम समुदायाची संख्या जास्त आहे. उद्धव ठाकरे मालेगावातील मुस्लिम समाजाला उद्देशून काही भाष्य करतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

उद्धव ठाकरे यांच्या आजच्या सभेआधीच ठाकरे गटाकडून मालेगावात जोरदार वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. खासदार संजय राऊत हे गेल्या तीन ते चार दिवसांपासून मालेगावातच ठाण मांडून आहेत. या तीन दिवसांत संजय राऊत यांनी मुस्लिम समाजाच्या विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. या सभेतून मुस्लिम समाजाला आकर्षित करण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी मालेगावात उर्दूत बॅनर झळकलं आहे. त्या बॅनरमध्ये अली जनाब उद्धव ठाकरे असा उल्लेख करण्यात आल्याचा दावा करण्यात येतोय.

उद्धव ठाकरे दादा भुसेंवर निशाणा साधणार?

उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोप आणि टीका-टीप्पणीचं देखील राजकारण बघायला मिळतंय. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांना टोले लगावले जात आहेत. मालेगाव हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे मंत्री दादा भुसे यांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे या मतदारसंघातून उद्धव ठाकरे दादा भुसे यांना उद्देशून काय निशाणा साधतात ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

उद्धव ठाकरे आज संध्याकाळी छत्रपती सयाजी महाराज गायकवाड महाविद्यालयाच्या मैदानात उभं राहून भाषण करणार आहेत. सयाजी महाराज गायकवाड हे बडोदा संस्थानचे राजा होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक लोकपयोगी कामे केली. रस्ते, धरणं उभारली. स्त्री शिक्षणासाठी मोठं काम केलं. वाचन संस्कृती वाढावी यासाठी फिरते वाचनालये सुरु केली. धरणं बांधलं, देशातली पहिली बडोदा बँक सुरु केली. स्वातंत्र्य सैनिकांना ब्रिटिशांपासून लपवण्यासाठी सर्वोतोपरी मदत केली. महाराष्ट्रातील अनेक ज्येष्ठ समाजसुधारकांना हवी तशी आर्थिक आणि इतर मदत केली. त्यामुळे उद्धव ठाकरे आपल्या भाषणात सयाजी महाराजांबद्दल काही उल्लेख करतात का ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

दुसरीकडे उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणावर सविस्तर बोलण्याची दाट शक्यता आहे. त्यांची आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच विधान भवनाच्या प्रांगणात भेट झाली. या भेटीवर ते काही बोलतात का ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. याशिवाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर ते काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. या सभेत ते एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांवर साहजिकच टीका करतील. पण ते भाजपला उद्देशून काय टीका करतात ते पाहणंदेखील महत्त्वाचं ठरेल.

Follow Us