केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवारांचा साधेपणा; नाशिकमध्ये चालवले गुऱ्हाळ, पंचक्रोशीत चर्चेचा गोडवा!

| Updated on: Mar 12, 2022 | 3:31 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आजही गावोगावी पायाला भिंगरी लागल्यागत फिरतात. तिथल्या कार्यकर्त्यांची नावे त्यांना तोंडपाठ असतात. उगीच सारे पवारांचे नाव घेत नाहीत. हा झाला पवारांचा साधेपणा. असाच साधेपणा आणखी एका पवारांचा समोर आलाय. त्या म्हणजे केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार.

केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवारांचा साधेपणा; नाशिकमध्ये चालवले गुऱ्हाळ, पंचक्रोशीत चर्चेचा गोडवा!
नाशिक जिल्ह्यातल्या कळवण रस्त्यावर केंद्री मंत्री डॉ. भारती पवार यांनी स्वतः गुऱ्हाळ चालवले.
Follow us on

नाशिकः राजकारणात माणूस शिरला, तो यशस्वी झाला, दोन-चार पदे उपभोगली की त्याच्या डोक्यात सत्तेची नशा चढते म्हणतात. अशी माणसे मोठी होतात, पण त्यांच्यासोबत असलेली एकेक जीवाभावाची माणसे मागेच राहतात. मागे राहिलेली माणसे मोठ्यांच्या आठवणी काढतात. तो आता कसा ओळखतही नाही, हे सांगतात. मात्र, यालाही काही अपवाद असतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) आजही गावोगावी पायाला भिंगरी लागल्यागत फिरतात. तिथल्या कार्यकर्त्यांची नावे त्यांना तोंडपाठ असतात. उगीच सारे पवारांचे नाव घेत नाहीत. हा झाला पवारांचा साधेपणा. असाच साधेपणा आणखी एका पवारांचा समोर आलाय. त्या म्हणजे केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार (Bharti Pawar). त्यांनी नाशिकमध्ये (Nashik) गुऱ्हाळ चालवले. त्यातून उसाचा रस काढला. त्यांच्या या साधेपणाची चर्चा पंचक्रोशीत परसली आहे.

साधेपणा अन् कार्यकर्त्यांचे मोहोळ

डॉ. भारती पवारांचा मतदार संघ दिंडोरी असला तरी त्यांचा जन्म नाशिकचा. त्यांनी शिक्षणही नाशिकमध्येच पूर्ण केले. तब्बल 8 वेळा आमदार आणि शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जाणारे नेते ए. टी. पवार यांच्या त्या स्नुषा (सून). त्यांनी जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणून ग्रामीण भागात अनेक वर्षे काम केले. अभ्यासू नेता ही त्यांची ओळख. जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांनी कुपोषणाच्या समस्येवर काम केले. या काळात आरोग्य व्यवस्थेलाही धारेवर धरले. आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत्या. 2014च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेतही लाखोंच्या घरात मते मिळवली, पण योग्य सन्मान न मिळाल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

एक कप चहाची तल्लफ…

डॉ. भारती पवार यांचे ग्रामीण भागात कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे. त्यांचा जनसंपर्क दांडगाय. त्यांचा साधेपणा नेहमी चर्चेत असतो. यापूर्वी जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने त्या नाशिकमध्ये होत्या. यावेळी त्यांनी चक्क टपरीवर थांबून चहा घेतला. कार्यकर्त्यांशी गप्पा मारल्या. त्यांच्या या एक कप चहाची जिल्ह्यात चांगलीच चर्चा झाली होती. आता तर त्यांनी उसाचे गुऱ्हाळ चालवल्याचे समोर आले आहे.

गुऱ्हाळात टाकल्या कांड्या…

पवार या नाशिक दौऱ्यावर होत्या. सध्या उन्हाळा सुरू झालाय. थंडगार उसाच्या रसाला मागणी वाढलीय. कळवणच्या रस्त्यावर डॉ. भारती पवारांना उसाचे गुऱ्हाळ सुरू असलेले दिसले. त्यांनी गाडी थांबवली. मंत्री आलेले पाहून तिथले शेतकरी धावले. त्यांनी बसण्याची व्यवस्था केली. मात्र, पवार या तडक गुऱ्हाळाकडे गेल्या. तिथे स्वतःच गुऱ्हाळात उसाच्या कांड्या टाकून रस काढला. स्वतः एक ग्लास घेतला. त्यांच्यासोबतच्या इतरांनी रसाचा आस्वाद घेतला. उपस्थितांशी चर्चा झाली. पवारांनी गप्पा मारल्या. सगळ्यांचा निरोप घेतला. या गोडव्याची चर्चा अजूनही जिल्ह्यात पसरलीय.

इतर बातम्याः

रश्मी शुक्ला फोन टॅपिंगप्रकरणी फडणवीसांना नोटीस; चौकशीला हजर राहण्याचे पोलिसांचे आदेश

आणि तरीही मी पोलीसांसमोर हजर होणार, फडणवीसांची घोषणा, मुंबईकरांचा रविवार उद्या राजकीयदृष्ट्या टाईट जाणार