122 वर्षानंतर हिस्ट्री रिपीट? शाहू महाराजांबाबत जे घडलं, तेच संयोगिताराजे यांच्याबाबत घडलं; काय आहे वेदोक्त प्रकरण?

| Updated on: Mar 31, 2023 | 1:07 PM

माजी खासदार संभाजी छत्रपती यांच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती यांना एका धक्कादायक प्रसंगाला समारे जावं लागलं आहे. त्यांना नाशिकच्या प्रसिद्ध काळाराम मंदिरात वेदोक्त मंत्र म्हणण्यापासून रोखण्यात आलं आहे. त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

122 वर्षानंतर हिस्ट्री रिपीट? शाहू महाराजांबाबत जे घडलं, तेच संयोगिताराजे यांच्याबाबत घडलं; काय आहे वेदोक्त प्रकरण?
Sanyogeetaraje Chhatrapati
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नाशिक : तब्बल 122 वर्षानंतर पुन्हा एकदा वेदोक्त प्रकरण चर्चेत आलं आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना वेदोक्त मंत्र म्हणण्यास नकार दिला होता. त्याविरोधात शाहू महाराज यांनी मोठा लढाही दिला. पण काळ बदलला. तंत्रज्ञानाचं युग आलं. त्यामुळे काळानुसार लोक बदलतील, जातीप्रथा गळून जातील असं वाटलं होतं. पण शंभर वर्ष उलटले तरी परिस्थिती फारशी बदलली नसल्याचं दिसून येत आहे. माजी खासदार संभाजी छत्रपती यांच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती यांना वेदोक्त मंत्र म्हणण्यापासून रोखण्यात आलं आहे. ऐतिहासिक काळाराम मंदिरातच हा प्रसंग घडला आहे. स्वत: संयोगिताराजे यांनीच हा प्रकार आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवरून सांगितला आहे. शंभर वर्षापूर्वी जे शाहू महाराजांबाबत घडलं तेच संयोगिताराजेंबाबत घडल्याने संताप व्यक्त होत आहे.

हे सुद्धा वाचा

माजी खासदार संभाजी छत्रपती यांचा मागच्या महिन्यात वाढदिवस झाला. पहिल्यांदाच संभाजी छत्रपती यांचा वाढदिवस नाशिकमध्ये साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांच्या गराड्यात हा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला. संयोगिताराजे छत्रपती या सुद्धा नाशिकमध्येच होत्या. त्यामुळे संयोगिताराजे या संभाजी छत्रपती यांच्यासोबत काळाराम मंदिरात गेले होते. मंदिरात दर्शन घेत असताना त्यांना वेदोक्त मंत्र म्हणण्यास महंताने मज्जाव केला. त्यामुळे त्या संतापल्या. त्यांनी या महंताला सुनावले. झाला प्रकार त्यांनी आपल्या पोस्टमध्ये कथन केला आहे.

संयोगिताराजे यांची पोस्ट जशीच्या तशी

हे श्रीरामा,

स्वतःला सर्वज्ञ समजून, माणसा-माणसात भेद निर्माण करणार्‍या,परमेश्वराच्या नावाने केवळ स्वार्थ साधू पाहणार्‍यांना सद्बुद्धि दे… हीच आमची प्रार्थना, अन् हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. आपण सर्वजण देवाची लेकरे….आणि लेकरांनी आपल्या आईवडिलांना भेटण्यासाठी कोणाची परवानगी कशाला हवी? या विचारानेच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी अनेक क्रांतिकारक असे निर्णय घेतले होते.

त्यांचा वैचारीक वारसा चालवण्याची जबाबदारी आणि त्यामुळे जे आत्मबल प्राप्त झाले त्यामुळेच परवा नाशिकमध्ये काळा राम मंदिरात महामृत्युंजय मंत्राचा जप बिनदिक्कत करू शकले.

नाशिकच्या काळा राम मंदिरातील तथाकथित महंतांनी माझ्या पूजेसाठी पुराणातील मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या वारशामुळे मी ठामपणे विरोध केला. अनेक कारणे देऊन त्यांनी मला वेदोक्त मंत्राचा अधिकार कसा नाही हे सांगायचा प्रयत्न केला. शेवटी मी विचारले की, ज्या मंदिरांमध्ये तुम्ही आजच्या काळातही जे नियम लावत आहात ती मंदिरे वाचविली कोणी? छत्रपतींनी वाचविली! मग छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करू नका.

तरीही मी महामृत्युंजय मंत्र जप का केला म्हणुन त्यांनी प्रश्न केलाच… तेव्हा मात्र परमेश्वराच्या लेकराला, आपल्या ईश्वराला भेटायला आणि त्याची स्तुती करायला तुमच्या मध्यस्थीची गरजच नाही, असे सुनावले. त्यानंतर मी तिथेच रामरक्षा पण म्हणली.

या प्रसंगाने माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला की शंभर वर्षात ही मानसिकता का बदलली नाही? अजूनही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलेल्या विचारांना खूप खोलवर रुजवावे लागणार आहे… अजूनही खूप प्रवास बाकी आहे…अजून खूप चालावे लागणार आहे… हे श्रीरामा, त्यासाठी बळ दे आणि सर्वांना ज्ञान दे!

 

काय आहे वेदोक्त प्रकरण?

राजर्षी शाहू महाराज यांनाही वेदोक्त प्रकरणाला सामोरे जावं लागलं होतं. शाहू महाराज यांना त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच वेदोक्त प्रकरणाचा सामना करावा लागला. एका ब्राह्मणाने अंघोळ न करता मंत्र म्हणण्याचे ठरवले. यावरून वेदोक्ताचा वाद निर्माण झाला. 1901ची ही गोष्ट असेल. त्या ब्राह्मणाने पुराणोक्त मंत्र म्हणण्यास सुरुवात केली. त्याने वेदोक्त मंत्र म्हणणं अपेक्षित होते. जाणकारांनी हे शाहू महाराज यांच्या लक्षात आणून दिले.

त्यावर शाहू महाराजांनी जाब विचारला असता, “छत्रपतींना वेदोक्ताचा अधिकार नाही, पण पुराणोक्त मंत्रांनी हाच विधी करता येतो!”, असं उत्तर या ब्राह्मणाने शाहू महाराज यांना दिले. पण शाहू महाराज अभिमानी होते. त्यांनी वेदोक्त मंत्रच म्हणण्यास त्या ब्राह्मणाला सांगितले. पण तो ऐकेना. त्यातून त्याने स्वतः शुचिर्भूत न होता हे मंत्र सांगितले होते. कोल्हापूरच्या ब्राह्मणांनीही या घटनेचा निषेधच केला. छत्रपती शाहू महाराज यांनीही या घटनेचा निषेध नोंदवला. त्यानंतर त्यांनी या विरोधात बंड पुकारले आणि अनेक सामाजिक सुधारणा घडवून आणल्या. इतिहासात ही घटना वेदोक्त प्रकरण म्हणून ओळखली जाते.