Khalapur Landslide : मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अमित शाह यांचा फोन

| Updated on: Jul 20, 2023 | 9:41 AM

रायगड जिल्ह्यातील खालापूरनजिक इर्शाळगड येथे दरड कोसळण्याची घटना काल मध्यरात्री घडली. या घटनेत काही लोकांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

Khalapur Landslide : मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अमित शाह यांचा फोन
cm eknath shinde
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

खालापूर | 20 जुलै 2023 : इर्शाळगड येथील ठाकूरवाडी गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत करण्यात येणार आहेत. तसेच दुर्घटनेतील जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: ठाकूरवाडी गावात जाऊन मृतांच्या नातेवाईकांचं सांत्वन केलं. तसेच जखमींची विचारपूस करून अधिकाऱ्यांकडून दुर्घटनेचा आढावा घेतला. त्यावेळी ते मीडियाशी बोलत होते. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी फोन करून घटनेची माहिती घेतल्याचंही त्यांनी सांगितलं.

खालापूर येथील इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या ठाकूरवाडी या वस्तीवर काल रात्री 10. 30 ते 11 वाजेच्या दरम्यान दरड कोसळली. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून मदत व बचावकार्याचा आढावा घेतला. प्रचंड पाऊस आणि अवघड रस्ता यामुळे बचाव कार्य कार्यात अडथळा येत असला तरी हवामानात सुधारणा झाल्यानंतर तात्काळ हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येईल. दोन हेलिकॉप्टरसह सर्व यंत्रणा बचाव कार्यासाठी सज्ज आहेत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

अमित शाह यांचा फोन

एनडीआरएफ पथकांकडून बचाव कार्य सुरू आहे. रस्ता नसला तरी मदतकार्य सुरू असून आताट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या घटनेची माहिती घेतली आहे. तसेच काहीही मदत लागली तरी केंद्र सरकार मदत देईल असं आश्वासन अमित शाह यांनी दिल्याचं शिंदे म्हणाले. तसेच आम्ही मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदत देणार आहोत. तसेच जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

गावांचं पुनर्वसन करावं

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या दुर्घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. रायगड जिल्ह्यातील इरसाल गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गावावर दरड कोसळली. येथे जीवितहानी झाली असल्याचे समजते. ही घटना अतिशय दुःखद आणि दुर्दैवी आहे. मदत आणि बचावकार्य सुरु असून नागरीकांना सुरक्षित स्थळी पोहोचविण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन व शासकीय यंत्रणा कार्यवाही करत आहेत.

याचबरोबर या भागातील इतर गावांना देखील सुरक्षित स्थळी पोहोचविण्याच्या दृष्टीने शासनाने प्रयत्न करावेत. पुणे जिल्ह्यातील माळीण आणि आताच्या दुर्घटनेपासून धडा घेऊन अशा प्रकारे धोकादायक पद्धतीने वसलेली गावे शोधून पुनर्वसन करण्याचे काम राज्य सरकारने तातडीने हाती घ्यावे ही विनंती, असं सुप्रिया सुळे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

परिस्थितीवर लक्ष ठेवून

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दुर्घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. रायगड जिल्ह्यातील खालापूरनजिक इर्शाळगड येथे दरड कोसळण्याची घटना काल मध्यरात्री घडली. या घटनेत काही लोकांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. ही घटना कळताच काल मध्यरात्रीपासूनच मी स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहे. एनडीआरएफच्या 2 चमू घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या असून आणखी दोन चमू थोड्याच वेळात पोहोचत आहेत. प्रचंड पाऊस आणि अंधार यामुळे मदतकार्यात प्रारंभी अडचणी आल्या, मात्र आता ते गतीने होत आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

 

प्राथमिक माहितीनुसार एकूण 48 कुटुंब येथे आहेत. सुमारे 75 जणांना बाहेर काढण्यात यश आले असून 5 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. जखमींवर तातडीने उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. आम्ही सारे परिस्थितीवर आणि मदत-बचावकार्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहोत, असं त्यांनी म्हटलं आहे.

हेल्पलाईन नंबर

810819555