भोंदूबाबा खरातप्रकरणी आता थेट उद्धव ठाकरेंना..; भाजपच्या खळबळजनक दाव्यानंतर मोठा ट्वीस्ट

भोंदू बाबाला पायघड्या घालणाऱ्या तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर नवनाथ बन यांनी टीका केली असून, संजय राऊत यांच्या सह-आरोपीच्या मागणीवरून उद्धव ठाकरेंवर सवाल उपस्थित केले आहेत.

भोंदूबाबा खरातप्रकरणी आता थेट उद्धव ठाकरेंना..; भाजपच्या खळबळजनक दाव्यानंतर मोठा ट्वीस्ट
Navnath Ban Uddhav thackeray
| Updated on: Mar 22, 2026 | 1:04 PM

सध्या महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन आणि भोंदूगिरीच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भोंदू बाबाच्या दरबारात जाणाऱ्या मंत्र्यांना सह-आरोपी करण्याची मागणी केली आहे. यानंतर आता त्यांच्यावर प्रतिहल्ला करण्यात आला आहे. जर मंत्र्यांना सह-आरोपी करायचे असेल, तर याच भोंदू बाबासाठी पायघड्या घालणारे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांनाही सह-आरोपी करणार का? असा बोचरा सवाल नगरसेवक आणि भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी उपस्थित केला आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्यातील सत्ताधाऱ्यांवर कडक शब्दांत ताशेरे ओढले होते. यावेळी संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्र हे स्वातंत्र्यापूर्वीपासूनच एक पुरोगामी, सुधारणावादी आणि विज्ञानवादी राज्य राहिले आहे. अशा राज्यात जर भोंदूगिरी आणि बुवाबाजी फोफावत असेल आणि त्यात सत्ताधारी सहभागी होत असतील, तर हे अत्यंत दुर्दैवी आहे. अशोक खरातच्या दरबारात जाणाऱ्या सर्व राजकारण्यांना आणि मंत्र्यांना या प्रकरणात सह-आरोपी केले पाहिजे. त्यांना सह-आरोपी केल्याशिवाय या राज्यातील भोंदूगिरी आणि बुवाबाजी थांबणार नाही, अशी मागणी संजय राऊतांनी केली होती.

संजय राऊत यांच्या या विधानाचा समाचार घेताना नवनाथ बन यांनी काही जुन्या घटनांची आठवण करून दिली. त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळातील निर्णयांवर बोट ठेवत महाविकासआघाडीवर गंभीर आरोप केले आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली का करण्यात आले?

राज्यात जेव्हा भीषण दुष्काळ होता आणि सर्वसामान्य जनतेला पिण्यासाठी पाणी मिळत नव्हते, तेव्हा तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने या भोंदू बाबासाठी पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिले होते. इतकेच नाही तर यासाठी विशेष शासन निर्णय (GR) देखील काढण्यात आला होता. हे सर्व उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली का करण्यात आले होते? असा सवाल नवनाथ बन यांनी केला आहे.

संबंधित भोंदू बाबावर २००३ मध्येच गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर १५ वर्षे राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते आणि नंतर महाविकास आघाडीचे सरकार आले. मात्र, या प्रदीर्घ काळात एकालाही या बाबावर कारवाई करण्याची हिंमत झाली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले आणि भोंदू बाबावर कारवाई करण्यात आली. मात्र, जेव्हा आपले सरकार होते, तेव्हा मिलिंद नार्वेकर सारखे जवळचे नेते याच बाबांना भेटायला जात होते, असा गंभीर आरोपही नवनाथ बन यांनी केला.

जर आजच्या मंत्र्यांना तुम्ही सह-आरोपी करण्याची मागणी करत असाल, तर हाच न्याय लावून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांनाही सह-आरोपी करायचे का? याचे उत्तर राऊतांनी आधी द्यावे, असेही नवनाथ बन यांनी म्हटले. दरम्यान या वादामुळे आगामी काळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये भोंदूगिरीवरून मोठे रणकंदन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Follow Us