आता कोणाचीही खैर नाही, भोंदूबाबा अशोक खरातप्रकरणी राज्य सरकार ॲक्शन मोडवर, मोठा निर्णय काय?
नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरातच्या शिवनिका संस्थानला दिलेला नियमबाह्य पाणीपुरवठा राज्य सरकारने रद्द केला असून, या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत.

नाशिकमध्ये महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणी अटकेत असलेला वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरातला राज्य सरकारने मोठा दणका दिला आहे. सिन्नर येथील त्याच्या शिवनिका संस्थानला दारणा धरणातून नियमबाह्य पद्धतीने देण्यात आलेला पाणीपुरवठा तातडीने रद्द करण्याचे आदेश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. प्रशासकीय नियमांचे उल्लंघन करून हे पाणी मंजूर करण्यात आल्याचा संशय असून, या संपूर्ण प्रकरणाची आता सखोल चौकशी केली जाणार आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनिवारी या निर्णयाची माहिती दिली.
मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यावर डल्ला?
नाशिकच्या मिरगाव येथील या संस्थानला दारणा धरणातून तब्बल ३९ लाख लीटर पाणी मंजूर करण्यात आले होते. विशेष म्हणजे हे आरक्षण पिण्याच्या पाण्यासाठी दाखवण्यात आले होते. पण प्रत्यक्षात ४८ किलोमीटरची पाईपलाईन टाकून या पाण्याचा वापर खरातच्या २१ एकरमधील आंब्याच्या बागेसाठी केला जात असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. आता याप्रकरणी सरकारने तातडीने मोठी कारवाई केली आहे.
तत्कालीन महाविकास आघाडी सरकार चौकशीच्या फेऱ्यात
हा पाणी आरक्षणाचा निर्णय २५ जून २०२० रोजी महाविकास आघाडी सरकारच्या काळातील मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री तर जयंत पाटील जलसंपदा मंत्री होते. या निर्णयावर कोणाच्या सह्या आहेत आणि संबंधित फाईलवर कोणाचे शेरे आहेत, याची सखोल चौकशी करा, असे आदेश विखे पाटील यांनी दिले आहेत. अशा प्रकारे खाजगी संस्थेला नियमबाह्य पाणी देणे गंभीर असून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणावर भाष्य करताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारला आव्हान दिले आहे. हा निर्णय आमच्या सरकारच्या काळातील असला तरी, या प्रकरणाची केवळ वरवरची चौकशी करू नका. पाणी नेमके कोठपर्यंत मुरतेय, तिथपर्यंत सखोल तपास करा, असे त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
अशोक खरातला मोठा धक्का
अशोक खरात याने केवळ पाण्याचे आरक्षणच पळवले नाही, तर मिरगावातील शेतकऱ्यांचे रस्ते अडवणे, जाम नदीपात्रात अतिक्रमण करून प्रवाह वळवणे अशा अनेक बेकायदेशीर कृत्यांचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. आता जलसंपदा विभागाने या संस्थेने आजवर पाणीपट्टी भरली आहे का, याचीही पडताळणी सुरू केली आहे. त्यामुळे भोंदूबाबा अशोक खरातला मोठा धक्का बसला आहे.
