तटकरे यांनी माफी मागायला सांगितली, मी घाबरलो, शरद पवार यांना फोन लावला; जितेंद्र आव्हाड का म्हणाले असं?

नितेश राणे वाचतात किती? बोलतात किती? हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. हे पुरावे माझ्याकडे आहेत. ज्यांना लॉजिकली भांडायचं नसतं ते गुन्हे दाखल करा, तुरुंगात टाका असे मार्ग अवलंबतात. राम आम्हा बहुजनांचा आहे. क्षत्रिय आहे. तुम्ही अपहरण करत आहात आमच्या रामाचं. तो मर्यादा पुरुषोत्तम आहे. शबरीचे बोरं खाणारा राम आहे. जातपात न मानणारा राम आहे. तुमचा राम बाजारात तुम्हाला निवडणुकीसाठी आणायचा आहे. आमचा राम आमच्या हृदयात आहे...

तटकरे यांनी माफी मागायला सांगितली, मी घाबरलो, शरद पवार यांना फोन लावला; जितेंद्र आव्हाड का म्हणाले असं?
jitendra awhad
| Updated on: Jan 04, 2024 | 2:23 PM

शिर्डी | 4 जानेवारी 2023 : प्रभू रामाबद्दलचं विधान केल्याने राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड चांगलेच अडचणीत आले आहेत. आव्हाड यांच्या विधानाचं निषेध करण्यासाठी भाजपने राज्यभरात आंदोलन सुरू केलं आहे. तर आव्हाड यांनी या विधानावर दिलगीरी व्यक्त केली आहे. बोलण्याच्या ओघात माझ्याकडून ते विधान झाल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच आपण जे बोललोय ते वाल्मिकी रामायणातही लिहिलेलं आहे, असं सांगतानाच त्यांनी पुरावेही सादर केले. जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी बाबासाहेब पुरंदरे यांच्यासोबत झालेल्या वादाचा एक किस्साही सांगितला.

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्यासोबत झालेल्या वादाचा एक किस्साही सांगितला. कोणत्याही सामाजिक आशयाला पक्ष जबाबदार राहत नाही. पक्ष कधीच सामाजिक आशय ठरवत नाही, असं शरद पवार यांचं आम्हाला नेहमीचं सांगणं आहे. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे मी जेव्हा बाबासाहेब पुरंदरेंच्या विरोधात उतरलो. तेव्हा आमचे तत्त्कालीन प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, तू जाऊन पुरंदरेंची माफी माग. तटकरे यांचं हे विधान ऐकून मी जरा घाबरलो होतो. मी शरद पवार यांना फोन केला. पवार म्हणाले, तुझा इतिहासाचा अभ्यास आहे. तुला जे योग्य वाटतं ते बोल. त्याच्याशी पक्षाचं काही घेणंदेणं नाही. कारण पक्ष हा सामाजिक भूमिका ठरवत नाही, असा किस्सा जितेंद्र आव्हाड यांनी सांगितला.

तर लढू शकलो नसतो

मी पक्षात एकटं असतो तर एवढे लोकं माझ्या मागे उभे असते का? नेते काय करता? मी एकटा आहे ना जिवंत अखंड. मीच पुरंदरेचं प्रकरण तीन महिने लावून धरलं. शनिवार वाड्यावर होणारा सोहळा शेवटी सरकारला राज्यपाल भवनात घ्यावा लागला. तेव्हा पण मी एकटाच होतो. लढाई करताना माझ्याबरोबर किती लोक आहेत हे पाहिलं असतं तर आयुष्यात कधीही लढू शकलो नसतो, असं आव्हाड म्हणाले.

आम्ही बोलू शकतो

कित्येक वक्ते काय काय बोलून गेले. ती पक्षाची भूमिका असते. तुम्हाला जे पटतं ते घ्या. बाकीचं सोडून द्या. शिबीर त्यासाठीच असतं. पक्षाच्या व्यासपीठावर आता वानखेडे बोलत आहेत. आम्ही नेते असलो तरी आम्हालाही विषय दिले जातात. आम्ही बोलू शकतो. ते पक्षाने स्वीकारावे असं बंधन नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

ते हेच सुधीरदास

मी बाबासाहेबांना मानणारा कार्यकर्ता आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानतो. मी वाल्मिकींनी जे लिहिलंय तेच बोललो. मी गुन्ह्याला घाबरत नाही. तुम्हाला लॉजिकली बोलायचं असेल तर या बोलायला. लॉजिक मान्य नसेल तर मी खेद व्यक्त केला आहे. विरोध करणारे कोण आहेत? कोण साधू संत आहेत? कोण आहेत? एक नाव सांगा. महंत सुधीरदास महाराज ना. त्यांनीच कोल्हापूरच्या महाराणीला वैदिक की पौराणिक या वादात अडकवलं होतं. तेच हे सुधीरदास. त्यांच्या कहाण्या सांगण्यासारख्या आहेत. पण मी संत माणसाचा आदर करतो. ज्याच्या डोक्यात आजही वर्णभेद आहे, त्याबद्दल मी काय बोलणार?, असा टोला त्यांनी लगावला.

दर्शनाला बोलवणारे हे कोण?

कुणाच्या बोलावण्यावरून मंदिरात जाणारा मी नाही. रामाच्या दर्शनाला बोलवणारे हे कोण? राम माझा आहे. मी कधीही जाऊन दर्शन घेईन. मी नाशिकच्या गोरा राम आणि काळाराम मंदिरात दरवर्षी जातो. गुहेतून रामाचं दर्शन घ्यावं लागतं. राम ज्या गावातून गेले, त्या गावाचा मी आहे, असंही ते म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us