Explainer : मेरीट ते नीट पेपरफुटीपर्यंत… यश ते बदनामी? काय आहे लातूर पॅटर्नची कहाणी?

लातूर पॅटर्न एकेकाळी शैक्षणिक यशासाठी प्रसिद्ध होता, जिथे विद्यार्थी दहावीत राज्यात चमकत. पण खासगी क्लासेसच्या वाढीने व नंतर NEET पेपरफुटीच्या घटनांमुळे त्याची प्रतिमा डागाळली. मेरीटपासून पेपरफुटीपर्यंत, लातूर पॅटर्नचा प्रवास यश आणि बदनामीने भरलेला आहे, ज्याची कहाणी या लेखात उलगडली आहे.

Explainer : मेरीट ते नीट पेपरफुटीपर्यंत... यश ते बदनामी? काय आहे लातूर पॅटर्नची कहाणी?
| Updated on: May 18, 2026 | 1:56 PM

लातूर हे नेहमीच चर्चेत राहिलं आहे. लातूर शिक्षणाचं माहेरघर नसलं तरी लातूरच्या शैक्षणिक पॅटर्नची नेहमीच चर्चा राहिली आहे. इयत्ता दहावीला लातूरची मुलं हमखास महाराष्ट्रात पहिली यायची. त्यामुळे लातूरचा बोलबाला वाढला. लातूरमधील एका खासगी क्लासेसची ही मुलं असायची. त्यामुळे शिक्षण म्हटलं की लातूर पॅटर्न असं म्हटलं जाऊ लागलं. लातूर पॅटर्नची महाराष्ट्रातच नव्हे तर देशात चर्चा होत होती. पण नंतर पुढे त्या क्लासेसचं बिंग फुटलं आणि लातूर पॅटर्न पत्त्यासारखा कोसळला. त्यानंतर लातूरची मुलं राज्यात पहिली यायची बंद झाली. त्यानंतर दोन वेळा नीट पेपर फुटला. लातूरमध्ये नीट पेपरफुटीचं प्रकरण सर्वाधिक गाजलं. आता आणि पूर्वी अशा दोन्ही वेळी लातूरचं कनेक्शन समोर आलं. त्यामुळे लातूर पुन्हा बदनाम झालं. आधी चांगल्या शैक्षणिक कामगिरीमुळे ओळखला जाणारा लातूर पॅटर्न आता चिंटिंगच्या नावाने ओळखला जाऊ लागला. काय आहे हा लातूर पॅटर्न? त्याचा उदय अस्त कसा झाला? याचाच घेतलेला हा आढावा.

यांनी रचला पाया…

लातूरच्या निर्मितीनंतर केंद्रीय विद्यालय, केशवराज विद्यालय अहमदपूर येथील महात्मा गांधी विद्यालयाने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम सुरू केलं. त्यांच्या प्रयत्नांना यशही आलं. या विद्यालयाची मुलं मेरीटमध्ये झळकू लागली. त्यानंतर लातूर शहरातील शाहू आणि दयानंद कॉलेजने बारावीच्या गुणवत्तेचा पाया रचला. त्यामुळे लातूर पॅटर्न एकदमच प्रकाश झोतात आला. विशेष म्हणजे या पॅटर्न राज्याला हजारो डॉक्टर आणि इंजिनीअर दिले. दिवंगत प्राचार्य पुरोहित सर, डॉ. जे. एम. वाघमारे, प्राचार्य ढोबळे, डॉ. ना. य. डोळे, प्रभुदेव स्वामी, दिगंबरराव होळीकर, व्यंकटेशराव देशपांडे, तिवारी सर आदी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली होती. हा नव्वदीच्या दशकाचा काळ होता.

काय आहे लातूर पॅटर्न ?

इयत्ता आठवी, नववीपासूनच विद्यार्थ्यांची परीक्षेची तयारी करून घेतली जायची. त्यांच्या दर आठवड्याला परीक्षा घेतल्या जायच्या. प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्या जायच्या. विशेष म्हणजे जानेवारीपर्यंतच इयत्ता दहावीचा पूर्ण अभ्यासक्रम शिकवला जायचा. त्यानंतर विद्यार्थ्यांकडून केवळ प्रश्नपत्रिका सोडवून घेतली जायची. प्रत्येक वर्षाची प्रश्नपत्रिका सोडवली जायची. वारंवार विचारले जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे तोंडपाठ करून घेतली जायची. सलग दोन अडीच महिने टाईम लावून पेपर सोडवून घेतले जात असल्याने मुलांचा लिखाणाचा स्पीड वाढला, त्यांची परीक्षेची भीती मरायची, शिवाय लिहिता लिहिता प्रश्नांची उत्तरे तोंडपाठ व्हायची, अक्षर सुधरायचे आणि वेळेत पेपर लिहिण्याचं गणित जुळवून यायचं, यामुळे लातूरचे विद्यार्थी इयत्ता 10 वीच्या परीक्षेत अव्वल यायचे.

लातूर पॅटर्नमध्ये वेगळा अभ्यासक्रम शिकवला जात नाही. जो सिलॅबस महाराष्ट्र परीक्षा मंडळांने आखून दिला आहे, त्याचीच तयारी विद्यार्थ्यांकडून करून घेतली जाते. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडे जातीने लक्ष घातलं जातं. विशेष म्हणजे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची इयत्ता सहावीपासूनच तयारी करून घेतली जाते. त्यांचा प्रत्येक विषय पक्का करून घेतला जातो. त्यामुळेच इयत्ता दहावीची परीक्षा या विद्यार्थ्यांना कठिण जात नाही.

खासगी क्लासेसचे पेव

लातूर पॅटर्नने यशाचा हमखास मंत्र दिला. लातूरमधील शिकवण्याची पद्धती आणि विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेण्याच्या पद्धतीमुळे लातूरकडे सर्वच आकर्षित झाले. शिक्षणाचा लातूर पॅटर्न उदयाला आला. त्यामुळे या पॅटर्नचा फायदा घेण्याचं काम काही लोकांनी केलं. लातूरात जागोजागी खासगी कोचिंग क्लासेस दिसू लागले. पुढे एका खासगी कोचिंग क्लासेसची मुले राज्यात अव्वल यायला लागल्याने या क्लासेसचा मोठा बोलबाला झाला. पण टॉपर आलेले विद्यार्थी या क्लासचे नसल्याचं पुढे समोर आलं. तशी त्यावेळी चर्चा होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली आणि पुढे लातूर पॅटर्न बदनाम झाला, असंही बोललं जातं. त्यानंतरच लातूरच्या शैक्षणिक प्रगतीला खऱ्या अर्थाने आहोटी लागल्याचं सूत्रांनी सांगितलं.

कधी कधी पेपर फुटले?

2026 : मे 2026 मध्ये झालेल्या राष्ट्रीय पात्रता-प्रवेश परीक्षेचा (NEET) पेपर फुटला आहे. या पेपरफुटीचा मुख्य सूत्रधार लातूरचाच असल्याचे सीबीआय तपासात निष्पन्न झाले आहे. सीबीआयने या सूत्रधाराला अटकही केली आहे. निवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी हा या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचं सांगितलं जातंय. कुलकर्णी हा पेपर तयार करणाऱ्या (सेट करणाऱ्या) समितीत आहे. त्याला सीबीआयने लातूर/पुण्यातून अटक केली होती. याशिवाय, लातूरमधील काही खासगी शिकवणी (कोचिंग) चालकांचीही कसून चौकशी करण्यात आली आहे. आरसीसी पॅटर्नचे संचालक प्रा.शिवराज मोटेगावकर याचीही सीबीआयने कसून चौकशी केली असून त्याला अटक करण्यात आले आहे.

2024 : या आधी 2024 मध्ये म्हणजे दोन वर्षापूर्वी नीटचे पेपर फुटले होते. त्यावेळीही या प्रकरणात लातूरचं नाव आलं होतं. केवळ नाव आलं नव्हतं तर लातूरमधून पेपर फोडणारं मोठं रॅकेटच उद्ध्वस्त करण्यात आलं होतं. त्यावेळीही पेपरफुटी प्रकरणात खासगी क्लासेसची नावे समोर आली होती. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या रॅकेटमुळे एकच खळबळ उडाली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us