मोबाईलमध्ये ही गोष्ट कधीच डाऊनलोड करू नका; तर होणार डिजिटल अरेस्ट, फडणवीसांची सभागृहात अत्यंत महत्त्वाची माहिती
आज पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे, शेवटच्या दिवशी महाराष्ट्रात घडत असलेल्या डिजिटल अरेस्टच्या घटनांवर बोलत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

आज पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे, शेवटच्या दिवशी सभागृहामध्ये महाराष्ट्रातील गुन्हेगारी संदर्भात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिजिटल अरेस्ट संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. ‘आज महाराष्ट्र सायबरचा जो 1930 क्रमांक आहे. याच्यावर दररोज आठ ते दहा हजार तक्रारी येतात. आपण एआयचा वापर करून, या सर्व प्रकारच्या तक्रारी नोंदवण्याची व्यवस्था केली आहे. त्याला रिस्पोंड करण्याची व्यवस्था केली आहे. देशातील सर्वाधिक कॉल हँडल करण्याची क्षमता आपल्या यंत्रणेमध्ये आहे. देशातील सर्वात मोठा डिजिटल अरनेस्टचा घोटाळा देखील 58 कोटी रुपयांचा हा आपण पकडला आहे. ज्याच्यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, कर्नाटक आंध्रप्रदेश, या पाच राज्यातून 33 आरोपींना अटक केली आहे. एकूण 45 आरोपींचा या घोटाळ्यामध्ये सहभाग आहे. या घोटाळ्यातील जवळपास सहा हजार खाती गोठवण्यात आली आहेत. त्यामुळे या ठिकाणी एक मोठा प्रहार डिजिट अरेस्टवर झाला आहे.’ असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, मोबाईलमधील एपीके फाईल महत्त्वाची आहे. जे लोक अँड्रॉइड मोबाईल वापरतात त्यांना ही फाईल पाठवली जाते. ती डाऊनलोड केली की तुमच्या फोनचा पूर्ण कंट्रोल त्यांच्याकडे जातो. त्यामुळे अशा फाईल डाऊनलोड करू नका असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे. महानगर गॅसच्या नावाने फसवण्याचा प्रयत्न झाला आहे. 43 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे, या प्रकरणात 6 आरोपींना पकडले आहे. त्यांच्याकडून मोबाईल व लॅपटॉप जप्त करण्यात आले आहे. 8 हजार 946 पीडितांची सर्व माहिती त्यांच्याकडे होती. सगळ्यांना विनंती आहे, अनोळखी नंबर वरून अशा फाईल आल्या तर त्या डाऊनलोड करू नका, खात्री करून घ्या, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.
आपण यासाठी मेटासोबत देखील करार केला आहे. महाराष्ट्र सायबरवर रोज 8 ते 10 हजार तक्रारी येत आहेत. आपण या सर्व तक्रारी निकाली काढण्याचा प्रयत्न करत आहोत. आतापर्यंत अशा प्रकरणात अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे, असंही यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.